অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ

बाजाराचा नियम आहे, मालाची आवक वाढली की भाव लगेच गडगडतात. हा अनुभव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वश्रृत आहे. नेहमीच कांद्याच्या भावाचे गणित शेतकरी आणि नंतर ग्राहकांच्या बाबतीत व्यस्त असते. एकीकडे भाव न मिळाल्याने चांगला कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो तर कधी दुसरीकडे अव्वाच्या सव्वा भाव देऊन कवडीमोल कांदा ग्राहकांना विकत घ्यावा लागतो. मग हा कांदा शेतकरी आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

आर्थिक फायद्याची शाश्वती

याबाबतीत शेतकऱ्याची परवड थांबावी म्हणून शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदाचाळ उभारणीसाठी अनुदान देण्याची योजना राबविली आहे. या योजनेचा लाभ घेतल्याने शेतकऱ्यांना आता कांदा साठवणे शक्य होणार असून त्यामुळे योग्यवेळी बाजाराचा अंदाज पाहून आपला कांदा बाजारात आणता येणार आहे. त्यामुळे आर्थिक फायद्याची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाल्याने कांद्यामुळे डोळ्यात पाणी न येता ओठावर हसू येत आहे.

शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना या कार्यक्रमांतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

जळगाव तालुक्यातील किनोद गावचे शेतकरी भरत हिम्मत पाटील यांनाही कांदा चाळ उभारणीसाठी 87 हजार 500 रुपये अनुदान मिळाले आहे. या अनुदानातून त्यांनी आपल्या शेतात 18 ट बाय 3 फूट अशा आकाराचे दोन गाळे असलेली व 25 मेट्रीक टन कांदा साठवणुकीची क्षमता असलेली कांदा चाळ उभारणी केली आहे. सध्या पाटील यांनी आपल्या शेतातील कांद्याची काढणी करुन तो चाळीत साठवला आहे.

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सध्या जळगाव जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 66 चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक 17 चाळीसगाव तालुक्यात तर त्या खालोखाल 16 चोपडा या कांदा उत्पादक तालुक्यात आहेत. या चाळींच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना 57 लाख 11 हजार 903 रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले असून या कांदाचाळींमुळे 1650 मेट्रीक टन इतका कांदा साठवणुकीची क्षमता निर्माण झाली आहे. अजुनही लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

उन्हाळी कांदा साठवण

कांदा चाळीत उन्हाळी कांदा साठवण केला जाऊ शकतो आणि तो योग्य पद्धतीने साठवला तर तो चार महिने टिकतो. म्हणजे ऐन ऑगस्ट मध्ये जेव्हा बाजारात कांदा नसतो आणि पावसाळ्यात लागवड केलेला कांदा अद्याप बाजारात यायचा असतो त्याचवेळी साठवलेला कांदा बाजारात आणता येतो आणि त्यातून आर्थिक फायदा हा शेतकऱ्याला आणि पर्यायाने ग्राहकालाही होतो. पावसाळी कांदा हा साधारणतः ऑगस्ट मध्ये लागवड करतात. त्याचे उत्पन्न हे नोव्हेंबर पर्यंत अपेक्षित असते. उन्हाळी कांदा हा डिसेंबर मध्ये लागवड करतात आणि त्याचे उत्पन्न हे एप्रिल मे महिन्यात अपेक्षित असते.

पावसाळी कांदा साठवण करणे हे वातावरणातील आर्द्रतेमुळे शक्य होत नाही, हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे कांदा चाळीत उन्हाळी कांदा साठवून तो योग्य वेळी बाजारात आणणे हे कळलेलं व्यावहारिक शहाणपण प्रत्यक्षात वळतं आहे. हे शेतकऱ्यांना केवळ कांदाचाळीमुळे शक्य होत आहे. त्यामुळे हमखास आर्थिक फायद्याची हमीही आहे.

लेखक - मिलिंद मधुकर दुसाने
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate