অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्री पद्धतीचा अवलंब

श्री पद्धतीचा अवलंब

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरेगाव तालुक्यात प्रथमच मौजा कवलेवाडा या गावात दुबार पीक म्हणजेच श्री पद्धतीचा प्रकल्प राबविण्यात आला. या गावाची उत्पादकता इतर गावाच्या उत्पादकतेपेक्षा कमी असल्यामुळे गावाच्या उत्पादकता वाढीच्या दृष्टीने मौजा कवलेवाडा या गावाची निवड करण्यात आली. गावाची लोकसंख्या 3212 असून उपजिविकेचे मुख्य साधन शेती आहे.

येथील शेतकरी खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात मुख्य पीक भाताचे घेतात. तर रब्बी हंगामात दुबार पीक म्हणून हरभरा, पोपट, लाखोळी व जवसाचे उत्पादन घेतात. या गावातील 434 शेतकरी कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे.
कवलेवाडा येथील श्री मुलचंद ठाकुर यांच्या शेतामध्ये ह्या पद्धतीचा प्रयोग करण्यात आला व इतर शेतकऱ्यांसाठी हे प्रात्यक्षिक प्रेरणादायी ठरले.

या प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करुन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात अधिक उत्पादन वाढीच्या दृष्टीने श्री पद्धतीने भाताची लागवड करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा सभा, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून पीक पद्धतीमध्ये बदल करुन कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे स्विकारुन एकात्मिक पद्धतीने श्री पद्धतीकरीता सुधारीत बियाणांचा वापर करुन त्यावर बीज प्रक्रिया करुन गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करुन 10 ते 12 दिवसात लागवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सन 2013-14 या खरीप हंगामात 143 हेक्टरवर श्री पद्धतीने, 80 हेक्टरवर चारसुत्री पद्धतीने व 102 हेक्टर क्षेत्रावर पारंपरीक पद्धतीने लागवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकात सर्व शेतकऱ्यांचा सहभाग व शेतपीक घेण्यात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची इच्छा पूर्ण झाली व त्याचे समाधानकारक परिणामही त्यांना मिळाले.

या प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आलेल्या दुबार पीक व श्री पद्धतीमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढले. भात लागवड पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा बदल घडवून आणल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन 27 क्विंटलवरुन एमटीयु 1010 वाणामध्ये 40 क्विंटल हेक्टरी उत्पादन घेतले.

या प्रकल्पाच्या सकारात्मक परिणामामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी जास्त उत्पादनाची शाश्वती मिळाली. कृषी विभागाने केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पिकांचे वारंवार निरीक्षण व त्या आधारावर रोग व कीड नियंत्रणाचे उपाय या सर्व बाबींमुळे अधिक पाऊस व ढगाळ वातावरण अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा पीक चांगल्यास्थितीत टिकवून ठेवण्यात यश मिळाले. योग्य व्यवस्थापन व श्री पद्धतीचा अवलंब करुन शेतकरी बांधवांनी यशस्वी पीक उत्पादनाकडे झेप घेतली.

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate