तामिळनाडूच्या कोरडक्षेत्रातील पेरामबलुर जिल्ह्यात मक्याच्या शेतीचे लांबलचक पट्टे सहज दिसतात. परंपरागत पध्दतीने कापूस आणि भुईमूग पिकविणा-या ह्या प्रदेशात, विविध कारणांमुळे शेतकरी मक्याच्या लागवडीकडे वळले आहेत. शेतक-यांना अवाजवी प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा लागत असल्याने कापसाची लागवड आता फायदेशीर राहिलेली नाही. पाऊस उशिरा येण्यामुळे भुईमूग वेळेवर पेरता येत नाही परिणामी नुकसान होते. त्यामुळे मक्याची लागवड तुलनेने सोपा पर्याय वाटतो आहे, जनाव-यांच्या चा-याची मागणी देखील त्यायोगे खात्रीने पूर्ण करता येऊ शकते. अशा परिस्थितीत, AME प्रतिष्ठानाच्या तिरुची एककाने (तिरूची युनिट) पेरामबलुर जिल्ह्याच्या कुण्णम तालुक्यातील चार गांवांतील शेतक-यांच्या गटासह मे 2005 मध्ये काम करायला सुरुवात केली. या हस्तक्षेपाचा मुख्य भर मक्याचे उत्पादन वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यावर होता. तथापि, शेतक-यांशी केलेल्या चर्चेत उघड झाले की, उत्पादन खर्च वाढण्या बरोबरच, उत्पादनाची विक्री करताना होणारे नुकसान हा देखील शेतक-यांना मिळणा-या उत्पन्नात घट होण्यामागे मुख्य घटक होता. म्हणूनच, मका हे एक शेती उत्पादन म्हणून त्याची विक्री करण्यावर लक्ष देण्यात आले.
शेतकरी त्यांनी पिकवलेले धान्य गांवातीलच व्यापा-यांना विकतात. सुगीच्या हंगामात, पेरामबलुरचे व्यापारी हे धान्य खरेदी करण्यासाठी गांवामध्ये येतात. ते आपल्या बरोबर, वजन यंत्रे, पोती आणतात आणि मका लगेच शहराकडे घेऊन जाण्यासाठी त्यांची स्वतःची वाहतूक व्यवस्था देखील असते. ते धान्याचे वजन करतात, 100 किलोच्या पोत्यांमधे भरतात, आणि त्यांच्या लॉर्यांमध्ये भरून पेरमाबलुरला विक्रीसाठी वाहून नेतात.
मक्याचे उत्पादन कमी असो की जास्त प्रक्रिया अशीच असते. त्याला दिली जाणारी किंमत हंगामावर अवलंबून असते. सुगीच्या हंगामात म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान किंमती कमी असतात. शेतकरी हंगामानंतर त्यांचे धान्य लगेच विकून टाकतात, त्यामुळे बाजारात मोठी आवक होऊन त्यांना कमी किंमत मिळते. तरी देखील, शेतक-यांकडे धान्य साठवून ठेवण्यासाठी सोयी नसल्याने, त्यांना नाईलाजाने धान्य कमी किंमतीला विकावे लागते. त्याच्या मोबदल्यात, ते मक्यापासून तयार केलेले पशुखाद्य विकत घेण्यासाठी अधिक रक्कम मोजतात. असे आढळले आहे की शेतक-यांची पिळवणूक होण्याचा मोठा मुद्दा म्हणजे मक्याचे वजन हा होता. वजन करताना भरपूर घोटाळे होतात. काही घोटाळे शेतक-यांच्या लक्षात येत नाहीत. परंतु बहुतांश प्रकरणी, शेतकरी हतबल होऊन मूक साक्षीदार बनून पाहात राहतात. असे म्हणतात, की नियंत्रित बाजारपेठेत सुद्धा असाच व्यवहार चालतो. दलाल, वजनामध्ये घोटाळा करण्यासाठी मक्याची जादा खरेदी करुन 14 टनांच्या वजनामागे रु.1000 पर्यंत कमावतात. या त्रासावर उपाय म्हणून शेतकरी आधीच वजन केलेली पोती वापरुन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्याचा परिणाम असा होतो की व्यापारी अशा गांवाकडे बहुधा फिरकतच नाहीत.
