रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान, फळझाडे, भाजीपाला आणि मसाला पिकांच्या उत्पादनास अत्यंत अनुकूल असून या पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिने केंद्र व राज्य शासन पुरस्कृत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनाच्या दृष्टिने महत्वाचा असून आंबा, काजू ,व नारळ ही मुख्य फळपिके आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादनाखालील एकूण क्षेत्र 1,64,468 हेक्टर आहे. त्यापैकी आंबा फळपिकाखाली 65,561 हेक्टर काजू 92, 455 हेक्टर, नारळ 5,199 हेक्टर चिकू 1129 हेक्टर व इतर फळपिकाखालील 1,126 हेक्टर क्षेत्र आहे.
रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन विकास कार्यक्रम
राज्यातील कृषी हवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबीचा विचार करुन तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती घडविणे व पडिक जमिनीचा विकास या हेतूने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड ही योजना या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र 38,644 हेक्टर होते. रो. ह. यो. योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन 2016 -17 अखेरपर्यंत जिल्ह्यात 1,27,163 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली असून एकूण 1,51,217 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत एकूण रुपये 12849.52 लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत खालील पिकांची लागवड करण्यास मान्यता दिलेली आहे. आंबा, काजू, चिकू, नारळ, पेरु, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, फणस, कोकम, जांभूळ, कवठ, जोजोबा, बांबू, जट्रोफा, सुपारी सलग पीक, तेलताड, रबर मसाला पिके आंतरपिके व औषधी-सुगंधी वनस्पती आयरन अजुंना, अशोका, बेल, गुग्गुळ, लोध्रा, रक्तचंदन, शिवण, टेटू बेहडा, बिब्बा, डिकेमली, हिरडा, रिठा वावडींग, करंज, पनपिंपरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रती लाभार्थी कमीत कमी 0.10 हेक्टर व जास्तीतजास्त 10 हेक्टरपर्यंत लागवडीचा लाभ घेण्यासाठी मर्यादा आहे. नारळ बागेत मसाला आंतरपिक व भात खाचराच्या बांधावर फळझाड लागवड करण्यासाठी प्रती लाभार्थी कमीतकमी 0.10 हेक्टर व जास्तीत जास्त 2.00 हेक्टर इतक्या क्षेत्रावर लाभ मिळतो.
राज्य पुरस्कृत फलोत्पादन पीक संरक्षण योजना
आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकावरील सर्व किड व रोग नियंत्रणासाठी खरेदी केलेल्या किटकनाशकावर 50 टक्के अनुदान देय आहे. या योजनेअंतर्गत सन 2016-17 वर्षासाठी 3000 हेक्टर क्षेत्रासाठी किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आली असून रुपये 20.00 लाख अनुदान खर्च झालेला आहे. सन 2017-18 करीता रुपये 20.00 लाख रकमेचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतो.
शासकीय रोपवाटिकेचे बळकटीकरण करणे
रत्नागिरी जिल्ह्यातील 7 शासकीय फळरोपवाटिका अस्तित्वात असून शासकीय रोपवाटिकांचे बळकटीकरण करणे योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रोपवाटिकांवरील कलमा व रोपांच्या उत्पादनात गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, सिंचन सुविधा, तांत्रिक व यांत्रिक सुविधा या बाबींचा विकास करण्यात येतो. सन 2016-17 या वर्षी रोपवाटिकांचे बळकटीकरण करण्यासाठी रक्कम रुपये 165.21 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. सन 2017-18 करीता रुपये 175.00 लाख अनुदान प्रस्तावित आहे.
फलोत्पादन पिकांवरील रोग किडींचा सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप आंबा)
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादन पिकांवरील रोग किडींचे सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये 28 किड सर्व्हेक्षकांमार्फत निवडक गावांमध्ये निवडक आंबा बागांचे दर आठवड्याला सर्व्हेक्षण करण्यात येते. या सर्व्हेक्षणामध्ये आढळून आलेल्या नोंदीचा अभ्यास करुन आंबा बागायतदारांना सल्ला देण्यात येतो. या योजनेंतर्गत 50 टक्के अनुदानावर औषधांचा पुरवठा करण्यात येतो.
आंबा व काजू पिकासाठी फळपिक विमा योजना
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा व काजू या दोन महत्वाच्या फळपिकासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना सन 2016-17 पासून डिसेंबर ते मे या कालावधीसाठी लागू आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येत असून अवेळी पाऊस, कमी व जास्त तापमान या प्रमुख बाबीसाठी विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये आंबा पिकासाठी हेक्टरी रुपये 7335 व काजू पिकासाठी रुपये 5095 इतकी रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक आहे.
बिगर कर्जदारांना ऐच्छिक आहे. सन 2014 -15 मध्ये विमा कंपनीकडून 1776 शेतकऱ्यांना रुपये 488.18 लाख वितरीत करण्यात आले आहेत. सन 2015-16 मध्ये 3391 शेतकऱ्यासाठी 3345.53 हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरविला असून विमा कंपनीकडून 3012 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम रुपये 11.96 लाख वितरीत करण्यात आली आहे.
लेखक: राहुल भालेराव
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/25/2020