वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील सचिन सारडा यांच्यावर पडलेली शेतीची जबाबदारी ते वडिलांइतकीच प्रयोगशीलतेने पार पाडत आहेत. पारंपरिक शेतीमध्ये प्रयोगाअंती काही बदल करत, केळी, हळद यांसारख्या नव्या पिकाची जोड दिली आहे. त्यातून नोकरीइतकेच किंबहुना अधिक उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे या युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.
- विनोद इंगोले
शिरपूर जैन (ता. मालेगाव जि. वाशीम) येथील रहिवासी दामोदर सारडा कुटुंबीयांची दहा एकर वडिलोपार्जित विहीर बागायत शेती आहे. त्यांची दोन मुले सचिन व सतीश. सचिनचे शिक्षण बी.कॉम., तर सतीशचे बी.ए.पर्यंत झालेले. मात्र, सतीश हे जन्मतः पोलिओमुळे अपंग असल्याने, विद्युत व भेटवस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळतो. त्यातच दामोदर सारडा यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्याने शेतीची जबाबदारी सचिनच्या खांद्यावर आली. सचिननेही नोकरी शोधत बसण्याऐवजी शेतीलाच आपले करिअर मानले. वडिलांच्या प्रयोगशील शेतीचा वारसा तो चालवत आहे.
शेती करायला सुरवात केल्यानंतर सचिन यांनी एका विहिरीवर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये विंधनविहीर घेऊन शेतात सर्वत्र पाइपने पाणी फिरवले आहे. वडील पूर्वी सोयाबीन, हरभरा आणि तूर या सारखी पिके घेत असत. त्यात काही बदल करत, किंवा नवीन पिकांची लागवड त्यांनी केली आहे. वडील दरवर्षी नुसते सोयाबीन पीक घेत. त्यात तुरीचे आंतरपीक घेतले आहे. त्यासाठी सचिन यांनी चार ते सात तासानंतर तूर लावून प्रयोग केले. आता ते सोयाबीनच्या सहाव्या तासानंतर तुरीचा एक तास ठेवतात. साधारणतः सोयाबीनपासूनचा तुरीचा हा तास पाच फुटांवर राहतो. तुरीचे उत्पादन एकरी सरासरी चार क्विंटल मिळते.
महालक्ष्मी जातीच्या बेण्यांची लागवड ते करतात. जळगावमधून दहा रुपये प्रती नगाप्रमाणे केळी बेण्यांची खरेदी केली जाते. एकरी 1700 केळीच्या झाडांची संख्या आहे. केळी लागवडीपूर्वी सात बाय सात फूट अंतरावर बळिराम नांगराच्या साहाय्याने सरी काढण्यात येतात. एक फूट खड्डा खोदत त्यात सेंद्रिय खत टाकले जाते. केळीचा कंद ठेवून खड्डा बुजविण्यात येतो. ठिबकच्या साहाय्याने दर महिन्याला शिफारसीत खतांची मात्रा दिली जाते. जून-जुलै महिन्यात लागवड केल्यानंतर या पिकाला ठिबकद्वारे पाणी व खताचा पुरवठा केला जातो. लागवडीनंतर सरासरी महिनाभराने खत देण्यास सुरवात होते. केळीवरील कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार फवारण्या घेतल्या जातात. पिकाच्या व्यवस्थापनात मालेगावचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह कृषी सहायक एस.पी. चवरे यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे सचिन यांनी सांगितले.
केळीला माल धरल्यानंतर 100 रुपये प्रती झाड याप्रमाणे विक्री करण्यात आली. त्यातून एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यासाठी 40 हजार रुपये उत्पादनखर्च आला.
सारडा यांचा जळगाव येथील व्यापाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क असतो. हंगामामध्ये दरदिवशीचा दराचा आढावा ते घेतात. हाच पॅटर्न हळद दराबाबतही राबविला जातो. हिंगोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून हळदीच्या दराची माहिती घेतली जाते. दर कमी असल्यास वाशीम येथील गोदामामध्ये हळद उत्पादन तारण ठेवून आवश्यक कर्ज रकमेची उचल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन यांचे वडील दामोदर सारडा हेही शेतीत प्रयोग करत पारंपरिक पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करत होते. त्यांना 1997 मध्ये अकोला जिल्हा परिषदेतर्फे शेतीमित्र पुरस्कार मिळाला होता. तसेच ते सहयोग स्वयंसहाय्यता या शेतकरीगटामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयोगशीलतेचा वारसा सचिनही जपतो आहे.
1) कृषी विभाग व करडा कृषी विज्ञान केंद्राच्या सातत्याने संपर्कात. सर्व कार्यशाळांना उपस्थिती.
2) वाशीम जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटत नव्या पिकाकडे वाटचाल.
3) ठिबकचा वापर वाढवण्याचा मनोदय. सध्या केळी व हळद पिकांकरिता करतात वापर.
4) सेंद्रिय खत पुरवठ्यासाठी शेणखताचा वापर.
5) बाजार दर कमी असल्यास विकण्याऐवजी हळद ठेवतात तारण.
संपर्क - सचिन सारडा, 9960833921
माहिती संदर्भ : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...