অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थेंब उन्नतीचा..!

थेंब उन्नतीचा..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगत शेतीसाठी शाश्वत सिंचनावर नेहमीच भर दिला आहे. शासनानेदेखील त्यादृष्टीने अनेक योजना केद्र सरकारच्या सहकार्याने राबविल्या आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे शाश्वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच शेती उत्पादनातही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात ही योजना प्रभाविपणे राबविण्यात आली असून एकवीस हजार शेतकऱ्यांच्या शेतात सुक्ष्म सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्त उत्पन्न मिळावे याउद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2015-16 पासून सुरू करण्यात आली.त्यात पूर्वीची केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना समाविष्ट करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेअंतर्गत सर्व पिकांचा समावेष करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा बागायती शेती आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षे आणि डाळींबासह शेतात पिकणारा भाजीपाला मुंबई आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. एकूणच भौगोलिक रचना आणि पावसाचे असमान वितरण यामुळे ऑक्टोबरनंतर धरणाद्वारे होणाऱ्या सिंचनावर बऱ्याचदा अवलंबून रहावे लागते. पाण्याचे प्रमाण मर्यादीत असल्याने शेतात अधिक उत्पादन घेण्यावरही मर्यादा येतात. मात्र सुक्ष्म सिंचन सुविधेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. अर्थातच त्यामुळे अधिक क्षेत्राला सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे.

ठिबक सिंचनाद्वारे 40 ते 50 टक्के आणि तुषार सिंचनामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची बचत होते. सुक्ष्म सिंचन योजना राबविण्यास सुरूवात झाल्यापासून ई-ठिबक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर 30 दिवसात सुक्ष्म सिंचन सुविधा बसविण्यात येते. किंमतीनुसार अल्पभूधारकांना 60 टक्के आणि सर्वसाधारण भूधारकांसाठी 45 टक्के अनुदान देण्यात येते. जास्तीत जास्त 5 हेक्टरपर्यंत सुक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात कृषि विभागाने विविध प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सुक्ष्म सिंचनाचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले. शेतकऱ्यांना शेतावर जावून मार्गदर्शनही करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. द्राक्ष, कांदा, कापुस, डाळींब, टोमॅटो, मिरची, शेवगा, मका, सोयाबीन आणि ऊस आदी पिकांना याचा फायदा झाला आहे.

गेल्या तीन वर्षात एकूण 21 हजार 209 लाभार्थ्यांना एकूण 47 कोटी 19 लक्ष रुपयांचे अनुदान सुक्ष्म सिंचनासाठी देण्यात आलेले आहे. त्यामुळे 14 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आलेले आहे. 2017-18 या वर्षासाठी आतापर्यंत सात हजार 658 लाभार्थ्यांना सोळा कोटी 57 लाखच्या अनुदानासाठी पुर्वसंमती देण्यात आली आहे. शाश्वत आणि योग्य सिंचनपद्धतीच्या उपयोगामुळे वाढणारे शेती उत्पादन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणारे ठरले आहे.

गेल्या तीन वर्षातील प्रगती-

ठिबकचे लाभार्थी 19हजार 063 ,क्षेत्र (हे.)- 12हजार 977.48, रक्कम (लाख) - 4 हजार 425.81

तुषारचे लाभार्थी 2 हजार 146, क्षेत्र (हे.)- 1 हजार 201.50, रक्कम (लाख) -   293.92.

तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- कृषी विभागामार्फत अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती आणि दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पाणी बचतीचे महत्व पटवून दिल्याने तेदेखील सुक्ष्म सिंचनाकडे वळत आहेत. सुक्ष्म सिंचनामुळे उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळपिके आणि भाजीपाला क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आले आहे.

सुर्यभान जाधव, शेतकरी चाटोरी ता.निफाड-प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत् 0.40 हेक्टर क्षेत्रावर सुक्ष्म सिंचन संच बसवून टोमॅटोची लागवड केल्याने खताची बचत झाली. शिवाय उत्पन्न 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्याने आर्थिक फायदाही झाला आहे.

लेखक: डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate