नोकरी सांभाळून शेतीचेही चांगले व्यवस्थापन करणे हे कसब आहे. सातारा जिल्ह्यातील राजेंद्र पवार यांनी त्याचप्रकारे ग्रीनहाऊस बेड व पॉट कल्चर (कुंडीत रोपे वाढवणे) पद्धतीने जरबेराची यशस्वी शेती केली आहे. केवळ पाच ते दहा गुंठ्यांत सुधारित तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेतीतून चांगला "अर्थ" शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्यातील धनवडेवाडी या छोट्या गावात राजेंद्र पवार राहतात. गावाला दोन्ही बाजूस डोंगर. राजेंद्र यांची अवघी साडेतीन एकर शेती. विहीर असूनही पाणी कमी असल्यामुळे बागायत क्षेत्र कमीच. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात ते लेबर विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. इच्छाशक्ती असूनही पाण्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन, भुईमूग आदी पिके त्यांना घ्यावी लागायची, त्यातच गावात दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे कुटुंबाचा सर्व खर्च नोकरीवरच भागवावा लागे. अशातच कारखान्यातील मित्राच्या माध्यमातून वर्णे (जि. सातारा) येथील मानसिंग पवार यांच्या ग्रीनहाऊसला त्यांनी भेट दिली. त्यातून प्रेरणा घेत, अभ्यास व माहितीसह 2007 च्या सुमारास पाच गुंठे क्षेत्रावर ग्रीन हाऊसची उभारणी केली. नोकरी सुरू ठेवतच कुटुंबाच्या मदतीने त्यात जरबेरा शेती सुरू केली. यात अडीच फुटांचा गादीवाफा (बेड) असून, त्यात तीन हजार ते 3200 रोपांची लागवड केली. ग्रीन हाऊस उभारणीसाठी सहा लाख रुपयांचे कर्ज काढले. विक्री व्यवस्था व बाजारपेठांचा अनुभव घेत तीन वर्षांत ग्रीन हाऊस कर्जमुक्त केले.
ग्रीनहाऊसमध्ये अजून सुधारणा करणे पवार यांना आवश्यक वाटत होते.
मित्राला सोबत घेऊन जयसिंगपूर, धारवाड येथील ग्रीन हाऊसची पाहणी त्यांनी केली. तेथील कुंडीतील व कोकोपीटवर जरबेराची लागवड पाहिली. त्यानंतर दहा गुंठे क्षेत्रावर या पद्धतीने लागवड करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी सुमारे आठ हजार कुंड्यांची गरज भासली. त्यात कोकोपीट भरले. स्टीलचे रॅक तयार करून त्यात जमिनीपासून सुमारे दोन फूट उंचीवर कुंड्या ठेवण्यात आल्या. एका रॅकमध्ये 28 याप्रमाणे 10 गुंठ्यांत सुमारे 296 रॅक आहेत. सप्टेंबर 2012 मध्ये कुंड्यांमध्ये जरबेराची लागवड केली. रोपांच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार 0ः0ः50, 12ः 61ः 0, 13ः-0-45 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर केला. गरजेनुसार कीडनाशकांची फवारणी केली.
पॉट कल्चरमध्ये पाणी देण्यासाठी पेग सिस्टिमचा वापर केला आहे. यामुळे पाण्याची बचत होते, सर्व रोपांना समान पाणी व खत दिले जाते. पाण्याचे नियोजन हंगामानुसार होते. उन्हाळ्यात दिवसातून तीन वेळा पाणी दिले जाते.
पवार यांनी हैदराबाद, विजयवाडा, दिल्ली, विशाखापट्टणम, लखनौ, लुधियाना या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या, फुलांचा वाहतूक खर्च, दर यांची माहिती घेतली. वर्षातून पितृपंधरवडा व मार्च महिन्यात फुलांचे दर घसरतात, अशा वेळी अन्य वेळी ज्या व्यापाऱ्यांना फुले विकली जातात, त्यांच्याकडून दर बांधून घेतले. हैदराबादसाठी प्रति बॉक्स 80, विजयवाडासाठी प्रति बॉक्सला 125 रुपये वाहतूक दर द्यावा लागतो. उत्तरेकडे हाच दर 250 रुपये आहे. प्रत्येक वेळी देशातील विविध व्यापाऱ्यांकडून दर माहीत करून घेऊन फुले पाठविली जातात. उत्तरेकडे प्रति फूल तीन रुपये, तर दक्षिणेकडे हा दर त्याहून कमी मिळतो.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...