स्पर्धा परीक्षा… प्रशासकीय सेवेत जावून समाजाची सेवा करण्याचा मार्ग. या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक इच्छुकाला खडतर प्रवास करावा लागतो. स्पर्धा परीक्षा दिली म्हणजे नोकरी पक्कीच असाही काहींचा समज असतो. मात्र केवळ नोकरी म्हणून या क्षेत्राकडे बघणाऱ्या तरूणांना यश न मिळाल्यास बेकारी पदरी येते. या परीक्षा देणे म्हणजे... प्रचंड मेहनत... 14 ते 15 तास अभ्यास करावा लागतो... असाही कांगावा बरेच जण करतात. केवळ अभ्यासातील चिकाटी हेच या परीक्षांमधील यशाचे गमक आहे. हे गमक सांगितले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या भूषण अहिरे यांनी.
भूषण अहिरे बुलडाणा येथे आले असता त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी यशाचे गमक सांगितले. ते म्हणाले, ‘मला मुलाखतीमध्ये सर्वात जास्त मदत माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकराज्य’ची झाली. लोकराज्य हा माझ्या यशाचा भागीदार आहे’. यावेळी त्यांना लोकराज्यचा जुलै महिन्याचा वृक्ष लागवड मोहिमेवर आधारित अंक भेट देण्यात आला. भूषण अहिरे सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत पूर्व परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. सध्या ते मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत आहेत.
जिल्हा ग्रंथालयात अभ्यासिका असून यामध्ये जवळपास 100 विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. या विद्यार्थ्यांशीही अगदी दिलखुलास संवाद श्री. अहिरे यांनी साधला. माहिती सहायक निलेश तायडे यांनी त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीष जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी संवादास सुरूवात केली. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भूषण अहिरे यांनी देवून त्यांचे समाधान केले. मुलींनी विचारलेल्या क्लासच्या प्रश्नावर ते म्हणाले, क्लास महत्वाचे नाहीत.. तुमचे प्रयत्न महत्वाचे आहेत. तुम्हाला अगदीच एखादा विषय कठीण जात असेल तर क्लास लावण्यास हरकत नाही. मात्र मित्राने किंवा मैत्रिणीने क्लास लावला म्हणून मीसुद्धा लावले पाहिजेत, या विचारातून बाहेर या. क्लास लावण्याची आवश्यकता नाही. स्वत:च अभ्यास करू शकता. केवळ अभ्यासात सातत्य ठेवावे लागते.
अभ्यास करताना बऱ्याचदा नैराश्य येते. या प्रश्नांवर श्री. अहिरे म्हणाले, याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे. अभ्यास करताना अशा गोष्टींवर लक्ष द्यायचे नाही. नैराश्य आल्यास संगीत ऐकावे. अभ्यास सुरू असताना एक ते दीड तासानी संगीत ऐकल्यास मेंदू ताजा-तवाना होतो. मेंदूला स्फूर्ती मिळाल्यामुळे अभ्यासातही लक्ष लागते. नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता कानावर आल्यास आपण त्या विचारांमध्ये गुंतून जातो. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो. अशावेळी केवळ मिशनमोडमध्ये राहून आपला अभ्यास सुरू ठेवावा. तेवढ्यापुरते त्या विचारांमध्ये जावून पुन्हा आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवावे.
पुण्यात जावूनच अभ्यास करावा काय ? या प्रश्नार श्री.अहिरे म्हणाले, अभ्यास हा अभ्यास आहे. तो कुठेही होतो. त्याला ठिकाण महत्वाचे नाही तर तुमची इच्छाशक्ती, एकाग्रता, संयम, सातत्य व उत्साह कायम लागतो. केवळ पुण्यातच क्लास किंवा अभ्यासिका लावल्या तर यश मिळते, असे नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील, ते स्वत:च अभ्यास करून यशस्वी झाली आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम आल्यानंतर त्यांनी आता संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजाविण्याचे ध्येय ठेवले आहे. स्पर्धा परीक्षा हे करीअरचे भरीव माध्यम आहे. मात्र त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यासात सातत्य ठेवावे लागते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही. त्यासाठी संयमही आवश्यक आहे. भूषण अहिरे यांचा हा संवाद मात्र बुलडाण्यातील स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला यात शंका नाही.
लेखक: निलेश तायडे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2023
तुकाराम जाधव सर (संचालक द युनिक अॅकॅडमी, पुणे) यां...