जळगाव जिल्ह्यात गिरणा व तापी नदीच्या खोऱ्यातील सुपीक, गाळाच्या जमिनीत केळीची शेती होते. एरंडोल तालुक्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेले दापोरी गाव त्याबाबतीत प्रसिद्ध आहे. गावातील मधुकर व विजय पाटील या दोन भावांनी वडिलोपार्जित केळीची शेती सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक समृद्ध केली आहे.
कुटुंबातील तरुण पिढीनेही तंत्रज्ञान आत्मसात करीत त्यात आणखी भर घातली आहे. पाटील बंधू आपल्या 60 एकरांपैकी सुमारे 40 एकरांवर दरवर्षी केळीचे पीक घेतात. बाजारभाव व लहरी हवामानाची जोखीम कमी करण्यासाठी दोन हंगामांत ते लागवडीचे नियोजन करतात. पूर्वी त्यांच्या वडिलांची दोन एकर शेती होती. ती सांभाळत ते बैलगाडीवरून सामग्री वाहतुकीचा व्यवसायही करायचे. मोठ्या कष्टातून त्यातून उत्पन्न जोडत ते नवी शेती जोडत गेले. पुढे त्यांच्या मुलांनीही केळी शेतीचा विस्तार केला.
पाटील बंधू मृग बहर (जून-जुलै लागवड) व कांदेबहर (सप्टेंबर-ऑक्टोबर लागवड) अशा दोन टप्प्यांत केळीची लागवड करतात. त्यांची जमीन काळी व भुरी अशा प्रकारांत आहे. हवामानानुसार जमिनीची निवड केल्यामुळे केळीची निरोगी जोपासना होऊन अपेक्षेनुसार उत्पादनापर्यंत पोचता येते, असा अनुभव पाटील बंधूंचा आहे.
एकरी खर्च 50 हजार रुपयांपर्यंत मिळतो. खर्च वजा जाता बारा ते तेरा महिन्यांत एकरी एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. दोन रुपये प्रति खोड याप्रमाणे बेणे विक्री केली जाते. त्यातून 80 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळते. लागवड ते काढणीपर्यंतचा सर्व खर्च पाटील बंधू रजिस्टरमध्ये लिहून ठेवतात.
जळगाव येथील व्यापारी पाटील बंधूंकडील केळ्यांचा एकसारखा आकार व उत्कृष्ट दर्जा बघून बाजारभावापेक्षा 10 रुपये जादा भाव क्विंटलमागे देतात. जळगाव स्थित जैन कंपनीलाही केळी दिली जातात.
जळगाव जिल्ह्यात केळीत करपा रोगाची मोठी समस्या असते. पाटील बंधूंच्या बागेलाही त्याचा फटका बसला. त्यापासून धडा घेऊन आपल्या बागेत तो येऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय राबविण्यावर पाटील यांनी भर दिला. लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडणे, कार्बेन्डाझिमची त्यावर प्रक्रिया या गोष्टी आवर्जून केल्या जातात. वाढीच्या अवस्थेत बागेची स्वच्छता राखली जाते. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर होतो. हिवाळ्यात तापमानाचा पारा खाली आल्यानंतर बांधावर वाळलेली पाने जाळून बागेतील तापमान नियंत्रित ठेवले जाते. यामुळे बागेत काही वर्षांपासून करपा रोगाने डोके वर काढलेले नाही.
बरेच शेतकरी केळीनंतर रिकाम्या शेतात शक्यतो गहू घेतात. पाटील बंधू मात्र कमी कालावधीत जास्त नफा देणारे उन्हाळी कलिंगडाचे पीक सात-आठ एकरांत घेतात. केळीतील ठिबकचा त्यासाठी उपयोग होतो. एकरी 10 टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातून 40 हजार रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. गहू तसेच मका पिकाच्या तुलनेत कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेणे शक्य होते.
मधुकर पाटील यांची मुले विशाल व संदीप ही नवी पिढी सध्या शेतीची जबाबदारी पाहते आहे. विशालने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. या गावात एसटी बस येणेही अडचणीचे आहे, तर दैनिक कसे पोचणार? मात्र विशाल आपल्या मोबाईलद्वारे इंटरनेटवर कायम ऍग्रोवन वाचतात. त्यातील विविध माहितीचा ते उपयोग करून घेतात. दोन्ही मुलांच्या पुढाकारातून पाटील कुटुंबीयांनी शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने दापोरीलगतच्या शेतात "स्ट्रक्चर' उभारण्यास सुरवात झाली आहे. शेतीला मुबलक शेणखत व पूरक दुग्ध व्यवसायाची जोड मिळावी म्हणून आठ म्हशींचा गोठाही आहे. दररोज एकूण मिळणाऱ्या 20 लिटर दुधापासून 50 रुपये प्रति लिटर दराने सुमारे एक हजार रुपयांची कमाई होते. त्यातून घरखर्च भागविण्यात येतो.
संपर्क -
विशाल पाटील, 9823134970
विजय पाटील, 9372471916
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...