गावातील राजाराम व विनायक नवले बंधू यांची वडिलोपार्जित सुमारे 22 एकर शेती आहे. त्यात ते विविध पिके घेतात. फ्लॉवर, भेंडी, झेंडू, कांदा ही पिके असतातच. पण दरवर्षी किमान चार ते सहा एकरांवर शेवंतीचे पीक असतेच. नवले बंधूंकडे हे पीक वडिलोपार्जित घेतले जाते. पूर्वी ते काही गुंठ्यांवर असायचे. आता त्याचे क्षेत्र वाढत गेले आहे. ज्या वर्षी दुष्काळी परिस्थिती येते त्या वेळी शेवंतीला टॅंकरने पाणी देऊन व त्यासाठी पैसे खर्च करून हे पीक जगवले जाते. मात्र पिकाचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ दिले जात नाही. शेवंती पीक हे या शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक कणाच झाले आहे.
लागवडीपूर्वी एकरी सुमारे एक ते दोन ट्रक शेणखताचा वापर होतो. त्यानंतर निंबोळी पेड एकरी 150 किलो दिली जाते. डीएपी, कोंबडी खत यांचा वापर होतो. शेवंतीला कळी येण्याच्या अवस्थेत विद्राव्य खते ठिबकद्वारे दिली जातात. शेवंती पिकावर प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडीचा उपचार केला जातो. कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायमेथोएटची फवारणी गरजेनुसार केली जाते.
लागवडीनंतर सुमारे सहा महिन्यांनी काढणीचा हंगाम सुरू होतो. गणेशोत्सव, दिवाळी या काळात फुलांना चांगले दर मिळतात. किमान दर किलोला 40 रुपये, तर 60, 80 रुपये असा वाढत जाऊन तो कमाल 120 रुपयांपर्यंतही जातो. करंडीत व्यवस्थित पॅकिंग करून फुले हैदराबाद, मुंबई (वाशी मार्केट) व पुणे येथे विक्रीसाठी पाठविली जातात. हैदराबादला अन्य बाजारपेठांपेक्षा चांगला दर मिळत असला तरी वाहतुकीच्या दृष्टीने ते परवडत नाही. त्यापेक्षा मुंबईलाच 60 ते 80 रुपये दर घेणे परवडते. खर्च वजा जाऊन एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती पडते.
पाणी कमी असल्याने खरबूज आणि मिरचीची लागवड करण्याचे नियोजन आहे. उन्हाळ्यात ते विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, त्याला चांगला दर मिळण्याची नवले यांची अपेक्षा आहे. प्लॅस्टिक मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही विचार आहे. नवले म्हणतात, की पाण्याची गरज कमी असलेले पीक असून, त्याने आमचे अर्थकारण सुधारले आहे. अनेक शेतकऱ्यांना या पिकातील उत्पन्नापासून ट्रॅक्टर, पीक-अप व्हॅन, ठिबक संच आदी गोष्टी घेणे शक्य झाले आहे. गावात घरटी किमान दहा गुंठे तरी शेवंतीचे पीक पाहण्यास मिळतेच.
त्यामुळे सामूहिकरीत्या विक्री करणे सोपे होते. हंगामात प्रति दिवशी चार ते पाच गाड्यांची वाहतूक सुरू असते.
दसरा-दिवाळी हंगामासाठी गावरान राजा वाणाची निवड केली जाते. या पांढऱ्या रंगाच्या फुलाला अधिक मागणी असते. डिसेंबरमधील फुले शक्यतो पिवळी असतात.
हंगा गाव कायम दुष्काळी असल्याने शेतकऱ्यांना दर वर्षीच पाण्याची टंचाई भासते. गावाची लोकसंख्या सुमारे सात ते साडेसात हजार आहे. येथे रोजगाराचा दुसरा पर्याय नसल्याने अनेक शेतकरी कमी पाण्यावर विविध पिके घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सर्वाधिक शेतकरी शेवंती घेतात. सध्या गावात सुमारे 100 ते 150 शेतकरी त्याची शेती करतात. त्याची विक्रीही सामूहिकपणे करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून चांगला दर घेणे शक्य होते. परिसरात काही गावांनीही हंगा गावाचा आदर्श घेत या पिकाकडे आपला कल दाखवला आहे.
लेखक : संदीप नवले
माहिती संदर्भ : - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...