पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बालिया घाटी ह्या खेड्यात अतिशय गरीब आदिवासी लोक राहतात. आरोग्य आणि पोषणासारख्या त्यांच्या मूलभूत गरजाही नीट भागत नाहीत. हे दृश्य बदलण्यासाठी एनपीएमएस ही स्थानिक स्वयंसेवी संस्था कित्येक वर्षं झगडते आहे. २००६ पासून डीआरसीएससी ह्या संस्थेने एनपीएमएससोबत काम सुरू केले आहे. त्यांनी १२-१५ वर्षे वयाच्या मुलांना हाताशी धरून पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित शिक्षण देणे आणि प्रयोगांवर आधारित कार्यक्रम सुरू केले आहेत.
बालिया घाटीचा परिसर पूर आणि दुष्काळ ह्या दोन्ही नैसर्गिक आपत्तींना आलटून-पालटून तोंड देत असतो. तिथल्या गरीब लोकांना निसर्गाच्या ह्या तडाख्यांना तोंड देत कसंबसं जगत राहण्याशिवाय पर्यायच नसतो. परिस्थिती इतकी वाईट आहे की रोजच्या जेवणात भाज्या असतात हे त्यांना जणू माहीतच नाही. २००८ च्या जून महिन्यात ३० मुलांना भाजीपाल्याच्या बियाण्याची २०० पाकिटं वाटण्यात आली. त्यांपैकी १८ मुलांनी आपापली परसबाग फुलवण्यात यश मिळवले.
बाकीच्यांचे प्रयत्न पुरामुळे अक्षरशः पाण्यात गेले. पाणकोबी, पडवळ, दोडका, दुधीभोपळा, तराळी, सुरण, सोयाबीन, काकडी, कारलं, भेंडी, माठ, तारुकला अशा अनेक प्रकारच्या भाज्यांच्या बिया देण्यात आल्या होत्या. बर्याच भाज्या त्यांना माहीतच नसल्यानं सुरुवातीला त्यांची त्या भाज्या खाण्याची तयारी नव्हती. त्यामुळे एनपीएमएसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच ह्या नव्या भाज्या शिजवून त्यांना खाऊ घातल्या. जमिनीचा कस वाढवण्यासाठी ह्या मुलांनी गांडूळखत आणि कंपोस्ट खत स्वतःच बनवले. प्रत्येकाला ३-४ महिन्यांत सरासरीनं १५० किलो भाज्या मिळाल्या. ह्या मुलांनी अनेक बाबींची तपशीलवार नोंद ठेवली - कामाचं स्वरूप, घडलेले बदल, पिकावरच्या किडींचे प्रकार, वनस्पतींचे जीवनचक्र, बियांच्या उगवणीचा दर, मिळालेल्या उत्पादनाचे प्रमाण आणि दर्जा...ह्या नोंदींमुळं ह्या सर्व प्रक्रियेमागची शास्त्रीय कारणं त्यांना समजू शकली. ह्या मुलांच्या पालकांनीही चांगले सहकार्य केलं.
ह्या पर्यावरण-गटातल्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या बरोबरीनेच आसपासच्या खेड्यातल्या लोकांनाही ह्या कार्यक्रमाचा फायदा झाला कारण ह्या मुलांनी जास्तीच्या भाज्या त्यांना वाटल्या आणि अशाप्रकारे परसबाग फुलवण्याचं महत्व पटवून दिलं.
ह्या कर्यक्रमाला ईंडेनहिल्फ ने पाठिंबा दिल.
स्रोत: - डीआरसीएससी न्यूज, अंक तिसरा
अंतिम सुधारित : 9/2/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...