অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजीर बहराचे व्यवस्थापन

अंजीर बहराचे व्यवस्थापन

1) अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी रासायनिक, वरखतांचा शिफारशीनुसारच वापर महत्त्वाचा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे 900 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद, 275 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे. नत्र समान दोन हप्त्यांत द्यावा. पाण्याचे योग्य नियोजन करावे.

2) बागेस सूत्रकृमींचा उपद्रव आहे की नाही याची प्रत्येक वर्षी पडताळणी करणे गरजेचे आहे, त्यासाठी मुळ्यांचा व माती परीक्षण अहवाल महत्त्वाचा आहे. 
3) मीठा बहर सुरू करण्यापूर्वी जुलै- ऑगस्टमध्ये बागेस खोल चाळणी करण्याची पद्धती आहे. अंजीर फळांच्या वाढीच्या काळात चार ते पाच वेळा खोल चाळणी करण्याची पद्धती आहे. चाळणीनंतर बागेच्या गरजेनुसार खतांचा पुरवठा करून बागेस पाणी देण्यात येते. काही शेतकरी स्लरीद्वारे खतपुरवठा करतात. त्यामुळे फळांचे आकारमान आणि प्रतवारी सुधारण्यास मदत होते. 
4) बागेच्या पश्‍चिमेस व उत्तरेस वाराप्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, मलबेरी, करंज, शेवटा, हादगा, पांगारा, तरवड इत्यादींची लागवड करावी. 
5) अंजीर बागेस चार ते पाच खोडे ठेवावीत. खोडे जमिनीपासून दोन फूट रिकामी ठेवावीत. त्यांना वरचेवर बोर्डो पेस्ट लावावी. बागेत प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. 
6) अंजीर बागेमध्ये फळधारणा व फळांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बहरापासून फळ काढणीपर्यंत सूर्यप्रकाशाचे तेज तेवढेच महत्त्वाचे आहे. सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश उपलब्ध होईल असे झाडाचे आकारमान ठेवावे. 
7) आर्द्रता हा दुसरा घटक झाडाची वाढ, फळधारणा, फळांची वाढ, कीड व रोगांचा उपद्रव यांबाबत पूर्ण परिणाम घडवून आणत असतो; तसेच सततची आर्द्रता 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक व सतत पाऊस असेल तर पानांवर व फळांवर रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. 
8) थंडीपासून अंजीर बागेचे संरक्षण करण्याकरिता बागेभोवती मातीच्या मोठ्या शेगड्या पेटवून धूर धुमसत राहील असे पाहावे, त्यामुळे बागेत धुराचे दाट आवरण तयार होईल, बागेचे थंडीपासून संरक्षण होईल. 
9) फळांची काढणी वेळेत करणे महत्त्वाचे आहे. सकाळी सात ते 12 वाजेपर्यंत फळांची तोडणी करतात. त्यानंतर दोन ते पाच वाजेपर्यंत फळांची प्रतवारी व मार्केटसाठी भरणी करतात. सकाळी तोडणी केली असता पक्ष्यांपासून नुकसान टाळता येते. 
10) एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मित्रकीटकांचा संहार होणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. फवारणीसाठी निवडक कीटकनाशकांचा वापर करावा. 

डॉ. खैरे - 9371015927 
कृषी महाविद्यालय, पुणे

गिरीश सावळे, परतूर, जि. जालना

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate