अनियमित पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर होणारा विपरित परिणाम आणि त्यामुळे शेती करणे परवडत नाही, ही भावना साधारणत: शेतकऱ्यांमध्ये राहते. शेतीचे अर्थकारण बदलविण्यासाठी पाण्याचा तंत्रशुद्ध वापर किती महत्वाचा आहे याचा आदर्श सावनेर तालुक्यातील खुबाळा या गावच्या प्रगतीशिल शेतकरी श्रीमती पुष्पा दिलीपराव खुबाळकर यांनी निर्माण केला आहे.
पारंपरिक पद्धतीची शेती न करता त्यासोबत दैनंदिन आवश्यक असलेला भाजीपाला व फळ उत्पादनाची जोड देवून शेतीचे अर्थकारण बदलवू शकते हा आत्मविश्वास घेवून खुबाळ्याच्या श्रीमती पुष्पाताई खुबाळकर यांनी गावातील सर्व शेतकरी बांधवांमध्ये निर्माण केला आहे. खुबाळा हे गाव आज भाजीपाला व फळ उत्पादनाचे जिल्ह्यातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत आहे. नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात दररोज सकाळी भाजीपाला पाठविण्याची सुविधा या गावात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने कृषी विज्ञान केंद्राची निर्मिती करुन शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रातून उपलब्ध करुन दिली जात आहे.
उद्यानपंडित पुरस्काराबाबत सांगताना श्रीमती खुबाळकर म्हणाल्या की, शेती परवडत नाही म्हणून इतर व्यवसाय करण्याचा विचार असतानाच सहा एकर शेतीपैकी ठिबक सिंचनाच्या अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाने एक एकरासाठी अनुदान दिल्यामुळे पहिल्याच वर्षी मिरचीसोबत आंतरपीक म्हणून अद्रक घेतले. एका एकरात सुमारे तीन लाख रुपयाचे मिरचीचे उत्पादन झाले. त्यासोबत 40 क्विंटल अद्रकचे उत्पादन घेतले. अद्रकाला 100 ते 125 रुपये किलो भाव मिळाल्यामुळे आलेल्या संपूर्ण रकमेतील चार एकरासाठी ठिंबक सिंचनाची व्यवस्था केली.
विहिरीला पूर्वी पाणी अपुरे पडत होते, परंतु ठिबक सिंचनामुळे संपूर्ण शेती आवश्यकतेनुसार ओलिताखाली आणणे सहज शक्य झाले. ठिबक सिंचनामुळे शेती अधिक फायदेशीर ठरु शकते याचा आत्मविश्वासही मिळाला आणि पती दिलीप खुबाळकर यांनी शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. बारमाही पीक पद्धती अधिक फायदेशीर ठरु शकते. तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायकांनी प्रत्यक्ष शेतीवर येऊन प्रात्यक्षिक करुन दाखविल्यामुळे दोन एकरामध्ये पोपट, चवळी, वाल, भेंडी, टमाटर, काकडी आदी पिके घ्यायला सुरुवात केली. यावर्षी मिरचीपासून एक लाख पंचवीस हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला. त्यासोबत संत्रा, मोसंबी आदी फळ पिकेसुध्दा घ्यायला सुरुवात केली. दिलीप खुबाळकर म्हणाले की, शेती परवडत नसल्यामुळे शेती विकून ऑटो घेणार होतो. परंतु पत्नीच्या आग्रहामुळे शेती विकली नाही. आज शेतीमधून नियमित उत्पादन मिळत असल्यामुळे मुलांना तालुक्याच्या मोठ्या शाळेत शिक्षणासाठी पाठविणे सोपे झाले आहे.
उपलब्ध पाण्याचा ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून वापर केल्यामुळे संपूर्ण शेतीला सिंचन देणे शक्य झाले आहे. खुबाळा या गावात प्रत्येक शेतामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करुन शेती पिकवली जाते. त्यासोबतच सेंद्रीय शेतीचा वापर होत असल्यामुळे भाजीपाला, फळ, मोसंबी, डाळींब यासोबतच पोपटवालला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. किफायतशीर शेतीचे तंत्रज्ञान केवळ आपल्याच शेतात न राहता सर्वांनीच ठिबक सिंचनाचा वापर करावा यासाठी पुष्पाताईंनी संपूर्ण गावभर प्रचार केला. गावात ४६० शेतकरी खातेदार आहेत. त्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सहकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत आहे. यातून गावात निर्माण होत असलेला भाजीपाला बाजारपेठेत पाठविण्यासाठी एकत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मधुमका हे प्रक्रिया उद्योगाला उपलब्ध करुन देण्यासाठी करार केला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक गायमुखे यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एसएमएस सुविधाही उपलब्ध असून यासाठी दिलीप खुबाळकर, सरपंच यादोराव ठाकरे, कृषी सहायक डंभारे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दर बुधवारी ग्रामस्थांसोबत शेती प्रश्नासंदर्भात तसेच नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती सर्व शेतकरी बांधवांना व्हावी यासाठी शेतकरी संवाद हा उपक्रम खुबाळा येथे नियमित होत असल्यामुळे कृषीच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारे केंद्र म्हणून खुबाळ्याची ओळख निर्माण झाली आहे. यासाठी पुष्पाताई दिलीप खुबाळकर यांनी केलेल्या या उपक्रमाची दखल घेवून शासनानेही त्यांना उद्यानपंडित पुरस्कार देवून गौरविले आहे.
-अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/10/2020