অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समतोल व संतुलीत आहाराची गरज

प्रस्तावना

आपल्या शरीराची क्षमता व आवडी निवडी लक्षात घेऊन आपला आहार हा समतोल व संतुलीत असणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ.संगीता पत्की यांनी दिलखुलास या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर दिलखुलास हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारीत करण्यात येतो. या कार्यक्रमात ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ.संगीता पत्की यांची शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर 2014 रोजी योगेश कोलते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा सारांश..... (भाग -१)

पोषण सप्तांहाची भूमिका

या सप्ताहाचा मुख्य उद्देश म्हणजे जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे होय. आधुनिक जीवनात भीती वाटते ती आजारांची, त्यात लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा हृदय रोग, मुलींमध्ये आढळणारा आजार म्हणजे पीसीओडी. असे अनेक आजार आहेत की ते आहाराशी संबंधित आहेत. त्यांना आहारनिर्मीत चयापचय व्याधी असे म्हणतात. म्हणून ह्या आहाराविषयी जागृती असणे गरजेचे आहे.

आजच्या काळात आहारतज्ज्ञांचं महत्त्व

होय, पुर्वीच्या काळी आहारतज्ज्ञ नव्हते असं नव्हतं परंतु त्यापेक्षा आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक नवनवीन आजार वाढीस लागलेले दिसतून येतात. म्हणून आहार तज्ज्ञांचे महत्व वाढलेले दिसून येते.

लठ्ठपणा वाढण्याची कारणे

आपल्या जीवन शैलीचा अविभाज्य घटक म्हणजे आहार. आणि त्याबरोबर येणारा व्यायमाचा अभाव. ह्या समस्या प्रामुख्याने जाणवतात. व्यायामाला योग्य वेळ देऊन तो करणे गरजेचे आहे. तसेच जंकफूड/ फास्ट फुड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे अनावश्यक कॅलरीज वाढतात. ज्याप्रमाणे औषध घेण्याचे प्रमाण ठरलेले असते त्याच प्रमाणे योग्य आहार घेण्याच्याही वेळा ठरलेल्या असाव्यात. जर वेळी अवेळी जेवण केले, अनावश्यक आहार घेतला तर लठ्ठपणा वाढीस लागतो.

संतुलीत आहार म्हणजे काय

संतुलीत आहार म्हणजे टेलरमेड आहार. प्रत्येक व्यक्तीचा आहार हा टेलरमेड असावा. थोडक्यात आपल्या शरीराची क्षमता व आवडी निवडी लक्षात घेऊन आपला आहार हा ठरलेला असावा त्यालाच समतोल व संतुलीत आहार असे म्हणतात. त्यात व्हिटॅमिन्स, कर्बोदके, प्रथिने यांचे प्रमाण असावे.

चांगला प्रथिनयुक्त आहार 

चांगल्या प्रकारची प्रथिने म्हणजे ज्या प्रथिनांमध्ये इसेन्शीअल अॅमानोअॅसिडचे प्रमाण योग्य आहे. यालाच आपण प्रोटीन असे म्हणतो. हे अॅमानोअॅसिड थोड्या-थोड्या प्रमाणात कडधान्य व धान्यात आढळून येते. उदा.: गहू, तांदुळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ इत्यादींमध्ये आढळून येते. आपल्या जेवणात भाकरी, गहू, वरणभात असे अन्नपदार्थ असतात. तसेच गाईचे दूध, तुप, पनीर, अंडी, मासे इत्यादींपासूनही उत्तम प्रोटीन्स मिळतात. जेव्हा दोन पदार्थ एकत्र करतो तेव्हा त्याची आवश्यक अॅमानो अॅसिडची पातळी योग्य प्रमाणात वाढलेली असते. म्हणून अशा पद्धतीने योग्य आहार घेतला गेला पाहिजे.

चौरस आहार कोणता

आजच्या जीवन शैलीमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी झालेले आहे. एका माणसाला साधारणता ३५ ग्रॅम तंतुमय पदार्थांची आवश्यकता असते. पालेभाज्यांमध्ये तंतुमय पदार्थांची मात्रा जास्त असते. त्यासाठी आहारात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा समावेश असावा. त्याचबरोबर रोजच्या आहारात काकडी, गाजर किंवा पालेभाज्यांचे प्रमाण असावे, जेणेकरुन तंतुमय पदार्थांची गरज काही प्रमाणात भागविली जाईल.

फल आहार कधी?

फळांमधून आपल्याला प्रथिने आणि खनिजे मिळतात. म्हणून रोजच्या जीवनात फळांचा समावेश जरुर करावा. फळे खातांना ते सालीसह खावेत त्यात जीवनसत्वांचे प्रमाण जास्त असते. पेरु, पपई, पेर, संत्री, मोसंबी, लिंबू या फळांमधून प्रथिने आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात. म्हणून ही फळे जास्त खावीत.

दैनंदिन जीवनात साखरेचे प्रमाण

साखर म्हणजे पांढरे विष आहे. आपल्या शरीरासाठी साखरेचे जास्त प्रमाण हे घातक असते. म्हणून साखरेचे प्रमाण हे अल्पप्रमाणात असावे. एकंदरीत आहार घेतांना जे सकस आणि संतुलीत पदार्थ आहे त्यांचे प्रमाण जास्त असावे. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.


-जयश्री कोल्हे
प्रतिवेदक

स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate