नगर जिल्ह्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी दुष्काळी परिस्थिती ओळखून रोपनिर्मिती करून शेवंतीची पुनर्लागवड केली. योग्य व्यवस्थापनातून शेवंती चांगली बहरली. उत्तम दर्जा राखल्याने दरही चांगला मिळाला. दुष्काळात हे पीक चांगला दिलासा देणारे ठरले.
नगर जिल्ह्यातील दुष्काळी पारनेर तालुक्यात फुलशेतीचे कायम उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या दोन-चार वर्षांपासूून या भागाला पाणीटंचाईची किंवा अवर्षणाची झळ बसू लागली आहे. त्यामुळे कमी पाण्यात नियोजन करत फुलशेतीतून प्रगती साधण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत.
पारंपरिक पद्धतीने फुलशेती न करता सुधारित तंत्रज्ञानाचा आधार घेत व ठिबक सिंचनाची जोड ते देऊ लागले आहेत. तालुक्यातील हंगा गाव परिसरात फुलांची लागवड साधारण मार्च-एप्रिल महिन्यात केली जाते. या काळात लागवड केलेली फुले मार्केटमध्ये दसऱ्याच्या सुमारास विक्रीस येतात. त्या वेळी दरही चांगले मिळतात. यंदाच्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील नितीन साठे यांना एप्रिल-मेचा हंगाम साधता आला नाही. पाणी नव्हते, मात्र शेवंतीची लागवड मात्र करायची होती. त्यासाठी त्यांनी एप्रिल-मेचा कालावधी रोपे तयार करण्यासाठी वापरण्याचे ठरवले. माळरानावरील हलक्या प्रतीच्या 28 गुंठे जमिनीवर शेवंतीची लागवड करण्याचे नियोजन केले. साठे यांचे गावात खतविक्रीचे दुकान आहे. ते सांभाळताना शेतीकडे मात्र ते दुर्लक्ष करीत नाहीत.
साठे यांनी पावसाळ्याच्या सुरवातीला जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या गावरान राजा या नावाने लोकप्रिय शेवंती वाणाची लागवड केली. त्याआधी नांगरट, मशागत करून घेतली. दोन फूट रुंदीचे व अर्धा फूट उंचीचे गादीवाफे तयार केले. लागवडीपूर्वी शेवंतीची रोपे तयार करण्यासाठी पॉली ट्रेचा वापर केला. रोग-किडींचा प्रादुर्भाव नसलेल्या चांगल्या प्रतीच्या शेवंतीच्या पाच इंच लांबीच्या काशा (सकर्स) वापरून कार्बेन्डॅझिम बुरशीनाशकाच्या द्रावणात त्यांची प्रक्रिया केली. त्यानंतर ट्रेमधील कप्प्यात गांडूळ खत, माती, निंबोळी अर्क, बोनमील एकत्र करून त्यात लावण्यात आल्या. रोपांची उगवण झाल्यानंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डायमिथोएट कीटकनाशकाचा वापर केला. सुमारे दीड महिन्यात पुनर्लागवडीला आलेल्या रोपांची साडेतीन बाय सव्वा फूट अंतरावर लागवड केली. लागवडीआधीच ठिंबक सिंचनाच्या नळ्या अंथरल्याने योग्य जागी रोपांची लागवड करता आली. अठ्ठावीस गुंठे क्षेत्रात सुमारे सात हजार झाडे लावली. झाडांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निवडलेले अंतर लक्षात घेऊनच लागवड केल्याने झाडांची वाढ झाल्यावर दाटी झाली नाही.
खतांचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे समजून लागवडीच्या वेळी 10-26-26, निंबोळी पेंड यांचा वापर केला. सुमारे एक महिन्यानंतर 19-19-19 खत व ह्युमिक ऍसिड यांचा वापर केला. झाडांना कळ्या लागताना 0-52-34 हे खत ठिबक सिंचनाद्वारा दिले. त्यामुळे कळ्यांची वाढ समतोल व वेळेत होण्याला मदत झाली. लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने दोनदा खुरपणी केली. चार दिवसांच्या अंतराने चार तास पाणी पाळ्या दिल्या. कळ्या लागल्यावर दोन दिवसांचे अंतर ठेवून पाणी दिले. ठिबकचा वापर केल्याने दर वेळेच्या तुलनेत पन्नास टक्केही पाणी लागले नसल्याचा साठे यांचा अनुभव आहे.
पिकाच्या वाढीच्या सुरवातीपासूनच रोग-किडींचे नियंत्रण- व्यवस्थापन करण्यावर भर दिला. शेवंतीवरील मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग केले. त्यानंतरही अन्य दोन बुरशीनाशकांच्या ठराविक अंतराने फवारण्या केल्या. किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्लोरपायरीफॉस कीटकनाशकाचे झाडांच्या मुळाशी ड्रेंचिंग केले. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएटची फवारणी केली.
दिवाळीपर्यत साठे यांचा शेवंती प्लॉट संपला. एकूण कालावधीत 28 गुंठे क्षेत्रात सुमारे दोन टन व 200 किलोंपर्यंत फुलांची विक्री केली. किमान दर 80 रुपये तर कमाल दर 125 रुपये मिळाला. सरासरी 100 रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एक लाख दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...