অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग

पाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग

संकटाशी जिद्दीने सामना केला तर एक वेगळा इतिहास निर्माण होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे विक्रमगडचे किरण तुंबडा. भीषण पाणी टंचाईचे जिद्दीच्या व कष्टाच्या बळावर त्यांनी संधीत रुपांतरीत केले.

विक्रमगड तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना पाण्याचे तसेच कामाचे उत्तम नियोजन आणि केवळ जिद्दीच्या जोरावर विक्रमगड तालुक्यातील किरण तुंबडा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर जागेत तैवान जातीच्या पपईची लागवड करुन आर्थिक घडी मजबूत केली आहे. एक एकर पपई लागवडीपासून त्यांना वर्षाकाठी 3 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. तर यातून खर्च वजा करता 2 लाख 75 हजार निव्वळ नफा आहे. विक्रमगड तालुक्यातील खांड येथील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या किरण तुंबडा यांनी केवळ शेती करायची म्हणून दोन वर्षापूर्वी वसई महानगरपालिकेत असलेल्या एसटी वाहक पदाचा राजीनामा दिला आणि माळरान आणि काही खडकाळ जमिनीवर केळी आणि पपई पिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपल्या 4 एकर जागेपैकी 1 एकरवर तैवान जातीच्या केळीची लागवड केली.

जून 2015 च्या सुरुवातीला जमिनीची नांगरणी केली. वाडा तालुक्यातील अनिल पाटील यांच्या नर्सरीतून तैवान या जातीची 850 रोपे आणून एक एकर क्षेत्रावर त्याची लागवड केली. दरम्यान, लागवडीनंतर तुंबडा यांनी खत आणि पाण्याचे योग्य नियोजन केले. विशेष म्हणजे पाण्याची भीषणता असून देखील पपई लागवडीचा धाडसी निर्णय तुंबडा यांनी घेतला. सुरुवातीला विहीर आणि बोअरवेल मारुन देखील पाणी लागले नाही. त्यामुळे हताश न होता तुंबडा यांनी दोन किमी अंतरावरुन धरणाचे पाणी इंजिनच्या सहाय्याने आपल्या विहिरीत साठवून ते पाणी पपईच्या झाडांना दिले. यासाठी त्यांनी ड्रीप (ठिंबक सिंचन) चा वापर केला.

पपई लागवडीनंतर तुंबडा यांना साधारण नऊ महिन्यांनी उत्पन्नाला सुरुवात झाली. दर दहा दिवसांनी पपईच्या फळांची तोडणी केली जाते. एक एकर पपई लागवडीपासून तुंबडा यांना या वर्षी 35 ते 40 टन पपईचे उत्पन्न अपेक्षित आहे. सरासरी दर 10 रुपये धरला असता तीन लाख 50 हजार उत्पन्न मिळू शकणार आहे. मजुरी, रोप, खत, औषध यांचा सुरुवातीचा खर्च एकरी 75 हजार वजा केला असता, दोन लाख 75 हजार निव्वळ नफा या वर्षी त्यांना होणार आहे. एका झाडापासून दोन वर्ष हे उत्पन्न अपेक्षित आहे. पपईची विक्री भिवंडी मार्केटमध्ये करण्यात येत आहे. दरम्यान, किरण यांच्या पपई लागवडीच्या कामात त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा हातभार लागला आहे. किरण यांनी एसटी वाहकाची नोकरी सोडू नये, असे त्यांच्या घरच्यांना वाटायचे. मात्र नोकरी करुन जे आर्थिक उत्पन्न मिळाले नसते ते त्यांनी पपईच्या पिकातून एका वर्षात मिळवले आहे. यामुळे कुटूंबीयही समाधान व्यक्त करत आहेत.

दुष्काळ आणि पाणी टंचाईसारख्या समस्यांना तोंड देऊन उत्तम नियोजनाद्वारे शेती करणारे तुंबडा हे इतर शेतकऱ्यांसाठी उदाहरण ठरतील, हे निश्चित.

लेखक - मनिषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate