सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यामधील पिंपोडे ब्रुद्रुकमध्ये राहूल रामराव जाधव या एमएससी ॲग्री शिकणाऱ्या तरुणाने एक एकर क्षेत्रात आपल्या वडिलांच्या इच्छेखातर चंदनाची लागवड केली आहे. सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या या भागात मुरमाड जमिनीवर चंदनाची लागवड हा अभिनव प्रयोग अनेकांना मार्गदर्शक ठरेल. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर कृषी क्षेत्रात निश्चितपणे चंदनाचा आर्थिक परिमळ पसरल्याशिवाय राहणार नाही.
रामराव जाधव हे गावामध्ये टेलरींगचा व्यवसाय करतात. जाधव टेलर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सर्वात जास्त चोरी ही चंदनाच्या झाडाची होत असते, तर आपण या झाडाचीच भविष्यामध्ये शेती करायची असा विचार रामराव जाधव यांच्या मनात खूप वर्षापूर्वी आला. त्या दृष्टीने त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांचा मुलगा राहूल हा सध्या राहुरी कृषी विद्यापीठात एमएससी ॲग्री करत आहे. त्याने याबाबत सर्व माहिती गोळा केली. कर्नाटक राज्यातील चंदनाच्या शेतीलाही त्यांनी भेट दिली.
पिंपोड्यामध्येच चंदनाच्या बियापासून रोपे तयार करुन ती एक एकर जागेत लावली आहेत. ही शेती ठिबक सिंचनावर करण्यात आली आहे. चंदनाचे झाड हे दुसऱ्या झाडाच्या मुळांमधून अन्न घेत असते. दीडबाय दीडच्या खड्ड्यामध्ये आणि 10x12 फुट अंतरावर रोपांची लागवड केली. त्यामध्ये 100 ग्रॅम निंबोळी पेंड दीड ते दोन किलो व्हर्मीकंपोस्टचा वापर केला. तीन महिन्यानंतर 15 ग्रॅम डीएपीचा वापर करण्यात येणार आहे. दोन रोपांमधे मलबार लिंब ची रोपे लावण्यात आली आहेत. तसेच दीड फुटावर तुरीच्या बिया टाकून लागवड केली आहे. यामुळे मुळांचा विस्तार चांगला होऊन चंदनाची वाढ ही चांगली होणार आहे.
याच्या लागवडीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमधून हेक्टरी 44 हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्याचबरोबर ठिबकसाठी कृषी विभागाकडून अनुदान मिळाल्याची माहिती राहूल यांनी दिली. दोन वर्षानंतर पहिले उत्पन्न हे तुरीपासून मिळणार आहे. हे उत्पन्न दरवर्षी मिळणार आहे. तर मलबार लिंबपासून 12 वर्षात दोनवेळा उत्पन्न मिळणार आहे. मलबार लिंबच्या एका झाडापासून कमीत कमी साडेसात हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. चंदनाचे उत्पादन हे त्याच्या गाभ्यापासून मिळते. या गाभ्यामधून तेल काढले जाते. एका झाडापासून त्याच्या गाभ्यामधून कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 25 किलो तेल काढले जाते. हे उत्पन्न लागवडीपासून 12 वर्षानंतर मिळणे अपेक्षित आहे. खर्च वजा जाता कमीत कमी साडेतीन कोटींचे एकरी उत्पन्न मला अपेक्षित आहे, असे राहूल म्हणतो.
चंदनाच्या शेतीसाठी सर्वात जास्त खर्च हा त्याच्या संरक्षणासाठी होतो. एकरी 5 लाख रुपये खर्च हा 12 वर्षासाठी येणार आहे. हा खर्च मलबार लिंब, तूर यांच्या उत्पन्नातून काढता येतो. पिंपोड्या सारख्या मुरमाड जमिनीवर राहूलने एकाअर्थी वडीलांच्या मदतीने भगीरथ प्रयत्न करुन चंदन लागवडीचा शास्त्रशुद्ध प्रयोग केला आहे. सध्या चंदनशेती विषयी कुतुहल निर्माण झाले असून अनेकजण त्यांच्या या प्रयोगला भेट देत आहेत. त्यांच्या वडीलांनीही साडेचौदा हजार फुटावरुन पाणी आणून ॲपल बोर आणि डाळींबाचे उत्पादन घेतले आहे.
जाधव कुटुंबियांच्या या चंदन लागवडीच्या यशस्वी प्रयोगानंतर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारी प्रेरणा मिळेल. त्याचबरोबर हा प्रयोग निश्चितपणे कृषीक्षेत्रात आपला आर्थिक परिमळ सुगंधीत करेल यात शंका नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क रामराव जाधव मो.9049439093
लेखक -प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/7/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...