व्यापा-यांकडून अशाप्रकारे पिळवणूक होण्यास बहुधा शेतकरी स्वतःच जबाबदार आहेत. सांगण्यात आलेला उच्च दर आणि स्थानिक व्यापा-यांनी दिलेली पोती यांच्यामुळे शेतकरी सामान्यतः बळी पडतात. अयोग्य वजन पद्धतीमुळे होणारे नुकसान त्यांना पटकन समजत नाही. कमी संख्येतील या शेतक-यांकडे धान्य ही बरेच कमी असते आणि भावासाठी घासाघीस करण्याची त्यांची क्षमता नसते. तसेच, ताबडतोब पैसे हवे असण्याच्या गरजेमुळे परिस्थिति आणखीच बिकट होते. असाच नुकसानाचा फटका मोठ्या प्रमाणात पिकवणा-या शेतक-यांना ही बसतो, कारण पोती आणि साठवणीची जागा त्यांच्याकडे ही नसते.
हा समूह आणि AMEF यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या आधारे, पर्माथुकुडीकाडु गांवच्या विनायगा (विनायका) समूहाच्या शेतक-यांनी, आपला पिकवलेला मका थेट नम्माक्कल इथल्या कुक्कुटपालन केंद्राला विकण्याचे ठरविले. हे केंद्र गांवापासून 160 किलोमीटर वर होते. आरंभी, दोन शेतक-यांनी 14 टन (1 लोड) मका नमाक्कल खाद्य केंद्रावर नेला.
थेट विक्री करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे, शेतक-यांना अनेक समस्या आल्या. प्रथमतः, माल चढ-उतार करणा-या लोकांनी या शेतक-यांची असहाय स्थिती पाहून त्यांचा भाव दर पोते 5 रुपयांवरुन 10 रुपये असा वाढवला. त्यांनी संघटना स्थापन केलेल्या असल्यामुळे, या कामात नव्याने उतरलेल्या लोकांचा गैरफायदा ते घेऊ पाहात होते. या गांवात माल चढ-उतार कामी बाहेरच्या लोकांना वापरण्याची परवनागी नव्हती. दुसरे म्हणजे, हंगाम शिगेला असल्याने, वाहतुकीचे दर 25 टक्क्यांनी वाढविले होते तसेच खाद्य कंपन्यांनी किंमती देखील उतरवल्या होत्या. खाद्य कंपन्यांनी किंमती पाडून मागण्यासाठी नमुन्यातील आर्द्रतेच्या प्रमाणाच्या नोंदीत खाडाखोड करायचा प्रयत्न केला. सुगीचे दिवस असल्याने पोत्याची किंमत देखील 50 टक्के वाढविण्यात आली होती.
तथापि, या समस्येवर कंपनीच्या मालकांनी या शेतक-यांना मदत करण्यासाठी स्वतःहून लक्ष घातल्याने उपाय करता आला. शेतक-यांनी विचारात घेतलेल्या अन्य जोखमींमध्ये, पावसामुळे होणारे नुकसान, व्यवस्थेच्या अभावी विलंब, शेजारच्या राज्यांतून स्वस्त मका आल्याचे खोटे कारण सांगून कंपन्यांद्वारे धान्य नाकारले जाणे व अपघात आणि ट्रक बंद पडण्यासारखे अनुचित प्रसंग यांचा समावेश होता. या शेतक-यांच्या समूहाने निर्धार कायम ठेवल्याने त्यांना या विविध संकटांतून मार्ग काढता आला.
असे निर्बंध असून ही, शेतकरी लक्षणीय नफा मिळवू शकले. वजनकाट्यावर केलेल्या वजनामुळे 14 टनांच्या एका लोडमागे 610 किलो जादा वजन झाले होते. पैशाच्या तुलनेत ही रक्कम 3385 रुपये होती. किंमतीमध्ये नक्कीच फायदा झाला होता. हा मका रु.555 दर क्विंटल भावाने विकला गेला होता. गांवामध्ये दर क्विंटल 500 रुपये भाव देण्यात आला होता. विक्रीसाठी शेतक-यांना जादा खर्च आला होता तरी, त्यांचे निव्वळ उत्पन्न अंदाजे 3.2 टक्क्यांनी वाढले होते. या पुढाकारातून शेतक-यांनी दर पोते रु.13.30 जादा कमावले होते. शेतक-यांनी पोत्यांची खरेदी बिन-हंगामी काळात केली आणि माल भरणे आणि वाहतूक बरेच आधी कंत्राटावर घेतली तर त्यांचे निव्वळ उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढण्यास वाव आहे. आर्थिक लाभांच्या शिवाय, शेतक-यांच्या दृष्टीने या पुढाकारातून मिळालेला अनुभव आणि ज्ञान मूल्यवान आहे.
या दोन शेतक-यांनी उचललेल्या धाडसी पावलांमुळे स्फूर्ती घेऊन, या समूहातील अन्य शेतक-यांना अशीच कृती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. दुर्दैवाने, बर्ड फ्लूच्या हल्ल्यामुळे, नमाक्कलमधील अनेक कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली, त्यामुळे मक्याच्या किंमती चांगल्याच घसरल्या. तरी आशा न सोडता, शेतक-यांनी पर्यायी मार्गांचा विचार केला.
समूहाच्या बैठकीत शेतक-यांनी किंमत स्थिर होईपर्यंत वाट पाहण्याचे ठरविले. ज्यांना पैश्यांची गरज होती त्यांना समूहातील सदस्यांनी मदत केली. चार समूहातील अंदाजे 50 शेतक-यांनी त्यांना चांगला दर मिळेपर्यंत वाट पाहण्याचे ठरवले. त्यांनी दोन महिने विक्री लांबवली आणि नंतर स्थानिक व्यापा-यांना आपले धान्य विकले. त्यामुळे प्रत्येक शेतक-याला दर पोते 10 रुपये वाढीव भाव मिळाला, ज्यायोगे उत्पन्न सरासरी रु.300 नी वाढले. सामूहिक विक्री केल्यामुळे शेतक-यांना वजनकाट्यांतील गैरप्रकार अगदी पूर्णपणे का नसेना, थोड्या प्रमाणात कमी करता येणे शक्य झाले.
पाळीव जनावरे असणा-या शेतक-यांना त्यांचे धान्य पशु खाद्य तयार करण्यासाठी वापरण्यास प्रोत्साहन देण्यात आले. मका आणि अन्य उपलब्ध धान्य जसे हरभरा, भुईमूग आणि तीळ यांच्यापासून पशु खाद्य तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. परिणामी, चार गटांमधील 30 शेतक-यांनी बाहेरुन पशुखाद्य विकत घेण्याऐवजी स्वतःच तयार केले. ह्याचा सरासरी उत्पादन खर्च दर किलो 8 रुपये होता जो व्यावसायिक पशुखाद्याच्या 13 रुपये किलो दरापेक्षा बराच कमी होता. ह्या पुढाकारातून शेतक-यांनी पशुखाद्य खरेदीत दर गाय दरमहा 200 रुपये सरासरी बचत केली. चरबीची टक्केवारी अधिक राहिल्याने, दुधाच्या एकसमान उत्पादनात देखील शेतक-यांना वाढ दिसून आली.
क्र. |
कार्य |
पूर्वीची पद्धत |
थेट विक्री |
फरक |
1 |
वजन करण्यात आलेल्या मक्याचे प्रमाण (किलो) |
14000.00 |
14610.00 |
4.3% |
|
झालेला खर्च |
|
|
|
|
साहित्य (पोती) |
|
1667.50 |
|
|
लोडींग शुल्क |
|
1450.00 |
|
|
वाहतूक |
|
5440.00 |
|
|
अन्य |
|
266.00 |
|
2 |
एकूण खर्च |
|
8823.00 |
|
3 |
एकूण उत्पन्न |
70000.00 |
81085.50 |
15.8% |
4 |
निव्वळ उत्पन्न |
70000.00 |
72262.00 |
3.2% |
स्रोतः AME प्रतिष्ठान
अंतिम सुधारित : 6/21/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...