सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील तरुण शेतकरी रमेश आव्हाड यांनी कष्टाने आपल्या जिरायती शेतीचे रुपांतर बागायती शेतीत केली आहे. त्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत खडकाळ डोंगरावर डाळींबाची बाग उभी केली आहे.
रमेश यांच्याकडे 50 एकर जागा आहे. मात्र सर्व डोंगराळ भाग असल्याने आणि वडिलांनी शेताकडे फारसे लक्ष न दिल्याने पावसाळ्यानंतर गवताचे रान असायचे आणि त्यानंतर उजाड डोंगर दिसायचे. रमेश यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शेतीत लक्ष घातले. आपल्या कष्टाने त्यांनी शेतजमीन कसण्यास सुरूवात केली आणि जिरायती क्षेत्रही वाढविले.
सुरूवातीला बाजरी आणि भात पिके घेतली जात असत. मात्र एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आणि जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावनाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने पाण्याची उपलब्धता झाली. या सुविधेचा पुरेपूर लाभ घेत रमेश यांनी धाडसी पाऊल टाकीत डाळींबाची बाग लावली. त्यासाठी त्यांनी बँकेकडून दीड लाख कर्जदेखील घेतले. जलयुक्तच्या माध्यमातून नाल्यातला गाळ काढला जात असताना त्यांनी गाळ शेतात टाकून घेतला.
रमेश आव्हाड - खडकाळ जमीन बघून बँकांनी सुरवातीला कर्ज नाकारले होते. आता शेत बहरल्याचे बघितल्यानंतर बँकेचे अधिकारी कर्ज देण्यासाठी तात्काळ तयार होतात. पूर्वी 50 हजाराच्या घरात असणारे उत्पन्न आता तीन लाखावर गेले आहे. जलयुक्तच्या माध्यमातून शाश्वत सिंचन सुविधा झाल्याने चांगले दिवस आले आहेत. |
हा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी बागायती क्षेत्र वाढविण्यास सुरूवात केली. पेरू, सिताफळ, पपई आदी फळझाडे त्यांनी शेतात लावले. मिरची, टोमॅटो, कांदे यासारखी भाजीपाला पीकेही ते घेऊ लागले आहेत. त्यांनी गोपलानाकडेही लक्ष दिले. गायीसाठी घास ते शेतातच पिकवितात. दररोज 40 ते 50 लीटर दूध विकून त्यांना साधारण हजार रुपये उत्पन्न दररोज मिळते.
कृषी विभागाने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. बागायती करताना ठिबक सुविधेसाठी त्यांनी तीन एकरात 27 हजारांचे अनुदान देण्यात आले. मिरचीचे पीक घेताना मल्चिंगसाठी पूर्वसंमतीदेखील देण्यात आली आहे. पॅक हाऊससाठी दोन लाखाचे अनुदान देण्यात आले. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मे 2017 मध्ये त्यांनी प्रशिक्षणही देण्यात आले.
कृषी विभागाचे सहाय्य आणि आपल्या कष्टाच्या बळावर त्यांनी आपल्या शेताचे रुप पालटले आहे. पूर्वी दिसणाऱ्या खडकाळ माळरानावर आता हिरवे शेत बहरलेले दिसते. शेताचे क्षेत्र आणखी वाढविण्याचा प्रयत्न रमेश करीत आहेत. केवळ वयाच्या तिसाव्या वर्षी शेती फायद्यात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीचे चांगले परिणाम दृष्य स्वरुपात दिसत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांसाठीदेखील हा कौतुकाचा विषय आहे.
-डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020