रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकास शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन ते अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात हरभ-याखाली क्षेत्र वाढत जाऊन सन २०१४-१५ मध्ये १४.२७ लाख हेक्टरपर्यंत पोहचले आणि त्यापासून १o.८८ लाख टन हरभरा उत्पादित झाला. तसेच सरासरी हेक्टरी उत्पादकता ७.६२ क्रेिटल/हेक्टरपर्यंत जाऊन पोहचली. प्रगतिशील शेतक-यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी ३0 ते ३५ कैि. पर्यंत जाऊ शकते असा अनुभव आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर केल्यास या विदर्भातील शेतकरी या पिकासाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात. सन २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील कडधान्य उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट आली आहे. या वर्षी (२०१६) पावसाची सुरवात चांगली झाली असून खरिपातील कडधान्य पेरणी राज्यात बहुतांश क्षेत्रावर पूर्ण होऊन पीक वाढीस लागलेले आहे. हवामानशास्त्र विभागानुसार यापुढील काळातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यादृष्टीने शेतकरी बांधवांनी जिरायत अथवा बागायत हरभरा पेरणी वेळेवर व चांगल्या भारी जमिनीमध्ये करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मररोग प्रतिकारक्षम तसेच अधिक उत्पादनशील वाणांची निवड करून त्याची बियाणे उपलब्धता वेळेवर करणे गरजेचे आहे. पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी या लेखामध्ये दिलेल्या विविध मुद्यांचा निश्चितच उपयोग होईल.
हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील बाबींचे अवलंबन करणे गरजेचे आहे.
हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक ७oo ते १o00 मि.मी. पर्जन्यमान असणा-या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो.
अशा जमिनीत जिरायत हरभ-याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभ-यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.
विशेषत: पीक २o दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: १o अंश ते १५ अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान २५ अंश ते 30 अंश सें.ग्रे. असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणा-या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.
हरभरयाची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया द्याव्यात. खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
जिरायत हरभ-याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १o ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणा-या पावसाचा जिरायत हरभ-याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१0 सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभ-याची पेरणी २० ऑक्टोबर ते १0 नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभ-याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३o सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १0 सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रतिहेक्टरी अपेक्षित रोपाची संख्या मिळते.
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम अ २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति केिली बियाण्यास चोळावे. यानंतर १o किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.
हरभन्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७0 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता १oo किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी- वरंब्यावरही चांगला येतो. ९0 सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.
सुधारित हरभरयाचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटेंश अथवा ५0 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. पीक फुलो-यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १०-१५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३0 ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथिलिन या तणनाशकाची २.५ ते ३ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
सुधारित वाण | कालावधी | उत्पादन (किं /हे.) | वैशिष्ट्ये | |
---|---|---|---|---|
विजय |
जिरायत :८५ ते ९० दिवस बागायत :१०५ ते ११० दिवस |
जिरायत प्रायोगिक उत्पादन :१४ ते १५ सरासरी :१४:०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३५ ते ४० सरासरी :२३.०० उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पादन :१६ ते १८ सरासरी :१६.०० |
अधिक उत्पादनक्षमता , मर रोग प्रतिकारक ,जिरायत,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य ,अवर्षण प्रतिकारक्षम ,महाराष्ट्र ,मध्यप्रदेश,गुजरात राज्याकरिता प्रसारित. | |
विशाल | ११० ते ११५ दिवस |
जिरायत प्रायोगिक उत्पादन:१४ ते १५ सरासरी :१३.०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३५ सरासरी :२०.०० |
आकर्षक पिवळे टपोरे दाने,अधिक उत्पादनक्षमता , मर रोग प्रतिकारक ,अधिक बाजारभाव , महाराष्ट्राकरिता प्रसारित | |
दिग्विज |
जिरायत: ९० ते ९५ दिवस बागायत :१०५ ते ११० दिवस |
जिरायत प्रायोगिक उत्पादन : १४ ते १५ सरासरी :१४.०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३५ ते ४० सरासरी : २३.०० उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पादन : २० ते २२ सरासरी :२१.०० |
पिवळसर तांबूस,टपोरे दाने,मर रोग प्रतिकारक , जिरायत,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य , महाराष्ट्राकरिता प्रसारित. | |
विराट | ११० ते ११५ दिवस |
जिरायत प्रायोगिक उत्पादन:१० ते १२ सरासरी :११.०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३२ सरासरी :१९.०० |
काबुली वाण , अधिक टपोरे दाणे , मर रोग प्रतिकारक , अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित . | |
कृपा | १०५ ते ११० दिवस |
बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३२ सरासरी:१८.०० |
जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वन,दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे सर्वाधिक बाजारभाव , महारष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित . | |
पिकेव्हिके -२ | ११० ते ११५ दिवस | बागायत :सरासरी :१६ ते १८ | अधिक टपोरे दाणे असणारा कबुली वाण,महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित |
|
पिकेव्हिके - ४ | १०५ ते ११० दिवस | बागायत :सरासरी :१२ ते १५ | जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण , महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित . | |
बिडीएनजी -७९७ | १०५ ते ११० दिवस |
जिरायत : १४ ते १५ बागायत :३० ते ३२ |
मध्यम आकाराचे दाणे , मराठवाडा विभागासाठी प्रसारित | |
साकी-९५१६ | १०५ ते ११० दिवस |
बागायत प्रायोजिक उत्पादन:३०-३२ सरासरी:१८ -२० |
मध्यम आकाराचे दाणे , मर रोग प्रतिकारक , जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य ,महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात राज्यांकरिता प्रसारित | |
जाकी -९२१८ |
|
बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३२ सरासरी: १८ ते २० |
पिवळसर तांबूस , टपोरे दाणे,मर रोग प्रतोकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य , महाराष्ट्रा करिता प्रसारित . |
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखाद्ये पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकला फुले येऊ लागताच पाणी द्यावे . बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सर्यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुधा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले,४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ से.मी पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी )देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळन्याचा धोका असतो . स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६o टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.
हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवादेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मूळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभ-याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभ-याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभ-याची एक ओळ टोकण केल्यास हरभ-याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभ-याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.
घाटे अळी ही हरभ-यावरील मुख्य कोड आहे. घाटे अळी ही कोड ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभ-याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १o ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ किलो/ हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी ५ किलो निंबोळी पावडर १o लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी ९o लिटर पाणी टाकावे. असे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील (विषाणूग्रासीत अळ्यांचे द्रावण) ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढे दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
कीटकनाशक | प्रती १ लिटर पाण्यामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण | प्रती १० लिटर पाण्यामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण | कीटकनाशकाचे प्रतीएकर प्रमाण | कीटकनाशकाचे प्रतीहेक्टर प्रमाण |
---|---|---|---|---|
प्रवाही १८.५ टक्के क्लोरअॅन्ट्रीनीलीप्रोल | ०.२० मी.ली. | २.० मी.ली. | ४० मी.ली. | १०० मी.ली. |
प्रवाही ४८ टक्के फ्ल्युबेनडमाइड | ०.५ मी.ली. | २.५ मी.ली. | ५० मी.ली. | १२५ मी.ली. |
स्पिनोसॅड ४५ एससी प्रवाही | ०.४ मी.ली. | ८० मी.ली. | ८० मी.ली. | २०० मी .ली. |
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...