स्त्रोतकाटेकोर शेती म्हणजे काय?
- नव्या तंत्रांचा वापर करून आणि प्रत्यक्ष शेतांमधली माहिती गोळा करून योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य अशी गोष्ट करणे याला काटेकोर शेती म्हणतात. जमा केलेल्या माहितीचा वापर बियाण्याची योग्य घनता जास्त नेमकेपणाने ठरवण्यासाठी, खते आणि इतर आदाने किती वापरावीत याचा नेमका अंदाज करण्यासाठी, आणि किती पीक येईल याचे योग्य आडाखे बांधण्यासाठी करता येतो.
- स्थानिक माती वा हवामान विचारात न घेता केल्या जाणा-या पीक मशागतीच्या रूढ पद्धती टाळता येतात. याचाच अर्थ, श्रम, पाणी, खते-औषधे यांसारख्या आदानांमध्ये बचत होऊन गुणवत्तेचे पीक घेता येते.
काटेकोर शेती प्रकल्प - तामीळनाडू
योजनेविषयी
- तामीळनाडूत काटेकोर शेती प्रकल्प प्रथम 2004-05 मध्ये धर्मापुरी जिल्ह्यात सुरू करण्यात आला. सुरुवातीला तो 2004-05 मध्ये 250 एकरात, 2005-06 मध्ये 500 एकरात आणि 2006-07 मध्ये 250 एकरात राबवण्यात आला. तामीळनाडू सरकारने हे काम तामीळनाडू कृषिविद्यापीठाकडे सोपवले होते.
- ठिबक सिंचन यंत्रणा उभी करण्यासाठी 75000 रुपये आणि पीक उत्पादन खर्चासाठी 40000 रुपये सरकारने दिले होते. पहिले पीक संपूर्णतः विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. नंतरची पाच पिके स्वतः शेतक-यांनीच पुढच्या तीन वर्षात घेतली.
- सुरुवातीला त्या भागात 2002 पासून लागोपाठ चार वर्षे पडलेल्या दुष्काळात भाजून निघालेले शेतकरी हा प्रकल्प स्वीकारण्यास तयार नव्हते. पण पहिल्या 100 शेतक-यांचे यश आणि या योजनेतील पिकाला मिळणारा जास्त दर पाहून शेतकरी दुसऱ्या वर्षी (90 टक्के अनुदान) आणि तिस-या वर्षी (80 टक्के अनुदान) मोठ्या संख्येने आपले नाव नोंदवू लागले.
तंत्रज्ञान
1. उपग्रह आधारित मातीचे नकाशे Maps
उपग्रह आधारित मातीच्या नकाशाच्या साहाय्याने खते देणे आणि मातीचे व्यवस्थापन करणे. या तंत्रज्ञानाच्या वापराने विशिष्ट भागातील मातीत असलेली नेमकी पोषणद्रव्ये किती प्रमाणात आहेत हे ओळखता आले.
2. वरच्या थरातील वखरणी
वर्षानुवर्षांच्या ट्रॅक्टर वापराने आणि पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीमुळे मातीचा वरचा थर जवळजवळ 45 सेमीपर्यंत कडक झालेला आहे. त्यामुळे त्या मातीत पाण्याचा योग्य निचरा होत नाही आणि तिच्यात हवाही खळती राहात नाही. वरच्या थरातल्या वखरणीमुळे या समस्येवर मात करता येते. अशी नांगरट वषार्तून दोन वेळा करावी.
3. ठिबक सिंचन
- ठिबक लघुवितरिका (लॅटरल्स) या 1.5x0.6 मी. अंतरावर लावाव्यात. त्यांचा चांगला फायदा होतो.
- दर एकरी पाण्याची आणि खतांची कमी गरज
- मातीच्या वरच्या थरातील कोरडेपणामुळे तणाचे कमी प्रमाण
- मातीत योग्य ओलावा राखल्याने आणि हवा खेळती राहिल्याने कमी प्रमाणातील फूल आणि फळांची गळती
- 60 टक्क्यांहून कमी आर्द्रता राखल्याने रोग आणि किडीची कमी लागण
- 40 टक्के जास्त हवा खेळल्याने मुळांच्या जास्त वाढीस मदत
4. सामुदायिक रोपवाटिका
विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर शेतकऱ्यांनी सामुदायिक रोपवाटिका बनवून 100 टक्के निरोगी रोपे बनवली.
5. रोग आणि कीड नियंत्रण
हवामान ध्यानात घेऊन केलेल्या प्रतिबंधक तजविजी आणि गरजेपुरता केलेला औषधांचा आणि कीटकनाशकांचा वापर यांमुळे एक तृतीयांश खर्च कमी करण्यास मदत झाली.
काटेकोर शेतक-यांचा संघ
लाभार्थी शेतक-यांनी 25-30 च्या संख्येने एकत्र येऊन आपल्या काटेकोर शेतकरी संघाची नोंदणी केली. ह्या संघांनी वेगवेगळी कामे हाती घेतली. उदाहरणार्थ,
- शेतीला आदाने पुरवणा-या व्यापा-यांशी बोलणी करणे
- भाजीपाला करण्यासाठी कंत्राटाने शेती कसायला देण्याबाबत चर्चा करणे
- विविध बाजारपेठांना भेटी देऊन त्यांची माहिती घेणे
- इतर सदस्यांसोबत अनुभवांचे आदान प्रदान करणे
- तामीळनाडूतील इतर जिल्ह्यांमधून आलेल्या शेतक-यांना काटेकोर शेतीतून आलेले अनुभव सांगणे
बाजारपेठेची व्यवस्था
- शास्त्रज्ञांनी माल जास्त किमतीला विकायला मदत केली. बाजारपेठेची मागणी ध्यानात घेऊन पिके निवडून योग्य त्या हंगामात पिकवली जातात.
- तामीळनाडू कृषिविद्यापीठामधल्या तज्ज्ञांच्या मदतीने काटेकोर शेतीतून पिकलेल्या आणि बाजारात आणलेल्या मालासाठी एक खास मानचिन्ह (लोगो) बनवण्यात आले आहे.
- उत्कृष्ट गुणवत्तेमुळे काटेकोर शेतीतील मालाला सर्व बाजारपेठांमध्ये हमखास सगळ्यात चांगला दर मिळतो.
स्त्रोत :
डॉ. इ. वडिवेल,
नोडल ऑफिसर ऍण्ड डिरेक्टर ऑफ एक्स्टेन्शन,
तामीळनाडू प्रिसिजन फार्मिंग प्रोजेक्ट
तामीळनाडू ऍग्रिकल्चरल युनिव्हसिर्टी,
कोईम्बतोर – 641003, तामीळनाडू
दूरध्वनी - 0422-6611233
इ-मेल: dee@tnau.ac.in