पाटील यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मान
धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावरील आणि मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेले नगाव, ता. जि. धुळे येथील प्रगतीशिल शेतकरी चिंधा आत्माराम पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करीत प्रगतीचे शिखर सर केले आहे. त्यांचा राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकताच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देवून गौरव केला आहे.
धुळे शहर व नगाव या दोन्ही गावातील अंतर अवघे सहा किलोमीटर आहे. धुळे शहराचा विस्तार आता उत्तरेला नगावपर्यंत पोहोचत आहे. धुळे शहरापासून उत्तरेला नगाव बारीची टेकडी ओलांडली की उजव्या हाताचा रस्ता थेट चिंधा पाटील यांच्या शेतापर्यंत जातो. या शेतात सध्या त्यांनी कपाशी, ज्वारी, मका, मूरघासचा पेरा केला आहे. या शेताच्याच एका कोपऱ्यात गोठा बांधला आहे. या गोठ्यात दहा ते बारा जर्सी व होस्टाइन गायी व तेवढ्याच दुभत्या म्हशी बांधलेल्या दिसून येतात. याच दुग्ध व्यवसायातून प्रगती साधत श्री. पाटील हे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सध्या म्हशीचे 100 ते 125 लिटर, तर गायीचे 80 ते 100 लिटर दूध ते वसुंधरा सेंटर, बलसाड (गुजरात) येथे पाठवीत आहेत. म्हशीच्या दुधाचा दर सध्या 48 ते 50 रुपये, तर गायीच्या दुधाला प्रति लिटर 24 ते 28 रुपये दर मिळत आहे.
श्री. पाटील यांच्याकडे एकूण 42 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रात तीन विहिरी खोदलेल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी शेतात 100 बाय 100 फूट आकाराचे शेततळे बांधले. तेव्हापासून त्यांनी शेतीत बदलाला सुरवात केली. या शेततळ्यासाठी राज्य शासनाने त्यांना 82 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन दिले होते. याशिवाय कांदा चाळीसाठी 84 हजार रुपये, तर मूरघास चाळीसाठी 1 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. आता मांसल कुक्कुट पालन शेड बांधणीसाठी श्री. पाटील यांना 1 लाख 12 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचे काम सुरू आहे. या शेडमध्ये 1 हजार पक्ष्यांचे एका वेळेस पालन होवू शकणार आहे. तसेच विविध यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी श्री. पाटील यांना अनुदान मिळाले आहे.
शेतीत शेतीचे नवनवीन प्रयोग श्री. पाटील करीत असतात. मात्र, त्यांचा सर्वाधिक भर राहिला आहे तो सेंद्रीय शेतीवर. त्यासाठी त्यांना पशुपालनाचा व्यवसाय पूरक ठरला आहे. या पशुपालनातून त्यांना वर्षाला दर्जेदार असे शंभर ते सव्वाशे ट्रॅक्टर खत मिळते. या खतामुळे शेतजमीन सुपिक होण्यास मदत होते. या वर्षी त्यांनी शेतात 125 ट्रॅक्टर शेणखत टाकले. त्याचे परिणाम त्यांच्या शेतातील पिकांना बघितल्यावर दिसून येतात. श्री. पाटील यांनी गेल्या वर्षी तीन एकर क्षेत्रातून पपईचे किमान सहा लाख रुपयांचे उत्पादन घेतले, तर कापसाचे 300 क्विंटल, तर कांद्याचे 400 क्विंटल उत्पादन घेतले. कपाशीसह विविध पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
श्री. पाटील यांना शेतीसाठी त्यांची मुले सतीश, विजय, संदीप मदत करीत असतात. त्यापैकी सतीश व विजय हे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शेतीतच रमले, तर लहान संदीप हा एका कॉर्पोरेट बँकेच्या धुळे येथील शाखेत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. श्री. पाटील आजही दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना सतीश व विजय हे मदत करतात. तसेच श्री. पाटील शंभर एकर शेती भाडेतत्वाने करतात. या शेतीत मात्र ते जनावरांसाठी चारा पिके प्रामुख्याने घेतात. श्री. पाटील यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. मात्र, नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. गोठा परिसरात त्यांनी सौर पथदिवे बसविले आहेत. श्री. पाटील यांनी सेंद्रीय शेतीची कास धरीत आणि शेतीला पशुपालन व दुग्ध व्यवसायाची जोड देत प्रगती साधली आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पशुपालन, दुग्ध व्यवसाय किंवा शेळी पालन केल्यास आणि शेतीत स्वत: परिश्रम घेतल्यास जास्त उत्पादन घेवू शकतो, असा विश्वास ते व्यक्त करतात.
- गोपाळ साळुंखे, माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/14/2020