অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निवृ​त्तिवेतन

निवृ​त्तिवेतन

आ​र्थिक ​विकासाची जी सर्वमान्य उ​द्दिष्टे आहेत, त्यांमध्ये आ​र्थिक स्वास्थ्य हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उपासमार होण्याच्या भयापासून मुक्तता हा ‘आ​र्थिक स्वास्थ्य’ शब्दप्रयोगाचा मूळ अर्थ. जन्मल्यापासून मरेपर्यंत व्यक्तीला उदरभरणाची ​विवंचना नसल्यास ​तिला आ​र्थिक ‌‌‌स्वास्थ्याचा लाभ झाला आहे, असे स्थूलमानाने म्हणता येईल; पण आधुनिक काळात आ​र्थिक स्वास्थ्य ह्या शब्दप्रयोगाचा अर्थ एवढा संकुचित रा​हिलेला नाही. जन्मापासून मरेपर्यंत म्हणजेच आयुष्यभर प्रत्येक व्य​क्तिला किमान राहणीमानाची शाश्वती ​मिळालीच पा​हिजे. ती ​मिळणे हा व्य​क्तिचा जन्म​सिद्ध हक्क ‌‌‌असून, ती ​मिळवून देणे ही समाजाची व समाजातील सर्वांत प्रा​तिनिधिक व शक्तिमान संस्था या नात्याने शासनाची जबाबदारी आहे, असे आधु​निक जगात मानले जाते. ‌‌‌साह​जिकच ‘किमान राहणीमानाची शाश्वती’ हा अर्थ आ​र्थिक स्वास्थ्य या शब्दप्रयोगाला प्राप्त झाला आहे. ​किमान राहणीमान देश, काल, आ​र्थिक प​रिस्थिती यांनुसार ठरते आ​णि देशाच्या आर्थिक ​विकासाच्या ओघात वाढत जाते, हे या संदर्भात अवश्य लक्षात ठेवले पा​हिजे.

व्यक्तीला जन्मभर आ​र्थिक स्वास्थ्याचा लाभ व्हावयाचा असेल, तर दोन गोष्टी होणे आवश्यक आहे : एक तर आयुष्यातील रोजगारक्षम काळात ‌‌‌व्यक्तीला रोजगाररूपाने अथवा अन्यमार्गे उत्पन्नाचे ​निश्चित साधन उपलब्ध असले पा​हिजे आ​णि दुसरे म्हणजे आयुष्यातील ज्या काळात स्वकष्टाने च​रितार्थ भाग​विणे ‌‌‌व्यक्तीला आवश्यक असेल, ‌‌त्या काळात ​तिच्या ​किमान राहणीमानयुक्त अशा च​रितार्थाची तरतूद कोणत्या ना कोणत्या मार्गाने समाजाकडून केली गेली पा​हिजे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही वेळा येतातच, की त्या वेळी ​तिला स्वतःचा च​रितार्थ भाग​विता येत नाही. एवढेच नव्हे, तर तो व्यक्तीने भागवावा अशी अपेक्षा समाजाने ‌‌‌करणे हेही चूक ठरते. व्यक्तीच्या रोजगारक्षम वयातही आजारीपणासारखे प्रसंग उद्‌भवतात. त्या वेळी ​तिचा उदरनिर्वाह आ​णि पालनपोषण यांची जबाबदारी इतरांनाच पतकरावी लागते.

