रिनेसन्स म्हणजे प्रबोधन. या फ्रेंच व इंग्लिश शब्दाचा व्युत्पत्यर्थ पुनर्जन्म किंवा नवजन्म असा आहे. पुनर्जन्म कशाचा ? प्राचीन युगातील म्हणजे ग्रीक व रोमन काळातील ख्रिस्ती धर्माच्या उदयापूर्वीच्या संस्कृतीचा पुनर्जन्म आणि ती संस्कृती नव्याने स्वीकारलेल्या, त्या संस्कृतीच्या अध्ययनाने स्फूर्ती घेतलेल्या, बुद्धिमंत, प्रतिभाशाली, कर्तृत्ववान आणि परंपरागत ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या म्हणजे चर्चच्या मानसिक बंधनातून मुक्त झालेल्या माणसांचा जन्म, असा याचा अर्थ होतो. परंतु इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते. प्राचीन युगातील परिस्थिती निराळी होती. त्यानंतर सुमारे एक सहस्र वर्षांचा काळ लोटला होता; भोवतालचे जग बदलले होते. म्हणून प्राचीन युगातील मानवी कर्तृत्वाकडे आकर्षिलेल्या या नव्या माणसांनी त्या युगाचे अनुकरण करीत जे जीवन घडविण्यास सुरुवात केली, ती प्राचीन युगाची प्रतिकृती नव्हती. अगदी काही नवेच घडू लागले. या प्रबोधनकालाची बीजे मध्ययुगात तयार होत होती. त्या मध्ययुगाचा प्रचंड वारसा जिवंत होता. म्हणून मध्ययुग व प्रबोधनकाल यांच्या सीमारेषा प्रथम अस्पष्ट राहिल्या होत्या. पुढे पंधराव्या व सोळाव्या शतकांत त्या स्पष्ट झाल्या.
या तीन शतकांच्या अवधीत आधुनिक संस्कृतीचा पाया घातला गेला. यूरोपातील सामान्य माणसांची संस्कृती या तीन शतकांमध्ये मध्ययुगीन धार्मिक ख्रिस्ती संस्कृतीच होती; परंतु काही मोजक्या माणसांना मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभली. ही माणसे विशेषतः इटलीमध्ये प्रथम उदयास आली. ही माणसे स्वतंत्र व्यक्ती म्हणजे जात, जमात, धर्म इत्यादींची सामाजिक गच्च बंधने शिथिल झालेल्या व व्यापकदृष्टी लाभलेल्या व्यक्ती म्हणून वावरू लागल्या. म्हणून प्रबोधनकालाच्या स्फूर्तीचे मुख्य केंद्र इटली हा देश ठरला. प्रबोधनाची स्फूर्ती केवळ इटलीपुरतीच मर्यादित राहिली नाही; तिच्या प्रवाहांनी पंधराव्या व सोळाव्या शतकांत फ्रान्स, स्पेन, नेदर्लंड्स, जर्मनी व अखेर ब्रिटन या देशांनाही वेढले. माणसाच्या बुद्धीला,प्रतिमेला आणि वर्तनक्रमाला नवी दिशा दिली. विश्वाची आणि जीवनाची नवी रहस्ये उलगडण्याची प्रेरणा लाभली. प्रतिमेची,बुद्धीची आणि कृतीची एका विशिष्ट क्षेत्रात डांबून ठेवणारी जुनी बंधने नष्ट झाली. मानवी महिम्याचे, त्याच्या अपरंपार सर्जनशक्तीचे दर्शन झाले. कारण मनुष्य अनंत प्रसवशक्तीच्या निसर्गाच्या प्रत्यक्ष दर्शनात रमू लागला. त्यामुळे नवे काव्य, नवे नाटक, नवे साहित्य प्रकार, नवी रूपण कला, तंत्रविज्ञान, अभियांत्रिकी व नवे विज्ञान यांना अखंड बहर येऊ लागला. मानवी जीवन हे मुख्य मूल्य होय; सर्व विश्वाचा, 'अस्तित्वाचा मानदंड मनुष्य होय', हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ प्रोटॅगोरस याचा सिद्धांत पुन्हा आधुनिक मनुष्याचे अस्तित्वाकडे पाहण्याचे मूलतत्त्व ठरले. यालाच मानवतावाद म्हणतात. ⇨ मानवतावाद हा प्रबोधनकालाची आधारभूत विचारसरणी होय. याच काळात माणसाचा भोवतालच्या भौतिक विश्वाच्या सीमा विस्तारू लागल्या;भूगोल कह्यात आला; आकाशाच्या दिशा विस्तारू लागल्या
