राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत भूमी अभिलेखांचे संगणकीकरण आणि महसूल विभागाचे मजबूती करणाची योजना केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये ऑनलाईन तलाठी , मंडल निरीक्षक , मंडल अधिकारी (सर्कल) यांच्या कार्यपध्दतीत बदल करण्यासाठी ई-चावडी प्रणालीचा कार्यक्रम राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील 314 तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले असून पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षणही त्यांना दिले आहे. आज जिल्ह्यातील अण्णासाहेब लॅपटॉप उत्कृष्टपणे हाताळताना दिसून येत आहेत.सांगली जिल्ह्यात ई- चावडी प्रणाली योजना जोरदार राबविण्यात येत आहे.
ई- चावडी प्रणाली योजनेमुळे लोकांचे हेलपाटे वाचणार असून वेळेची बचत होणार आहे. यामुळे होणारी दप्तर दिरंगाई टळणार असून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जमिनी व मालमत्तेची कामे तात्काळ करता येणार आहेत. तसेच कागदपत्रही घरच्या घरी उपलब्ध होणार आहेत. ई- चावडी प्रणालीमुळे जमीन नोंदणी सातबारातील सुधारणा यासाठी गावपातळीवरुन तालुका किंवा जिल्हाला हेलपाटे घालावे लागणार नाहीत.
ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय असेल त्यांना आपले सातबारा कोणत्याही वेळी सहजपणे पाहता येतील. त्याची प्रिंटही काढता येईल. इतकी ही प्रणाली पारदर्शी राहणार आहे. नवीन माहिती घालण्यासाठी न्यू बटन दाबा, गाव निवडा, भूमापन क्र.निवडा, संबंधित माहिती भरा , सेव्ह बटन दाबून साठवण करा , गाव नमुना बटन क्लिक करा आणि अहवाल पहा अशा टप्प्यावरचे प्रशिक्षण तलाठ्यांना देण्यात आले आहे. अलिकडे भरती झालेले तलाठी पदवीधर, पदवीत्तर, अभियांत्रिकी पदवी व उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांना ई- चावडीचे प्रशिक्षण चालना देणारे ठरले आहे.
शासनाकडून ई-चावडी अंतर्गत गावातील महसूली लेखांकन पध्दतीचे संगणकीकरण केले जात आहे. ई- प्रणालीमध्ये माहिती तयार होणे आणि बदल्यांची प्रक्रिया राहणार आहे. क्षेत्र व जमीन महसूल यासंबंधीचे लेखे जमीन महसूल व वसूली योग्य आहे अशा व्यक्तीबाबतचे महसूली लेखे,वसूली व ताळेबंद याच्या संबंधित बाबी सामान्य प्रशासनाच्या आकडेवारीशी संबंधित महसूली, लेखे, नमुने आणि नोंदवह्यांचा ई- चावडी प्रणालीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी केली असेल तर दस्त खरेदी झाल्यानंतर तात्काळ तलाठ्यांना एसएमएस सेवेव्दारे मेसेज मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तलाठी, सर्कल, भूमी अभिलेखचे सर्व कर्मचारी यांना गेल्या आठवडाभर जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात ई- चावडी प्रशिक्षणाची शाळा सुरु केली आहे. या शाळेत जिल्ह्यातील 321 तलाठी व 50 मंडल अधिकारी सहभागी झाले आहेत, 314 तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण एप्रिल अखेरपर्यंत चालणार आहे.
या कार्यप्रणालीत आठ आकड्याच्या सेन्सर्स कोडला अधिक महत्त्व आहे त्यात प्रथम जिल्हा त्यानंतर तालुका , गाव आणि मग संबंधित तलाठ्याचा आयडी अशी रचना करण्यात आली आहे. ठराविक पासवर्ड दिल्याशिवाय ई- चावडी प्रणाली सुरुच होणार नाही. ई- चावडी प्रणालीची रचना करताना पूर्वीप्रमाणेच स्तर ठेवण्यात आले आहेत. आता त्यात आधुनिकता व नवीन तंत्र आणले आहे.
महसूल विभागाने जवळजवळ सर्व तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करुन देवून ई- चावडी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात राज्यात आघाडी घेतली असून व त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देवून तयार करण्यात येत आहे तसेच पुणे विभागातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही त्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह,अतिरिक्त जिल्हाधिकारी डी.एस.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ई- चावडी योजनेच्या यशस्वीततेसाठी योग्य ते नियोजन केले. सांगली जिल्ह्यात ई- चावडी प्रणाली योजनेचे प्रशिक्षण उत्साहात सुरु आहे. एकूणच हे पाहता गावोगावी ई- चावडी प्रणाली राबविण्यात सांगली जिल्हा आघाडी घेईल यात शंका नाही आणि जनताही म्हणेल सातबारा आता एका क्लिकवर ...!
लेखक : मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...