অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रायगड जिल्हा - पर्यटन

भू-चुंबकीय वेधशाळा

एप्रिल १९०४ साली ’’ अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेची ’’ स्थापना करण्यात आली. ही वेधशाळा दोन इमारतीत विभागली असुन एका इमारतीत मॅग्नेटोमीटर बसविलेले आहेत. त्याच्या सहाय्यने भूचुंबकीय क्षेत्रामध्ये दररोज होणार्‍य बदलांची नोंद केली जाते. मॅग्नेटोमीटरच्या सभोवताली एक मीटर रुंदीच्या तीन भिंती आहेत. त्यामुळे मॅग्नेटोमीटर ठेवलेल्या खोलीतील तापमानात जास्त बदल होत नाहीत. दुसर्‍या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्राच्या विविध घटकांचे निरपेक्ष मापन केले जाते. या इमारतीच्या बांधकामामध्ये चुंबकीय गुणधर्म नसलेले पोरबंदर वाळुचे दगड, पितळ व तांब्याच्या वस्तु वापरल्या आहेत.

वेधशाळेमध्ये होत असलेल्या भूचुंबकीय क्षेत्राच्या नोंदींचा उपयोग भूचुंबकीय वादळाची तसेच इतर अनेक चुबकीय कार्यप्रकि्रयांची माहिती मिळण्यास होतो. त्या मुळेच जगभरातील शास्त्रज्ञांकडुन या भूचुंबकीय माहितीला सतत खूप मागणी असते. या वेधशाळेचे जगतास होत असलेले योगदान लक्षात घेवून भारत सरकारने १९७१ साली या वेधशाळेची पुर्नस्थापना ’’ भारतीय भूचुंबकत्व संस्था ’’ विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागा अंतर्गत कार्यरत केली. अधुनिक काळाची गरज लक्षात घेवून अलिबाग येथील भूचुंबकीय बदल नोंदणार्‍या साधनांचे नुतनीकरण केले गेले. ’’ इंटरमॅग्नेट ’’ या अंतरराष्ट्रीय प्रकल्पाची गरज तसेच सहभागाच्या दृष्टीकोनातुन १९९७ पासुन अलिबाग वेधशाळेने १ मिनीट इतक्या सुक्ष्म कालावधीत घडून येणार्‍या भूचुंबकीय बदलांची नोंद करुन ती मिनीटा गणिक अंतरराष्ट्रीय केंद्राकडे पाठविण्यास एप्रिल २००१ पासुन सुरुवात केली.
या वेधशाळेत जवळजवळ १५० वार्षापेक्षा जास्त कालावधीच्या भूचुंबकीय मापनांची नोंद आहे.
सदर वेधशाळा पहाण्यास पुर्व परवानगीची आवश्यकता आहे.

छत्रीबाग


ही बाग आंग्रेकालीन आहे. या बागेत आंग्रे घराण्यातील पुरूषांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या दगडी समाध्या पडक्या अवस्थेत आहेत. दगडांवरील कोरीव काम मात्र अप्रतिम आहे.

कान्होजी आंग्रे समाधी

अलिबाग एस.टी.स्थानकापासून ५ मिनिटांच्या अंतरावर बाजारपेठेकडे जाणार्‍या रस्त्यावर ही समाधी आहे. समाधीच्या आतील भाग अष्टकोनी असून खांबावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. ज्यांनी हे अलिबाग शहर वसविले त्या दर्यासरखेल कान्होजी आंग्रे यांची ही समाधी आहे.

आंग्रेवाडा

एस.टी. स्थानकापासून जवळच विष्णु मंदिरासमोर आंग्रेवाडयाची भव्य इमारत आहे. वाडयात माडीवर दिवाणखाना असून त्यात इतिहासाची साक्ष देणार्‍या वस्तू आढळतात. तसेच कान्हजी आंग्रे यांची गादी व इतर दैवते आहेत.

हाडचे चवदार तळे


महाड हे सावित्री नदीच्या काठावर वसलेले पुरातन कालापसुन प्रसिध्द शहर आहे.

१९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी हरीजनांना सार्वजनीक ठिकाणी पाणी भरण्यासाठी व जात पात भेदभाव दुर करण्यासाठी येथील ’’चवदार तळे ’’ या सार्वजनीक पाणवठयावर सत्याग्रह केला होता.

या लढयाच्या स्मृतीमध्ये तेथे ’’क्रांती स्तंभ ’’ उभारण्यात आला आहे.

फणसाड अभयारण्य

आपल्या देशात बरीचशी अभयारण्ये ही तत्कालीन राजे तसेच संस्थानिक यांनी त्यांच्या शिकारीच्या हौसेकरीता राखून ठेवलेल्या क्षेत्रांपैकी आहेत. नबाब काळातील केसोलीचे जंगल म्हणजेच आताचे फणसाड अभयारण्य ही जंगलसंपत्ती नबाबाचे शिकारक्षेत्र होते. आम जनतेस याठिकाणी शिकार करण्यास बंदी होती. एका बाजूला अरबी समुद्र व दुसर्‍या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश असलेले हे अभयारण्य ५२.७१ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यात बिबळया वाघ तरस कोल्हा सांबर भेकर रानडुक्कर पिसोरी ससे साळींदर व दुर्मळ शेकरू आढळतात.

शेकडो प्रकारचे पक्षी फुलपाखरे वनस्पती औषधी झाडे सरपटणारे विविध प्राणी यांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून पर्यटनाला प्रात्साहन देण्यासाठी वनखात्यातर्फे सुपेगावजवळ निसर्ग भ्रमणाची सोय करण्यात आली आहे.

अभयारण्यात माहिती केंद्रे असून रहाण्याची सोयही उपलब्ध आहे.

फणसाड धबधबा

फणसाड धबधबा जाण्यासाठी अलिबाग-मुरूड रोडवर बोर्ली येथे उतरावे लागते. बोर्लीपासून साधारणपणे तीन ते साडेतीन किमी. अंतरावर फणसाड धबधबा आहे. तेथे जाण्यासाठी बोर्लीवरून ३ किंवा ६ आसनी रिक्षांची सोय उपलब्ध आहे. स्वतचे वाहन असेल तर दुचाकी किंवा छोटी गाडी काजूवाडी पर्यंत यावे. तेथूनच समोर फणसाडचा नयनरम्य फेसाळणारा धबधबा दृष्टीस पडतो. काजूवाडीवरून फलवाटेने पाच मिनिटांत धबधब्यापर्यंत पोहोचता येते. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धबधब्याचा आनंद फक्त वर्षातूनच घेता येतो. धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर वन भोजनाचा आंनद घेण्यासाठी अतिशय योग्य आहे.

गारंबीचे धरण


जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणार सर सिद्यी अहमदखान यांनी व्हक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गांरबीच्या जंगलातील धरणास व्हक्टोरिया वॉटर वक्र्स हे नाव दिले. नैसर्गक पाणी अडवून बांधलेले हे धरण मुरूडच्या पूर्वेला जवळपास आठ किमी. अंतरावर असून हे गारंबी धरण म्हणून प्रसिध्द आहे. मुरूड शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरून पूर्णपणे नैसर्गक प्रवाहाच्या वेगाचा वापर करून पुरविले जाते.

पावसाळयात पर्यटक पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी हमखास याठीकाणी येतात. वनभोजनासाठी हे आदर्श ठिकाण आहे. पाण्याच मूळ प्रवाह दूषित न करण्याचे सामंजस्य बाळगून निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट चहूबाजूस प्रचंड वृक्षराजी मोठे-मोठे खडक वाहत्या पाण्याची गाज पक्षांची किलबील यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातात. (या ठिकाणी प्रवेशासाठी न.पा. मुरूडची परवानगी घेणे आवश्यक आहे.)

नवाबाचा राजवाडा

मुरूड शहरात प्रवेश करतांना आपले लक्ष वेधून घेतो तो नबाबाचा भव्य राजवाडा. सन १८८५ च्या सुमारास नबाब सदर राजवाडयाची निर्मती करून त्या ठिकाणी रहावयास गेले. राजवाडयाचे वास्तुशिल्प मुघल व गोपिक पध्दतीचे असल्याचे समजते. हा राजवाडा नबाबांची खाजगी मालमत्ता असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा भव्य ऐतिहासिक राजवाडा बाहेरून पहावा लागतो. या ठिकाणाहून मुरूड शहर व भोवतालच्या सागरी परिसराचे विलाभनीय दर्शन होते.

ईदगाह मैदान

दत्तमंदिरापासून सुमारे दीड किमी अधिक उंचीवर गेल्यास नबाबकालीन इंदगाह दिसतो. ईदगाहवरून सूर्यास्त दिसतोच. परंतू दत्तमंदिराची टेकडी या ठिकाणावरून खूप विलोभनीय भासते.

आजूबाजूस जंगल व उंच डोंगर यामुळे नैसर्गक शांतीची वेगळीच अनुभूती या परिसरात अनुभवण्यास मिळते.

खोकरी घुमट

सिद्यींचे धर्मगुरू सय्यद अली नजीर व सिध्दी नबाबांच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरीचे घुमट म्हणून हे ठिकाण पर्यटकांना ठाऊक आहे. इतिहासकाळात दंडा-राजपुरी बंदराजवळचे खोकरी हे एक कमी वस्तीचे गाव होते. भारतीय व अरबी पध्दतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना या घुमटांचे शिल्पकाम पहाण्यास चोखंदळ पर्यटक येतात. सिध्दी सिरूलखान सिद्यी खैरियत खान व सिद्यी वाकुतखान यांच्या कबरीसुध्दा याच ठिकाणी आहेत. हे ठिकाण मुरूड आगरदांडा रोडवर मुरूड एस.टी.डेपोपासून जवळपास ६ किमी. अंतरावर आहे.

कुडे लेणी

कुडे मांदाड ही बौध्दकालीन लेणी खाजगी भालगाव पुलामुळे मुरूड शहरापासून दक्षिणेस केवळ २५ किमी. अंतरावर आहेत. मुंबई-गोवा हाय वे वरील माणगांवपासून २१ किमी वर हे गाव राजपूरी खाडीच्या मांदाडउपखाडीवर असून या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर ही लेणी आहेत. ही लेणी पहाण्यास स्वतचे वाहन असेल तर थेट लेण्यांपर्यंत पोहचता येते.

इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी खोदलेली ही लेणी समुद्रसपाटीपासून २०० फुट उंच असून एका डोंगर रांगेत इस १८४८ साली डोंगराच्या कपारीतील या लेण्यांचा शोध लागला. रौद्र कातकाळातील ही २६ लेणी दोन स्तरांत असून लेणी क्र. १ ते १५ खालच्या रांगेत व लेणी क्र. १६ ते २६ वर आहेत. यात ५ चैत्य व २१ विहार असून त्यात ब्राम्ही लिपीतील प्रकृत व संस्कृत शिलालेख आहेत. आत एक भव्य स्तूप आहे. लेण्यांच्या सुरूवातीला असलेले खांबदेखील खूप देखणे असून येथील पाण्याची टाकीही पाहण्यासारखी आहेत.

हा सगळा परिसर पश्चिमाभिमुख असून येथून समोर अथांग अरबी समुद्र पूर्वेस तळा उत्तरेस घोसाळा किल्ला दिसून येतो. शतकानुशतके समुद्रावरून येणारे जोरदार वारे नैरुत्य मान्सुन पावसाचे तडाखे यांना ही लेणी तोंड देत असल्यामुळे काळाच्या प्रवाहात काही शिलालेख व प्रतिमा झिजून अस्पष्ट झाल्या आहेत. तरीदेखील बरेच शिलालेख अजूनही वाचता येतात. ही लेणी म्हणजे भिक्षुकांचे ध्यानधारणा व निवास करण्याचे एकांतातील अतिशय निसर्गरम्य परिसर असलेले त्याच काळातील मोठे स्थान असावे असे वाटते. एससंध दगडी डोंगर कोरून निर्माण झालेल्या लेणी पहाताना पहाणार्‍याच्या चेहर्‍यावर आश्चर्यमिश्रीत भाव सहज उमटतात.

सवतकडा धबधबा

मुरूंड शहराजवळ गारंबी धरणाकडे जावे. या गावातून सायगावमार्गे सवतकडा धबधब्यावर जाता येते. धबधब्यापर्यंत गाडी जाऊ शकत नाही. पायवाटेने डोंगर व शेतातून वनश्रीचा आनंद घेत चालत अर्ध्या तासात धबधब्यापर्यंत पोहचता येते.

पावसाळयात हा जलप्रपात इतका प्रचंड असतो कि थेट पाण्याखाली जाणे अशक्यच. टेंकग वगैरे करणार्‍या साहसी पर्यटकांसाठी मात्र आदर्श ठिकाण आहे.

सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र नंतर हिवाळयापर्यंत धबधब्याचा आंनद घेऊ शकतो. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात.

धबधब्यावर महालोर गाव आहे. फार पूर्वी गुरे चरायला घेऊन जाणार्‍या दोन सवती याठिकाणी एकमेकींचा काटा काढतांना सोबत पडून मृत्यू पावल्या. त्यामुळे यास सवतकडा नाव पडले अशी दंतकथा आहे. इथला निसर्गमात्र वेगळया विश्वात निश्चंत खिळवून ठेवतो.

घारापुरी (एलिफंटा) गुंफा

घारापुरी (एलिफंटा) गुंफा या रायगड जिल्ह्या मधील असलेले व पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिध्द असलेले असे हे ठिकाण आहे. घारापुरी (एलिफंटा) गुंफा या समुद्रामध्ये असलेल्या एका सदा हरित बेटावर साधारणपणे ७ व्या शतकापासुन अस्तित्वात असलेले एक आश्चर्यच म्हणावे लागेल. अत्यंत काळजीपर्वक कातळा मध्ये कापुन बांधलेल्या या गुंफा श्री शंकराला समर्पित आहेत.

येथील जगप्रसिध्द 'महेश मुर्ति' ही शिवाच्या 'निर्माता, रक्षणकार्ता व संहारक' या तीन विविध अंगाची महाती सांगणारी आहे

मुंबई येथील 'गेट वे ऑफ इंडिया' येथुन रोज घारापुरी (एलिफंटा) गुंफा येथे जाण्यासाठी होडीची सेवा असते

घारापुरी (एलिफंटा) गुंफा या दर्शनास दर सोमवारी बंद असतात.

घारापुरी (एलिफंटा) गुंफा या रायगड जिल्ह्या मधील असलेले व पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिध्द असलेले असे हे ठिकाण आहे. घारापुरी (एलिफंटा) गुंफा या समुद्रामध्ये असलेल्या एका सदा हरित बेटावर साधारणपणे ७ व्या शतकापासुन अस्तित्वात असलेले एक आश्चर्यच म्हणावे लागेल. अत्यंत काळजीपर्वक कातळा मध्ये कापुन बांधलेल्या या गुंफा श्री शंकराला समर्पित आहेत.

येथील जगप्रसिध्द 'महेश मुर्ति' ही शिवाच्या 'निर्माता, रक्षणकार्ता व संहारक' या तीन विविध अंगाची महाती सांगणारी आहे.

मुंबई येथील 'गेट वे ऑफ इंडिया' येथुन रोज घारापुरी (एलिफंटा) गुंफा येथे जाण्यासाठी होडीची सेवा असते

घारापुरी (एलिफंटा) गुंफा या दर्शनास दर सोमवारी बंद असतात.

 

स्त्रोत : https://www.zpraigad.maharashtra.gov.in/html/tourism4.htm#26

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate