गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी आधुनिक व पारंपरीक पद्धतीने खरीप हंगामात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. तर सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी देखील रबी हंगामात धानाचेच पीक घेतात. देवरी या नक्षलग्रस्त व आदिवासी तालुक्यात कृषी विभागाने पळसगाव आणि धमदीटोला येथील शेतकऱ्यांना जलसाक्षरतेचे महत्व पटवून दिले आणि गावकरी पाणलोट विकास कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. खरीप आणि रबी हंगामात त्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था भूगर्भातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे झाली.
पळसगाव आणि धमदीटोला ही दोन्ही गावे नक्षलग्रस्त भागात तर येतातच परंतू आदिवासी बहुल असल्यामुळे इथला शेतकरी विकासापासून वंचित होता. पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत या दोन्ही गावांची निवड कृषी विभागाने केली. त्यामुळे या गावात विकासाचा सूर्य उगवला. केवळ पारंपरिक पद्धतीने धानपीक घेणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे नगदी पिकांची कास धरली. गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत या गावांची निवड झाल्यानंतर गाव परिसरातील शेतात, नाल्यांवर, शेततळी, सिमेंट नाला बांध आणि माती नाला बांधण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था झाली.
हा प्रकल्प राबविण्यापूर्वी येथे रब्बी हंगामात भाजीपाला व इतर पिके घेण्याचे प्रमाण फारच कमी होते. रब्बी हंगामात फक्त हरभरा व जवस हिच पिके प्रामुख्याने घेण्यात येत होती.
खरीप हंगामात निसर्गावरच अवलंबून राहून शेती करण्यात येत होती आणि संरक्षित ओलिताचे साधनही पुरेसे नव्हते. संरक्षित ओलिताची सुविधा नसल्यामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट येत होती. खरीप क्षेत्रातील काही क्षेत्र पडीत रहात होते व पाण्याची पातळीही खोलवर गेली होती.
पाणलोट कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी तुकाराम मडावी त्यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्यावर अल्पप्रमाणात भाजीपाला घेत होते. शेताजवळील वाहणाऱ्या ओगळीवर मातीनाला बांध बांधल्यामुळे शेतीची परिस्थिती पालटली. तयार करण्यात आलेल्या बांधापासून आता 25 ते 30 हजार रुपयांचा भाजीपाला मडावी पिकवीत आहेत. खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास कृषी विभागातून 50 टक्के अनुदानावर मिळालेल्या ऑईल इंजिनचा वापर ते करतात. हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्याबरोबरच टमाटर, वांगे, सांभार, मिरची या नगरी पिकाचे क्षेत्रही वाढले आहे.
दुलखा मडावी या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांचा मातीनाल्याला असलेला विरोध मावळला व सर्व शेतकरी बांधवांच्या जमिनीला संरक्षित ओलिताची व्यवस्था झाली. पडित जमिनीवर धानाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली व रब्बी हंगामात मिरची, टमाटर, वांगे व गोबीचे उत्पादन घेतले व उत्पन्नास वाढ झाली. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली.
कोराम यांच्या शेतातील वाहन असलेल्या ओगळीवर बांध बंदिस्ती करण्यात आली व त्यामुळे वहात असलेल्या पावसाचे पाणी अडविण्यास मदत झाली. ह्या बांध बंदिस्तीमुळे संरक्षित ओलिताबरोबरच पडित जमिनीचा पोत सुधारला व धानासोबत इतर भाजीपाला पिकाचे उत्पादनही घेण्यास सुरुवात केली. तयार झालेल्या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या जमिनीमध्ये ओलावा टिकून रहात असल्यामुळे हरभरा, जवस ह्या मुख्य पिकांच्या क्षेत्रामध्ये दीड पटीने वाढ झाली व मार्च-एप्रिल महिन्यापर्यत बंधाऱ्याच्या पाण्यावर शेतकरी भाजीपाला पिकवून उदरनिर्वाह करु लागले.
देवरी तालुक्यातील कृषी विभागाच्या सहकार्याने निवड करण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट झाली. या गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मदतीने पाणलोट विकासाची साथ मिळाली आणि शेतकऱ्यांनी नगदी पिकाची कास धरली. -जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/1/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...