खासगी व्यवसाय सांभाळून ठाणे जिल्ह्यातील जामशेत येथील पोतदार बंधूंनी एकात्मिक फळ व मसाला शेती केवळ अभ्यास व वडिलांच्या मार्गदर्शनातून पुढे विकसित केली आहे. वर्षभर उत्पन्न सुरू राहील या पद्धतीने नियोजन करताना सेंद्रिय शेतीवर अधिक भर दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात निसर्गसौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनाऱ्याने नटलेल्या उत्तर कोकणातील डहाणू तालुक्यात वसलेले छोटे गाव म्हणजे जामशेत. येथील पोतदार बंधूंच्या एकत्रित कुटुंबाची चिकू, आंबा, नारळ व अन्य विविध पिकांची शेती अभ्यासण्याजोगी आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करत वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे प्रयोग येथे झाले आहेत. पोतदार बंधूंचे वडील (कै.) अनंत पोतदार यांनी "इलेक्ट्रिकल कॉंट्रॅक्टर'चा व्यवसाय सांभाळत शेती खरेदी करीत तिचा विस्तार केला. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे निधन (वय वर्षे 78) झाले. संजय, प्रशांत व स्नेहल या बंधूंनी वडिलांकडून मार्गदर्शन घेत ही शेती आणखी विकसित केली आहे.
स्नेहल इलेक्ट्रिकल कॉंट्रॅक्टर असून, त्यांचे बंधू त्यांना व्यवसायात मदत करतात. मात्र शेतीकडे या बंधूंनी जराही दुर्लक्ष केलेले नाही. स्नेहल ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्थेचे (पालघर) सदस्य आहेत. मसाला लागवडीसाठी त्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत ते आवर्जून सहभागी होतात. आई श्रीमती सुमनबाई यांची मोलाची साथ या बंधूंना मिळाली आहे.
सन 1996 मध्ये पोतदार बंधूंच्या वडिलांनी पडीक जमीन सपाट करून चिकूच्या कालीपत्ती जातीची 2200 कलमे आणून लावली. सुरवातीला असलेली 25 एकर चिकूची बाग आता 42 एकरपर्यंत विस्तारली आहे. झाडांची सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली जाते. गांडूळ खत, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क, जीवामृताचे युनिट आहे. चिकूच्या प्रति झाडापासून 250 ते 275 किलो, तर हेक्टरी सुमारे दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते.
बाग दर्जेदार पिकवायची तर शेणखत मोठ्या प्रमाणात पाहिजे.
त्यासाठी आधुनिक पद्धतीने सुसज्ज गाई, म्हशींसाठी 40 बाय 40 फूट आकाराचा गोठा आहे. एकूण 28 जनावरे आहेत. त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होते. जनावरांपासून दररोज 30 लिटर दूध मिळते. दुधाची 30 रुपये प्रति लिटरप्रमाणे जागेवर व 40 रुपये लिटरप्रमाणे डहाणूत विक्री होते. वर्षभरात जनावरांपासून जवळपास 20 ते 25 ट्रक शेण मिळते. ते खड्ड्यांत टाकून चांगल्या प्रकारे कुजविले जाते. काही शेणाची स्लरी करून ती पिकांना दिली जाते. विरंगुळा म्हणून शेतात बदके, हंस पाळले आहेत.
नारळ - बाणवली जातीची सुमारे 325 झाडे आहेत. लहान-मोठे मिळून प्रति झाड 80 ते 100 नारळ मिळतात. डहाणूचे व्यापारी प्रति नग 5 ते 8 रुपये दराने शहाळी खरेदी करतात. धार्मिक व सणासुदीच्या निमित्ताने नारळाला 10 ते 12 रुपये (प्रति नग) दर मिळतो.
आंबा - आंब्याची सुमारे 75 झाडे असून हापूस, केशर, रायवळ, राजापुरी, पायरी आदी जाती पाहण्यास मिळतात. राजापुरी आंब्याचा उपयोग लोणच्यासाठीही करतात. हेक्टरी उत्पादन साडेचार ते पाच टन मिळते. हापूसला 30 ते 35 रुपये, केशर 20 ते 25 रुपये, तर राजापुरीला 20 रुपये प्रति किलो दर मिळतो.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...