অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कौशल्यसेतू अभियान : १० वी अनुत्तीर्णांसाठी प्रगतीचा मार्ग

कौशल्यसेतू अभियान : १० वी अनुत्तीर्णांसाठी प्रगतीचा मार्ग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, त्यांच्यामध्ये नैराश्य येऊ नये यासाठी शासनस्तरावर विविध योजना, मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात येतात. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कौशल्यसेतू अभियान राबविण्यात येते. याविषयी माहितीपर लेख...

इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंट कोर्सेसद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणारा 'कौशल्य सेतू अभियान' हा उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे. इयत्ता १० वी मध्ये नापास झाल्यावर बऱ्याचदा घर, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडूनसुद्धा अशा विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले जात नाही. बऱ्याचवेळा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना टिका सहन करावी लागते. देशातील लोकसंख्येत एक तृतीयांश वाटा हा युवकांचा आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

'नापास' हा शिक्का पुसून टाकण्यासाठी राज्य शासनाने राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत या 'कौशल्य सेतू अभियाना'द्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सन २०१६ या वर्षापासून कौशल्यसेतू अभियान राज्यामध्ये राबविण्यास सुरुवात झाली आहे.

योजनेचे स्वरूप :

या कौशल्य सेतू अभियानामध्ये इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.

संपूर्ण राज्यात अशी १११ प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत 'यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्स' व 'नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी' या दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी मोबाईल रिपेअरिंग टेक्निशियन, असिस्टंट इलेक्ट्रिशियन,ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन (टू अँड थ्री व्हीलर), मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, डीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन, प्लंबर जनरल, हॅन्ड एम्ब्रॉयडरी असे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येतात.

या प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. या कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रॅक्टिकल, लेखी व तोंडी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचे मुल्याकंन केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.

बऱ्याचदा इयत्ता १० वीमध्ये नापासाचा शिक्का बसल्याने निराशेच्या गर्तेतील विद्यार्थी व्यसन, गुन्हेगारी अशा चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असते. म्हणूनच युवापिढीचे भवितव्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 'कौशल्य सेतू अभियान' सुरु केले आहे.

सध्या सुमारे २२ हजार विद्यार्थी या 'कौशल्य सेतू अभियानात' प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती 'यशस्वी' संस्थेच्या 'कौशल्य सेतू अभियान' विभागाच्या प्रमुखांनी दिली. या योजनेमुळे इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्किल इंडिया या महत्वाकांक्षीअभियानाला आणखी बळ मिळणार असून यामुळे देशाची युवा पिढी स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate