অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेंडेवाडीच्‍या माळारानावर रब्‍बीची हिरवाई

जलयुक्‍त शिवार अभियानाचे यश; पाणीदार शेंडेवाडीचे हिरवेगार शिवार.जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून टँकरवर अवलंबून असलेल्‍या शेंडेवाडी गावची जलस्वयंपूर्ण गावाकडे वाटचाल सुरू आहे. गावशिवारातील विहिरी पाण्‍याने तुडुंब भरल्‍या असून त्‍यामुळे आता अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरिपावर अवलंबून असलेल्‍या शेतकऱ्यांनी यंदा रब्‍बी हंगामात गहू, हरभरा ही पिके व डाळींब, सिताफळ या फळ पिकासह भाजीपाला पिकांचे उत्‍पादन घेतले आहे.

संगमनेर तालुका मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर डोंगराच्‍या कुशीत वसलेले दोन हजारावर लोकसंख्‍येचे शेंडेवाडी गाव आहे. 1693 हेक्‍टर क्षेत्रापैकी 775 हेक्‍टर क्षेत्रावर शेती केली जाते. गावातील कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍था शेतीवर अवलंबून आहे. शेंडेवाडीत सरासरी 450 मिलीमीटरपर्यंतच पाऊस पडतो. पडलेल्‍या पावसाचे पाणी अडविण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था नसल्‍याने पाणी वाहून जाते, त्‍यामुळे गावात पुन्‍हा पाणीटंचाई निर्माण होते. गावात पाण्‍याचा कुठलाही स्‍त्रोत नसल्‍यामुळे शेंडेवाडी बारमाही जिरायती गाव म्‍हणून ओळखले जाते. बाजरी, मटकी, हुलगे ही खरिपाची पिके घेतली जात होती. सरपंच उर्मिलाताई काळे, उपसरपंच बाळासाहेब डोळझाके यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी अत्‍यंत बारकाईने ही कामे पूर्ण केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी अशोक कुटे, कृषी सहायक लक्ष्मण भोकनळ, ग्रामसेवक प्रभाकर पोटफोडे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले.

जलयुक्‍त शिवार अभियान

सर्वांसाठी पाणी- टंचाई मुक्‍त महाराष्‍ट्र- अंतर्गत अभियानाची जानेवारी 2015 मध्‍ये थेट शिवारात कामाला सुरूवात झाली. प्रथम गावाचा भौगोलिक अभ्यास झाला. लोकसहभाग वाढू लागला. जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या कामानंतर शेतीतील पीकपद्धती बदलू लागली. शेतकरी भाजीपाला शेती करू लागले. उजाड माळरानात कुसळे दिसणाऱ्या शिवारात पाणी दिसू लागल्‍यामुळे आज शेतकरी, ग्रामस्‍थ आणि महिलांच्‍या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. शेंडेवाडीत साकारलेल्या कामांमुळे सुमारे 150 एकर शेती नव्‍याने सिंचनाखाली येईल, असा अंदाजही पहिल्या टप्प्यात कृषी विभागाकडून बांधण्यात आला आहे. या क्षेत्रात हरभरा, गहू, कांदा, उन्‍हाळी भूईमुग, मका व चारा पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.

पीकपद्धती बदलू लागली


जलयुक्‍त शिवार अभियानाचे काम झाले. माझ्‍या विहिरीला पाणी वाढले. शेततळ्यातील पाण्‍यामुळे कांदा लागवड करणे शक्‍य झाले, पाण्‍यामुळे डाळींब लागवड केली आहे. एकरी 21 क्विंटल गव्‍हाचे उत्‍पादन झाल्‍याचे शेतकरी बाळासाहेब वामन सांगतात. बाळासाहेब वामन यांनी शेतीतील उत्‍पन्‍नातून शेतात टूमदार बंगला बांधला आहे. जलयुक्‍त शिवार योजनेमुळे कांदा, गव्‍हाच्‍या उत्‍पादनासोबतच उन्‍हाळी भुईमुग घेणेही शक्‍य होणार असल्‍याचे विठ्ठल वामन सांगतात.

पाणीबचतीसाठी मल्चिंग


शेंडेवाडी गाव पाणीदार झाले असले तरी गावात पाण्‍याचा वापर अत्‍यंत काटकसरीने सुरू आहे. बाष्‍पीभवन रोखण्‍यासोबतच तण नियंत्रणात मल्चिंग फायदेशीर ठरत असल्‍याचे बाळासाहेब वामन सांगतात. त्‍यांनी मल्चिंग तंत्राचा आधार घेत डाळींब लागवड केली आहे. त्‍यांच्‍याबरोबरच इतर शेतकरी या मल्चिंग तंत्राच्‍या वापराचा प्रयोग जाणून घेत आहेत. मल्चिंग तंत्राच्‍या उपयोगातून नवनव्‍या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे.अशी झाली ठळक कामे
  1. महात्‍मा फुले जलभूमी संधारण अभियानातून 5 व लोकसहभागातून 3 अशी नाला खोलीकरण व रूंदीकरणाची एकूण 8 कामे झाली. यातून अंदाजे 35 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला.
  2. महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन विहिरींचे पुनर्भरण करण्‍यात आले. त्‍यामुळे पाणीपातळीत वाढ झाली.
  3. संरक्षित शेती व फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढले असून गावातील पीक पद्धतीत बदल झाला.
  4. शेंडेवाडी येथे ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून पाझर तलावातून सुमारे 15,000 घनमीटर गाळ उपसण्‍यात आला. यातून सुमारे 15 टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण होण्‍यास मदत झाली.
  5. लोकसहभागातून तीन नाल्‍यांचे खोलीकरण करण्‍यात आले, यातून सुमारे 15 टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे.
  6. शेंडेवाडी येथे लोकसहभागातून 2014-15 व 2015-16 या कालावधीत सुमारे 10 वनराई बंधारे बांधण्‍यात आले.
  7. गावातील जुन्‍या कामाची दुरूस्‍ती व नवीन कामांमुळे अंदाजे 150 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

असा झाला फायदा

  1. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामानंतर गावातील शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळली आहेत. शेततळ्यांचाही भाजीपाला शेतीसाठी चांगला फायदा झाला आहे.
  1. जलयुक्त शिवार अभियानातून काम पूर्ण झाले आणि विहिरींना पाणी वाढले. त्यामुळे खरीप व रब्बी दोन्ही पिके घेता येणे शक्य झाले.
  2. गावात पूर्वी या दिवसात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, आज मात्र टँकरची गरज भासणार नाही.
  3. शेतीला पाणी मिळू लागल्यामुळे उत्पा‍दनात वाढ झाली.
  4. खरिपासोबतच रब्बी हंगाम घेतल्यामुळे उत्पन्न वाढले, पर्यायाने अर्थव्यवस्था सुधारली.

सरपंच म्‍हणतात


शेंडेवाडी गावात गेल्‍यावर्षी या दिवसात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यंदा मात्र गावातील विहिरींना पाणी टिकून आहे. गावात शेतकरी भाजीपाला पिके घेत आहेत. टोमॅटोचे क्षेत्र वाढू लागले आहे. शेतकऱ्यांना दोन पिके घेणे शक्‍य झाल्‍याचे सरपंच उर्मिला भागा काळे सांगतात.

लेखक - गणेश फुंदे,
प्रभारी माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/31/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate