सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्या माध्यमातून नारुर येथील संजय मेस्त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता तब्बल 23 हेक्टरवर हळद लागवडीचे पीक यशस्वीरित्या घेतले असून या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ? यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते हे सर्वश्रृत आहे. यानंतर जिल्ह्याच्या दक्षिण भागात केळी लागवडीतून मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र, या जिल्ह्यात हळद लागवड या नगदी पिकातून लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे. जिल्ह्यात हळद लागवडीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास साधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लुपिन फाऊंडेशन ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत झाली आहे. गेल्या चार वर्षापासून एक एकरपासून हळद लागवडीच्या उत्पादनाला सुरुवात करण्यात आली होती. आता हेच उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 हेक्टरपर्यंत पोहचले आहे.
कुडाळ तालुक्यातील नारुर येथील संजय मेस्त्री या शेतक-याची हळद लागवडीतील यशोगाथा सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या क्षेत्राने आपल्या दोन एकर वरकस जमिनीमध्ये हळद लागवडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. डोंगराळ अशी ही जमीन गेली कित्येक वर्षे विनावापर पडून होती. या जमिनीत या शेतक-यांनी यावर्षी हळद लागवडीचे उत्पादन घेतले आहे. यासाठी या शेतक-याला लुपीन फाऊंडेशनने 600 किलो हळदीचे बियाणे पुरवले होते. या उत्पादनाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच वर्षी सव्वालाख रुपयाची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज या शेतक-याने व्यक्त केला आहे. यासाठी लुपिनचे कृषि अधिकारी प्रताप चव्हाण तसेच लुपिनचे योगेश प्रभू व कार्यक्रम अधिकारी नारायण कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतक-यांनी हे हळदीचे उत्पादन यशस्वीरित्या घेतले आहे.
यापूर्वी या शेतक-याने टिशू कल्चरवर आधारीत केळ्याची लागवड केली होती. या उत्पादनातील यशस्वीता लक्षात घेऊन या शेतक-याने यावर्षी व्यापारी तत्वावर हळदीची लागवड केली आहे. यासाठी शेतक-याला सुमारे 30 हजार रुपये खर्च आला असून सुमारे सव्वालाख रुपयाचे आर्थिक उत्पन्न येणे अपेक्षित आहे. घरची परिस्थिती गरीबीची असली तरी या कष्टाळू शेतक-याने या वरकस जमिनीत हळदीचे सोने पिकवून आपल्या आर्थिक उन्नतीचा मार्ग सुकर केला आहे. जिल्ह्यातील इतर शेतक-यांसाठीही हा प्रकल्प प्रेरणादायी आहे.
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/21/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...