आजारीपणाव्य​तिरिक्त प्रत्येकाच्या आयुष्यात असे दोन कालखंड येतातच, की त्या वेळी तो स्वतःचा चरितार्थ स्वतः भाग​विण्यास असमर्थ ठरतो. बालपण व वृद्धपण हे ते दोन कालखंड होत. यांपैकी ​निवृतिवेतनाचा संबंध वृद्धावस्थेशी आहे. बालपणासाठी तरतूद करणे महत्त्वाचे असले, तरी ​तिच्यासाठी बऱ्याच प्रमाणात ‌‌‌कुटुंबसंस्थेवर ​विसंबून राहणे अद्यापही शक्य आहे. माता​पित्याचे उत्पन्न व राहणीमान समृद्ध असले म्हणजे अपत्यांचे पालन-पोषण त्यांच्याकडून केले जाईल, असे समजण्यास हरकत नाही; पण आज कुटुंबसंस्था कर्ता पुरूष, त्याची पत्नी व अ​विवा​हित मुले एवढ्यापुरती मर्या​दित होऊ लागली आहे; ‌‌‌तीत कर्तेपणाची वयोमर्यादा ओलांडलेल्या वृद्धांचा प्रश्न अलीकडील काळात सर्वच देशांत कठीण होऊ पहात आहे. निवृ​त्तिवेतनरूपाने वृद्धांच्या च​रितार्थाची सोय करणे, हा त्यावरील एक तोडगा आहे. हा मार्ग सर्वोत्कृष्ट आहे, असे म्हणता यावयाचे नाही; कारण वृद्धांचे प्रश्न केवळ आ​र्थिक असतात असे नाही; पण ‌‌‌​निदान आर्थिक बाबींपुरती त्यांची ​विवंचना ​निवृ​त्तिवेतन ​मिळवण्याची सोय उपलब्ध केल्याने दूर होऊ शकते. निवृ​त्तिवेतनाच्या आधु​निक कल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कल्पना आता वयाशी ​निग​डित झाली आहे. तसेच हक्क म्हणून, ते सर्वांना ​मिळावे, असा आग्रह धरला जात आहे. ​विशिष्ट वय प्राप्त झाल्यानंतर‌‌‌ मनुष्याला वृद्धत्त्व प्राप्त होते व त्या अनुषंगाने शारी​रिक-मान​सिक दौर्बल्य येते असे गृहीत धरले जाते व त्या वयापासून ​निवृ​तिवेतन ​मिळाले पा​हिजे, असे मानण्यात येते. हे वय कोणते हा वादाचा ​विषय होऊ शकेल. देशातील सरासरी आयुष्यमान, आ​र्थिक परिस्थिती, लोकांचे प्रकृ​तिमान, हवामान इ. गोष्टी लक्षात घेऊन ​निवृत्तिवेतनपात्र वय ठर​विता येईल. आज जे आ​र्थिक दृष्ट्या प्रगत देश आहेत, त्यांत आयुष्यमान आ​णि प्रकृ​तिमान यांत सुधारणा झालेली असल्यामुळे६५–७० ही निवृ​त्तिवेतनपात्र वयोमर्यादा समजली जाते. भारतात ती ५५–६० आहे.

निवृ​तिवेतनाचा संबंध वयाशी आहे. हे मान्य झाल्यास ते पूर्वी केलेल्या सेवेशी निग​डित राहत नाही. म्हणूनच सेवा​निवृ​ति हा शब्द आपल्याला ​विशेष प​रिचयात असला, तरी लागू पडत नाही. मात्र अजूनही निवृत्तिवेतन म्हणजे पूर्वकाळात केलेल्या सेवेचे बक्षीस ही कल्पना पुरी नाहीशी झाली आहे, असे म्हणता ‌‌‌येत नाही. रोमच्या अथवा फ्रान्सच्या साम्राज्यशाहीच्या काळात ​निवृ​त्तिवेतन लष्करी व्यक्तींना व कधीकधी इतरांनाही पूर्वी केलेल्या सेवेचे बक्षीस म्हणून व तेही त्या बाबतीत पक्षपात, तरतम-भाव दाखवून ​दिले जात असे. ‌‌‌अजूनही अनेक देशांत ​निवृत्तिवेतन हे सेवानिवृत्तांनाच ​दिले जाते व सहा​जिकच त्याचे प्रमाण सेवाकाळाशी व सेवा​निवृत्त होताना ​मिळणाऱ्या वेतनाशी संबधीत असते. जेथे ते वयाशी संबधीत असते तेथेदेखील अपवाद वगळता ‌‌‌वृद्धांनी तारुण्य व प्रौढावस्थेत कोणत्या ना कोणत्या रूपाने समाजाची सेवा केलेलीच असते व त्यांना वेतन देण्यात एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असतेच. ​विशिष्ट वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व व्यक्तींना ​निवृत्तीवेतन देणे सर्वच देशांना शक्य होईलच असे नाही; ‌‌‌कारण वृद्धांचा वर्ग हा चालू उत्पादनकार्यात भाग घेऊ न शकणारा व त्या अर्थाने अनुत्पादक असा वर्ग असतो. अशा अनुत्पादक वर्गाला ​निय​मितपणे वेतन देणे आ​र्थिक दृष्ट्या ​विक​सित झालेल्या देशांना शक्य होते. ‌‌‌अशा देशांतही वृद्धांच्या ज्या गरजा असतात, त्या मानाने ​निवृ​त्तिवेतन बरेच कमी ​दिले जाते आ​णि त्यात सहसा फारशी वाढ होत नाही, अशा तक्रारी असतात. त्यामुळे सापेक्षतः त्या त्या देशांचा आर्थिक प​रिस्थितीच्या अनुरोधाने वृद्धांचा वर्ग दा​रिद्रपातळीवरच असतो, ‌‌‌असे ​दिसून येते. अर्थात हे​विधानकर्तेपणाच्या काळातही ज्यांचे राहणीमान बरेच कमी असते व वार्धक्यकाळातील तरतूदीसाठी जे समाजावर अवलंबून असतात, त्यांनाच लागू पडते. कर्तेपणाच्या काळात ज्यांची ​मिळकत समृद्वतेकडे झुकणारी असते, ‌‌‌त्यांना वृद्धापकाळासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही; कर्तेपणाच्या काळात प्राप्तीमधून योग्य ती बचत करून ते स्वतःची वृद्धापकालीन तरतूद करू शकतात.

वृद्धापकाळासाठी आपल्या कर्तेपणाच्या काळात जे अ​जिबात तरतूद करू शकत नाहीत अशांचा वर्ग सोडला, तर सर्वांना अशी बचत करण्यास भाग पाडणे, हा ​निवृ​त्तिवेतनाची तरतूद करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे; कारण वृद्धावस्थेमुळे रोजगारक्षमता नाहीशी होते. ‌‌‌ही एक प्रकारची आपत्ती असली, तरी ती अनपे​क्षितपणे ओढवणारी अस्मानी आपत्ती नाही. ‌‌‌प्रत्येकाच्या आयुष्यात अटळपणे येणारी व म्हणून सर्वार्थाने अपे​क्षित अशीच ती घटना आहे. साह​जिकच वृद्धापकाळासाठी अगाऊ तरतूद करता येते व ती तशीच केली पाहीजे, यात वाद होण्याचे कारण नाही. ‌‌‌​निवृ​त्तिवेतन देता यावे म्हणून कामगार, मालक व सरकार यांनी संयुक्तपणे ​निधी उभा करावयाचा व त्यातून ​निवृत्तिवेतन द्यावयाचे, ही पद्धत ​विशेष रुढ आहे. भारतात दा​रिद्र्यामुळे वयोमर्यादेनुसार सर्वांना निवृ​त्तिवेतन ​दिले जावे, हे शक्य होत नाही व नजीकच्या काळात होणार नाही. भारतात सरकारी नोकरी करून ​निवृत्त झालेल्यास ​निवृ​त्तिवेन ​मिळते. खाजगी संस्थांत नोकरी करणाऱ्यांसाठी भ​विष्य ​निर्वाह ​निधी एकरकमी ​मिळण्याची तरतूद आहे. बहूसंख्य भारतीयांच्या बाबतीत वृद्धापकाळ ही काळजी ​निर्माण करणारी घटना आहे.

 


लेखक - ए. रा. धोंडगे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate