गडचिरोली जिल्हयातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांनी नोकरी सांभाळत शेतीमध्ये देखील प्रयोगशीलता जपली आहे. जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या लंकेश यांना शेतीचे बाळकडू आईकडून मिळाले. पेशाने शिक्षक असलेल्या लंकेश यांनी धान शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड देत आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करीत या भागात नवा पॅटर्न रुजविला आहे.
नोकरीसोबत शेती
एम.ए. (अर्थशास्त्र) एम.ए. (राज्यशास्त्र) पर्यंत लंकेश यांचे शिक्षण झाले आहे. एका खासगी संस्थेवर ते नोकरी करतात. नोकरी सांभाळून त्यांनी शेतीचा व्यासंग जपला आहे. लंकेश यांचे वडील बाबुराव पाटील भोयर हे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक होते. तब्बल 22 वर्ष त्यांनी संचालकपद सांभाळले. बॅंकेच्या स्थापनेपासून ते संचालक राहिले होते. त्यांच्या निधनानंतर लंकेश यांचे लहान बंधू दुर्वेश हे संचालक आहेत. अशाप्रकारे राजकीय वारसा या कुटूंबाला असल्याने लंकेश यांनी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत नशीब आजमावले आणि ते निवडून सुध्दा आले.
आईकडून मिळाले बाळकडू
वडील बाबुराव पाटील सहकार क्षेत्रात असल्याने ते सातत्याने कामानिमित्त बाहेर राहत. अशावेळी त्यांच्या आईवर घरच्या शेतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी राहत होती. आईसोबत शेतावर जात असल्याने लंकेश यांना शेती व्यवस्थापनाचे धडे मिळत गेले. लंकेश यांचा मुलगा मंगेश हा शेतीत वडीलांसोबत असतो तर मुलगी तृप्ती ही बी.एच.एम.एस. चे शिक्षण नागपूरला घेत आहे.
शेतीमध्ये प्रयोगशीलता
लंकेश भोयर यांची 5 हेक्टर शेती आहे. गडचिरोली जिल्हयात मुख्यत्वे धान लागवड होते. लंकेश भोयर यांनी देखील याच पीकाच्या लागवडीचा पॅटर्न राबविला आहे. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. धानाची एकरी उत्पादकता 14 ते 15 क्विंटल मिळते. रबी हंगामात हरभरा त्यासोबतच उडीद आणि मूग घेतला जातो. हरभरा एकरी तीन ते चार क्विंटल तसेच उडीद, मूगाची एकरी उत्पादकता दोन ते तीन क्विंटल होतो, असे ते सांगतात. गावातील मोकाट गुरांकडून हंगामात पीकांचे नुकसान होते; त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो.
मत्स्यशेतीकडे वाटचाल
कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून त्यांनी 30 मिटर बाय 30 मिटर तसेच तीन मीटर खोल अशा आकाराचे तळे खोदले. बोरी शिवारातील याच शेतात विहीर असून त्यातील पाण्याचा वापर करुन या तळ्यातील पाण्याची लेव्हल कायम ठेवली जाते. या शेततळ्यात त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यव्यवसायाची कास धरली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय सुर्यवंशी, प्रताप कोपनार यांचे मार्गदर्शनात त्यांनी व्यवसायीक शेतीचा पॅटर्न या भागात यशस्वी केला आहे.
मत्स्यशेतीचा केला अभ्यास
त्स्यशेती करण्यापूर्वी त्यांनी छत्तीसगड आणि ओरिसा राज्यात जात तेथील मत्स्यव्यवसायाची माहिती घेतली. ओरिसा राज्यात मत्स्यशेतीच्या विकासाकरीता राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. शासनाकडून मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना डॅम (धरणा) चे पाणी उपलब्ध करुन दिले जाते. त्याकरीता कोणत्याच प्रकारचे शुल्क देखील आकारले जात नाही. त्यासोबतच सौर उर्जेवरील दिव्यांकरीता 80 टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. तळे खोदण्याकरीता 50 टक्के अनुदान दिले जाते. दर चार ते पाच वर्षांनी तलावातील गाळ काढण्याकरीता देखील अनुदान देण्याची सोय आहे. हॅचरी किंवा मत्स्यखाद्य लघु उद्योग उभारणीकरीता देखील 50 टक्के अनुदान तेथे दिले जाते. अशाप्रकारच्या मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा मात्र महाराष्ट्रात अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोड्या पाण्यातील माशांच्या संगोपनाकरीता खास प्रकारचे खाद्य लागते. राजनांदगाव (छत्तीसगड) येथे अशाप्रकारचे मत्स्यखाद्य उत्पादन होते. तेथून वाहतूकीचा खर्चासह हे खाद्य 35 ते 37 रुपये किलोला ते विकत आणतात. धान, तणस व इतर घटकांचा यात वापर होतो, असे तपासणीअंती त्यांच्या लक्षात आले. धानाचे तणस गडचिरोली जिल्हयात सहज उपलब्ध होणारा घटक आहे. त्यामुळे मत्स्यखाद्यावरील हा खर्च कमी करण्याकरीता स्वतःच मत्स्यखाद्य उत्पादन करण्याचे त्यांनी प्रस्तावीत केले आहे. मत्स्यखाद्य उत्पादन उद्योगाकरीता बॅंकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी सांगीतले.
माशांची उत्पादकता
फंगस (स्थानिक भाषेत जरंग) पाच हजार नग, कथला, रोहू आणि सायंप्रस जातीच्या माशांचे संवर्धन त्यांच्याव्दारे केले जात आहे. 1 किलो ते 1 किलो 400 असे वजन फंगस माशांचे मिळत आहे. सद्यस्थितीत आठवड्याला 2 क्विंटल माशांची उत्पादकता मिळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून त्याच्या विक्रीस सुरवात करण्यात आली. व्यापाऱ्यांना 100 रुपये किलो या घाऊक दराने माशांची विक्री होत असून मार्केटमध्ये 140 रुपयांना हे मासे विकल्या जात आहेत. एक किलो माशाचे वजन असल्यास आणि तो 100 रुपयांना विकल्यास त्याच्या उत्पादनावर सरासरी 65 ते 70 रुपयांचा खर्च होतो आणि 30 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे.
राईसमिलमध्ये होते प्रक्रीया
भोयर कुटूंबीयांची गावात राईसमिल आहे. गडचिरोली जिल्हयात चार महिन्याचा हंगाम राहतो. या काळात घरच्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रीया करुन देण्यावर त्यांचा भर राहतो. 80 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे प्रक्रीया करुन दिली जाते. हंगामात सरासरी 1000 क्विंटलवर प्रक्रीया होते, असे लंकेश यांनी सांगीतले. यातून अतिरिक्त पैसे मिळतात आणि कौटूंबीक गरजा भागविण्यास मदत होते, असे त्यांनी सांगीतले. नोकरी सांभाळून काहीच करता येत नाही, असे म्हणत हातावर हात ठेवून बसणाऱ्यांसमोर लंकेश भोयर यांनी कृतीशिलतेतून नवा आदर्श निर्माण केला आहे.
लंकेश भोयर यांचा संपर्क - 9604226263
- शब्दांकन : कु. चैताली बाळू नानोटे, (महाराष्ट्र शासन शेतीमित्र), निंभारा,पो. महान, ता. बार्शीटाकळी. जि. अकोला
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/29/2020