दक्षिणेतील सुलतानांनी ⇨तालिकोटच्या लढाईत विजयानगरचा पूर्ण पाडाव केला (१५६५); पण दक्षिणेच्या सुलतानांची ही एकजूट या विजयानंतर लगेच भंगली. विजापूर आणि अहमदनगर यांच्यात संघर्ष उडणार असे वाटू लागले; परंतु मुर्तजा निजामशाह याने वऱ्हाड आणि बीदर जिंकून घ्यावे आणि अली आदिलशाहने कर्नाटकात या दोन्ही राज्यांइतकाच मुलूख जिंकून घ्यावा, यांवर हा संघर्ष मिटला. वरील समझोत्यानुसार मुर्तजा निजामशाहने जेव्हा वऱ्हाडवर स्वारी केली (१५७०), तेव्हा वऱ्हाडचा राज्यप्रतिनिधी तुफालखान याने अली बरीदशाहकडे मदतीची याचना केली. अली बरीदने मदत करण्यास नकार दिला. वऱ्हाडनंतर पाळी बीदरची होती. १५७४ मध्ये वऱ्हाड जिंकून घेतल्यानंतर मुर्तजा निजामशाहने इब्राहिम कुत्बशाहबरोबर संगनमत करून बीदरवर चाल केली. अली बरीदने अली आदिलशाहकडे मदत मागितली. तेव्हा मुर्तजाने बीदरला घातलेला वेढा त्याला उठवावा लागला. अली बरीदच्या मृत्यूनंतर त्याचे अधिकार इब्राहिम बरीदशाह (कार. १५८०-८६) याजकडे आले. यानंतरच्या जवळजवळ २० वर्षाच्या कालखंडात दक्षिणेतील घडामोडींशी बीदरचा काहीही संबंध आला नाही. इब्राहिम बरीदशाहनंतर त्याच्या जागी दुसरा कासिम बरीदशाह (कार. १५८६-८९) हा आला. याची राजवट जेमतेम तीन वर्षे टिकली. त्याच्या कारकीर्दीत विशेष कोणतीच घटना घडली नाही. त्याच्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा गादीवर आला; पण दुसरा अमीर बरीद (कार. १५८९-१६०१) नावाच्या एका नातेवाईकाने गादी बळकाविली (१५८९). त्या वेळची काही तांब्याची नाणी उपलब्ध झाली आहेत. नंतर अमीर बरीदशाह हा गादीवर आला. याच वंशातील मीर्झा अली बरीद (कार. १६०१-०९) या नातेवाईकाने त्याला पुढे बाजूला सारले आणि गादी बळकाविली व अमीर बरीदला भागानगरला (हैदराबाद) पळवून लावले. या घटनेबाबत इतिहासकारांत मतभेद होते; पण अलीकडे सापडलेल्या मराठी व फार्सी कोरीव लेखांत या शाहचे नाव आढळले. तो १६०९ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी दुसरा बरीदशाह आला. हा या वंशातील शेवटचा नामधारी सुलतान होय. पुढे हे राज्य दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने जिंकून आपल्या अंमलाखाली आणले (१६१९). या कालखंडात दक्षिणेच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ झालेली होती. मोगलांनी खानदेश व अहमदनगर यांचा पाडाव केला होता आणि त्यांची नजर गोवळकोंडा, विजापूर व बीदर येथील उर्वरित शाह्यांकडे वळली होती. अर्थात या शाह्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटाची फार उशिरा जाणीव झाली.
इ. स. १५०० ते १६२० दरम्यानच्या सु. सव्वाशे वर्षांच्या काळात बरीदशाही सुलतानांनी राज्यविस्ताराबरोबरच वास्तुकलादी क्षेत्रांत मोलाची भर घातली. त्यांचे काही कोरीव लेख व नाणी अवशिष्ट असून त्यांतूनही त्यांची कलाभिज्ञता दिसून येते. इंडो-सॅरसॅनिक वास्तुशैलीस या काळात उत्तेजन मिळाले. एकापेक्षा एक सरस व भव्य अशा सुलेखनकलेने सुशोभित केलेल्या मशिदी आणि दर्गे बांधण्यात आले. या शिवाय बीदर व कल्याणी (बसव-कल्याण) या ठिकाणी दोन किल्ले बांधण्यात आले आणि महमूद गावान या कलाप्रेमी व विद्वान मंत्र्याने मदरसा सुरू करून ज्ञानार्जनाचे महत् कार्य केले. महमूदशाहने बांधलेल्या अनेक वास्तू अवशिष्ट आहेत. त्यांतील बीदरच्या किल्ल्याच्या गुबंद दरवाजाजवळील शाह बुरूज उल्लेखनीय आहे. महमूदशाहने किल्ल्याला शर्झ नावाचा दुसरा दरवाजा बांधला व त्यावर वाघाच्या दोन भव्य व सुरेख प्रतिमा कोरविल्या . दरवाजाच्या दर्शनीभागावर फरशांचे उत्कृष्ठ कलाकाम करून घेतले आणि त्यावर एख लेख कोरविला. आष्टूर येथील महमूदशाहचे थडगे भव्य आहे. अली बरीद हा कलाभिज्ञ सुलतान होता. त्याला काव्य व सुलेखनकला यांची आवड होती. त्याचे बीदर येथील थडगे आणि त्याने बांधलेला रंगीन महाल या वास्तू प्रेक्षणीय आहेत.
पहा : बहमनी सत्ता.
संदर्भ : 1. Government of Karnataka, Bidar District Gazetteer, Bangalore, 1977.
2. Majumdar, R.C. Ed. The Delhi Sultanate, Bombay 1971.
3. Yazadani, Gulam, Bidar : Its History and Monuments, Oxford, 1947.
कुंटे, भ.ग.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020