शिक्षणानंतर रोजगाराची समस्या अनेकांपुढे असते. शेतकरी कुटुंबातील युवकही त्याला अपवाद नाहीत. मात्र यातीलच काही आपल्या प्रयत्नांच्या बळावर शेतीव्यवसाय आणखी पुढे नेतात, तो यशस्वी करून दाखवितात. नाशिक जिल्ह्यातील बेलगाव ढगा गावातील दत्तू ढगे या सुशिक्षित युवकाने असेच आपल्या प्रयत्नातून शिक्षण हे जीवनात यश संपादन करण्यासाठी असते हे दाखवून दिले आहे.
ढगे हे मानसशास्त्राचे पदवीधारक आहेत. वडिलोपार्जीत शेती असल्याने त्यांनी मानसशास्त्राऐवजी शेतीतील प्रयोगशीलतेला महत्त्व दिले. लहानपणापासून रोपे तयार करण्याची आवड होतीच, शिवाय शेती करताना नवे प्रयोग करण्यावर त्यांचा भर होता. नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्रात रोपवाटीकेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाला खरी दिशा मिळाली, असे ते आवर्जून सांगतात.
व्यवसायाची सुरुवात दोन गुंठ्यावर रोपवाटीका तयार करून झाली. त्यातून महिन्याला 30 हजार रोपे तयार होऊ लागली. अनुभवातून अधिक शिकत या व्यवसायाचा विस्तार करण्याचा निश्चय त्यांनी केला. शेतातच 10 गुंठे क्षेत्रावर कमी खर्चाचे पॉलीहाऊस उभारले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यावर गावाच्या ओढ्याकाठची जमीन त्यांनी पॉलिहाऊससाठी निवडली. 12 गुंठा क्षेत्रावर स्वत: कमी खर्चाच्या पॉलीहाऊसची रचना करून त्यात कोबीची रोपे विकसित केली. व्यवसायात लाभ वाढत असताना केवळ आर्थिक विचार न करता शेतीचा विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून त्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर मोठे पॉलिहाऊस उभारले. त्यात शिमला मिरचीचे उत्पादन करण्यास त्यांनी सुरूवात केली. त्याशेजारी 10 गुंठ्यावर शिमला मिरचीची रोपवाटीकाही उभारली. शेतासाठी शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळी उभारली. तंत्रज्ञानाचा पुरेपुर उपयोग करीत रोपवाटीका व्यवसायात ते यशस्वी ठरले. मात्र अजूनही त्यांची प्रयोगशीलता कायम आहे.
आज महिन्यात विकल्या जाणाऱ्या रोपांची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. शेजारील जळगाव, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यासोबतच गुजरात, मध्यप्रदेशच्या काही भागातही त्यांची रोपे विकली जात आहेत. शिमला मिरचीलाही स्थानिक बाजारात चांगली मागणी आहे. वार्षिक दहा लाखाचे उत्पन्न येत असून स्थानिकांना या व्यवसायामुळे रोजगारही मिळाला आहे.
शेतात द्राक्षे, पेरु, लिंब आदी उत्पादन घेताना हिरडा, बेहडा, वड, पिंपळ अशा गावठी (पारंपरिक) जाती जतन करण्याकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. शेती फायद्याची करायची असेल तर नवे तंत्र स्विकारावेच लागेल, असे ते ठासून सांगतात. पारंपरिक शेती पद्धतीत बदल घडवून आणत ढगे यांनी मिळविलेले हे यश प्रेरणादायी असेच आहे.
- डॉ. किरण मोघे
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/16/2020
जगण्यासाठी माणूस जसा प्रदेश बदलतो, तसेच एखादे गावद...