या प्रबोधनाच्या उत्कर्षकाळात धाडसी दर्यावर्दी यूरोपीय लोकांनी दूरदूर पर्यटने करून पृथ्वीवरचे नवे नवे देश शोधण्यास सुरुवात केली. कोलंबसने अमेरिकेजवळील वेस्ट इंडीज बेटांना आपले जहाज नेले (१४९२). १४९७ मध्ये जॉन कॅबटला लॅब्रॅडॉरचा शोध लागला व तेथून तो अमेरिकेच्या विस्तृत खंडावर उतरला. वास्को द गामाने सागरमार्गाने आफ्रिकेला प्रदक्षिणा करून कालिकतचा किनारा (१४९७-९८) गाठला आणि भारत व यूरोप यांच्यातील दळणवळण करण्यास योग्य अशा सागरपथाचे उद्घाटन केले. ⇨ फर्डिनंड मॅगेलन (१४८०-१५२१) या पोर्तुगीज दर्यासारंगाने पहिली पृथ्वीप्रदक्षिणा (१५१९-२२) पुरी केली. प्रदक्षिणा करताना तो मारला गेला; परंतु त्याचे जहाज स्पेनहून निघाले व पृथ्वीप्रदक्षिणा संपवून स्पेनला परतले. तेव्हापासून पृथ्वी वाटोळी आहे, हे माणसाला प्रत्यक्ष अनुभवाने निश्चित करता आले. नव्या देशातील, यूरोपीय मनुष्यांना अपरिचित अशा विलक्षण वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, देशोदेशींची जीवनाची उपकरणे-अवजारे,हत्यारांचे प्रकार यांचा संग्रह करून हे धाडसी लोक यूरोपचा किनारा परत गाठत. तरुण व म्हातारे स्त्री-पुरुष त्यांच्या स्वागतार्थ जमत व आश्चर्याने भारावून जात. पृथ्वीचा आकार, पृथ्वीवरची विविध प्रकारची अपार साधनसंपत्ती यांच्या दर्शनाने यूरोपीय माणसांचा अनुभव संपन्न होऊ लागला. त्याबरोबरच अनंत आकाशाचाही अंत मनुष्य पाहू लागला. सामान्य माणसांना जाणवेल असा आकाशातील ताऱ्यांच्या व्यूहातला बदल लक्षात आला. ट्यू को ब्राए या खगोलज्ञाला १५७२ मध्ये नवा तेजस्वी तारा आढळला. दुसरा असाच मोठा तारा याच शतकाच्या अखेरीस ⇨ योहानेस केप्लर या खगोलज्ञाला दिसला. खगोलाची परंपरागत मांडणी अमान्य होण्यासारखी परिस्थितीत उत्पन्न झाली. पोलिश खगोलज्ञ ⇨निकोलेअस कोपर्निकसने १५४३ मध्ये पृथ्वीकेंद्रित विश्वकल्पनेला धक्का दिला. ह्या कल्पनेला बायबलचा आधार होता. पृथ्वी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी इ. ग्रहमाला ही सूर्यकेंद्रित आहे, हा शोध त्याने प्रत्यक्ष अवलोकन व गणित यांच्या आधाराने सिद्ध केला. याच सुमारास देल्ला पॉर्ता (१५४०-१६०२) याने दुर्बिण निर्मिली. केप्लरने त्याची प्रशंसा केली. ⇨ गॅलिली गॅलिलीओने दुर्बिणीत सुधारणा केली. तिचा खगोलविज्ञानात उपयोग केला व सूक्ष्मदर्शकयंत्रही निर्मिले. माणसाच्या साध्या डोळ्यांनी जेवढे तारे आजपर्यंत दिसत होते,त्यापेक्षा दसपट तारे गगनमंडलात दुर्बिणीने प्रथमच दिसू लागले. कोपर्निकस व केप्लर यांनी सिद्ध केलेल्या खगोलज्ञानाला १६०० मध्ये गॅलिलीओने वैज्ञानिक पद्धती शोधून तिचा आधार दिला आणि तेव्हापासून भौतिक विज्ञान हे सरळ मार्गाने अखंड गतीने विकसित होऊ लागले.
नवीन नवीन साधने वा यंत्रे निर्माण करण्यातसुद्धा प्रगती होऊ लागली. चौदाव्या शतकात बंदुकीची दारू तयार करण्यात यश आले. मानवी शिक्षणाचे एक श्रेष्ठ साधन म्हणजे पुस्तके भराभर छापणारा छापखाना होय. ⇨ योहान गूटेनबेर्क (१३९८?-१४६८) या तंत्रज्ञ कारागीराने १४४० मध्ये नव्या प्रकारचा छापखाना शोधून काढला. चिंध्यांपासून कागद बनू लागला. इटलीमध्ये १४५१ पासून व्हेनिस इ. शहरांमध्ये हे भराभर छापणारे छापखाने उभारले जाऊ लागले. या छापखान्यांनी पंधराव्या शतकात सु. दोन कोटी पुस्तके छापली. भराभर छापणारा छापखाना ही प्रबोधनकालाची माणसाला मिळालेली श्रेष्ठ देणगी होय. बौद्धिक लोकशाहीची स्थापना छापखान्याने केली. ⇨ डेसिडीअरिअस इरॅस्मसचा मित्र योहेनस फ्रोबीनियस (१४६०-१५२७) याने स्वित्झर्लंडमध्ये छापखाना काढून प्रमाणित ग्रंथांच्या सुंदर आवृत्त्या छापल्या. हिपॉक्राटीझचा वैद्यकावरील फ्रोबीनियसने छापलेला ग्रंथ अत्यंत सुंदर छपाईसाठी प्रशंसिला गेला.
स्त्रोत:मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2020
यादव घराणे : महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहास ...