पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा आहे. पण अल्पभूधारक शेतकऱ्यांना इच्छा असूनही केवळ जनावरांसाठी लागणारा चारा परवडत नाही म्हणून आणि चारा स्वतःच्य शेतात घेण्याइतपत क्षेत्र आणि पाणी नसल्याने हा जोडधंदा करीत नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हायड्रोपोनिक या आधुनिक तंत्राने घरच्या घरी, जमिनीशिवाय आणि कमित कमी पाण्यात चारा उत्पादनाचे तंत्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद देत असून हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन करुन पशुपालन हे अधिक फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून ते अत्यंत फायदेशीर पद्धतीने पशुपालन करुन दुग्धोत्पादनातून अर्थार्जन करीत आहेत. विशेष म्हणजे दुष्काळाच्या स्थितीतही भर उन्हाळ्यात पशुपालकांना अगदी कमी खर्चात आपल्या पशुंना हिरवा चारा खायला देणे शक्य होते आहे. याचा परिणाम अर्थातच दुग्धोत्पादनावर होतो आणि त्याचा अर्थार्जनावर.
जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे 120 शेतकऱ्यांनी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन करुन घरच्या घरी पशुपालनाचा जोडधंदा चालवला आहे. प्रति युनिट सहा हजार रुपयांचे अनुदान या शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देण्यात येते. त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात 7 लक्ष 20 हजार रुपयांचे अनुदानही वितरीत करण्यात आले आहे.
गोजोरे ता. भुसावळ येथील गजानन रामू दोडे या शेतकऱ्याकडे 10 म्हशी आणि 3 गाई आहेत. या गुरांसाठी लागणारा हिरवा चारा ते गेल्या 7-8 महिन्यांपासून हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उगवण करुनच निर्माण करतात. यामुळे त्यांची चाऱ्यासाठीची वणवण थांबली असून त्यांच्याकडील गुरांना घरच्या घरी उत्तम चारा ते देऊ शकतात. या चाऱ्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ झाली असल्याचे दोडे यांनी सांगितले.
हायड्रोपोनिक पद्धतीने चारा तयार करण्यासाठी मक्यासारख्या तृणधान्याचा वापर प्राधान्याने करण्यात येतो. काही ठिकाणी गहू, जवस यासारखे धान्यही स्थानिक उपलब्धतेनुसार वापरतात. या धान्यांना सोडियम हायपोक्लोराइड किंवा ई. एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करून भिजवून त्याला मोड आणले जातात. त्यानंतर ट्रेमध्ये पसरवून ठेवतात. त्यानंतर एका शेडनेटसारख्या आच्छादनाचा वापर करुन नियंत्रित तापमान व आर्द्रतेचे वातावरणात हे ट्रे ठेवले जातात. दिवसभरात 200 लिटर पाण्यात पूर्ण शेड मधल्या ट्रे मध्ये फॉगर्सद्वारे पाणी फवारा मारला जातो. केवळ पाण्यावरच या चाऱ्याची सात ते आठ दिवसांत 20 ते 25 सेंमी उंचीपर्यंत वाढ होते. एका ट्रेमधील धान्यापासून 14 ते 16 किलो हिरवा चारा उपलब्ध होतो. साधारणतः एक किलो चारा तयार करण्यासाठी सर्वसाधारण अडीच ते तीन रुपये खर्च येतो. साधारणतः 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराची चाऱ्याची शेड 15 ते 25 हजार रुपयात तयार होते. स्थानिक बांबू, दांड्या यासारख्या वस्तूंचा वापर केल्यास हा खर्च आणखीन कमी करता येतो. एवढ्या आकाराच्या शेडमध्ये दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. एक किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.
कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक हिरवा चारा निर्मिती. जनावरांना हा चारा आवडतो. यामुळे पशुखाद्यावरील खर्च 40 टक्के कमी होतो. दुध व दुधाच्या दर्जात वाढ होते. चाऱ्याखालील क्षेत्र वाचते व त्यावर अन्य पिकांचे उत्पादन घेणे शक्य होते.
लेखक - मिलिंद मधुकर दुसाने
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/23/2020
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्य...
सन 1971 पासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मेहकर ताल...
पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वा...
वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्य...