অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोरडवाहू जमीन फुलवणारी....मागेल त्याला शेततळे योजना

कोरडवाहू जमीन फुलवणारी....मागेल त्याला शेततळे योजना

शाश्वत सुरक्षित सिंचन महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करेल, हे एक शाश्वत सत्य आहे. जमिनीत अधिकाधिक जिरलेले पाणी शेतकऱ्यांसाठी प्रगतीच दारे खुली करणार आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, या पाण्याचे योग्य नियोजन होऊन कोरडवाहू भाग अधिकाधिक सिंचनाखाली यावा यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून पाणी जमिनीत जिरविण्यासाठी व पाणी पातळी वाढविण्यासाठी शासनातर्फे विविध योजना यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. त्यातीलच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे रोहयो विभागाची मागेल त्याला शेततळे होय. थेट शेतकऱ्यांना लाभदायक अशा या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात 48 हजार 937 शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात या शेततळ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा थोडक्यात घेतलेला आढावा.......

महाराष्ट्रात प्रत्येक भागात पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात आहे. प्रत्येक भागाचा विकास हा तेथील पावसावर बऱ्याच अंशी अवलंबून असतो. गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या या अनियमिततेचा सामना सर्वांना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरडवाहू व पावसावर अवलंबून असलेल्या भागात पावसाअभावी पिकांवर व उत्पादनावर मोठा परिणाम होतो, परिणामी तेथील अर्थवस्था कोलमडते. यासर्व बाबींचा विचार करून व शेतकऱ्यांकडून झालेल्या मागणीला प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली होती. रोजगार हमी विभागातर्फे 10 ऑक्टोबर, 2016 च्या शासन निर्णयान्वये मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद या योजनेला मिळाला. सद्य:स्थितीत "मागेल त्याला शेततळे" या योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात एकूण 2 लाख 77 हजार 234 इतके अर्ज प्राप्त झाले. तांत्रिकदृष्ट्या पात्र लाभार्थ्यांची संख्या 150237 इतकी आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद व भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रोहयो विभागातर्फे जोमाने ही योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यातूनच आतापर्यंत 48 हजारांवर शेततळी या योजेअंतर्गत पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 7742 इतकी कामे प्रगतीपथावर आहे. या शिवाय अमृतकुंड शेततळे या कार्यक्रमाअंतर्गत 2016-17 या कालावधीत 5 हजार 427 शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अशी राज्यभरात आतापर्यंत एकूण 55 हजार 383 इतकी शेततळी बांधण्यात आली आहे. शेततळ्यांच्या निर्मिीतीमधून उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. शेतकऱ्यांना संजिवनी देणारी ही योजना आहे. असे मत मुंबई येथील ॲग्रीकल्चर फायनान्स कॉपोरेशन कंपनीने नोंदविले होतो तसेच चित्र या योजनेच्या माध्यमातून निर्माण झाले आहे.

शेततळ्यांसाठी तुमच्याकडे काय हवे?

शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही (कोकण व आदिवासी क्षेत्रांमध्ये जमीन धारणेची ही मर्यादा कमी करण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार कोकणात 0.20 तर आदिवासी भागात 0.40 हेक्टर ऐवढी जमीन धारणेची मर्यादा आहे.) तुमची जमीन शेततळ्यांकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. शेततळे, सामूदायिक शेततळ्यांचा या आधी तुम्ही लाभ घेतलेला नसावा. आपले सरकार या वेब पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

प्रत्येक विहीरीमागे २ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

कोरडवाहू भागात सिंचनक्षमता वाढविण्यासाठी, अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजने व्यतीरिक्त अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना कार्यरत आहे. या योजनेतील प्रत्येक विहिरीमुळे दोन हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ८ हजार ९३८ विहिरींची कामे चालू व पूर्णावस्थेत आहे. त्यानुसार या विहिरींमधून 18 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 1 लाख 11 हजार 111 विहिरी बांधण्याचे उद्दीष्ट असल्यामुळे 2 लाख 25 हजारांच्यावर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून ही योजनाही शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. महाराष्ट्र दुष्काळमुकत करण्यासाठी व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी रोहयो विभागाच्या या योजनांची सध्या प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

1 लाख 11 हजार 111 शेततळ्यांचा ध्यास

शाश्वत सिंचनातून शेतकऱ्यांचा विकास

लेखक: आनंद सुरवाडे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate