जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत परभणी जिल्ह्यात विविध विभागांमार्फत जलसंधारणाची कामे झाली आहेत. या कामांची परिणामकारता दिसून येऊ लागली असून सिमेंट बंधाऱ्यांचे खोलीकरण, रूंदीकरणाची तसेच अन्य कामेही प्रभावीपणे झाल्यामुळे अनेक बंधाऱ्यात यावर्षी पाणी साठले आहे. परभणी तालुक्यातील मौजे पान्हेरा येथेही जलसंधारणाच्या विविध कामांमुळे गाव-शिवार जलयुक्त झाले आहे. साठलेल्या पाण्यामुळे शिवारातील आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या तसेच बोअरच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. खोलीकरण केलेले ओढे भरुन वाहू लागल्याने तसेच साचलेले आणि वाहणारे पाणी पाहून परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत. परभणी तालुक्यातील मौजे पान्हेरा गावाची लोकसंख्या 1253 आहे. गावाचे क्षेत्र 527 हेक्टर आहे. त्यापैकी 493 हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे.
गावात कापूस, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. त्याबरोबरच मूग, तूर, भाजीपाला तसेच अंबा, डाळींब, पपई व संत्रा ही फळ पिकेही घेतली जातात. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विहीर पुनर्भरणाची चार कामे पूर्ण झाली आहेत ज्याद्वारे चार टीएमसी, साखळी सिंमेट बंधाऱ्यांची तीन कामे झाली असून याद्वारे 36 टीएमसी तर सिमेंट नालाबांध खोलीकरणाच्या सहा कामाद्वारे 36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. लोकसहभागातून गाळ काढणे व रिचार्जशॉफ्टची प्रत्येकी दोन कामांच्या माध्यमातून अनुक्रमे 12 व 5.40 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सिमेंट नालाबांध खोलीकरण जिल्हा परिषद यंत्रणेअंतर्गत झालेल्या कामाद्वारेही सहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. लोकसहभागातून 2400 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत नाला खोलीकरण बांधावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची व शिवारातील विहिरी व बोरवेअलच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गावातील फळपिके व मसाला पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. यामध्ये संत्रा- आठ हेक्टर, डाळींब 5.50 हेक्टर, पपई- दोन हेक्टर, केळी- दोन हेक्टर, हळद- 5.50 हेक्टर, मिरची चार हेक्टर यांचा समावेश आहे. रब्बी हंगामात गहू, हरबरा, भाजीपाला क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत तीन सामूहिक शेततळ्याद्वारे 30 टीएमसी पाणीसाठा झाला असून संरक्षीत सिंचनाचे क्षेत्र 30 हेक्टर झाले आहे.
पावसाळ्यामध्ये जास्तीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे शेततळी भरण्यात येत असून त्यामुळे 30 हेक्टर फळबाग, भाजीपाला, टरबूज व काकडी पिकांना शेतकरी संरक्षीत सिंचन म्हणून शेतकरी पाण्याचा वापर करीत आहेत. पान्हेरा येथे नाला खोलीकरण क्र-२ येथे परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते तसेच आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. सुखदेव, कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ तसेच संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान आता लोकचळवळ झाली असून वाढत्या लोकसहभागामुळे ही कामे यशस्वी होत आहेत. अभियानअंतर्गत यापुढेही जलसंधारणाच्या विविध कामांद्वारे पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी व जमिनीत जिरविण्यासाठी नियोजन करून विहिरींचे, बोअरचे पुनर्भरण तसेच रिचार्ज शाफ्टसारख्या कामांवर विशेष भर देऊन भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.रावते यांनी केले आहे.
संकलन -जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2023
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...
मृद् व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमा...