भारतात सन 1985 पासून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. आपल्या राज्यातही लसीकरण कार्यक्रम राबविले जात आहेत. आपल्या देशाला 27 मार्च 2014 मध्ये पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणपत्रही जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. हे अर्थातच पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळेच शक्य झाले आहे. बालकांना शून्य ते दोन वर्षे वयोगटात द्यावयाच्या विविध लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याकडे आहे. मात्र अद्यापही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण हे 65 टक्केच आहे. पहिल्या दोन वर्षांत बालकांचे लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे त्यांना शक्य होते. त्यामुळे मातेच्या गरोदरपणात व बालकाच्या शून्य ते दोन वर्षे वयोगटाच्या काळात योग्य लसीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठीच लसीकरणापासून पूर्णतः वा अंशतः वंचित असलेली शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे 2020 पर्यंत पूर्णतः लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने 25 डिसेंबर 2014 पासून ‘मिशन इंद्रधनुष्य’या नावाने विशेष लसीकरण मोहिम सुरु केली आहे.आपल्या देशात बालमृत्यू व प्रसुतीदरम्यान होणारे मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे या लसीकरणामुळे शक्य होणार आहे. याशिवाय लहान वयात येणाऱ्या आजारांमुळे होणारे कुपोषणही टाळता येणार आहे.बालकांना देण्यात येणाऱ्या लसी.
नवजात अर्भकांना प्रत्येकी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात यासोबतच कावीळ, क्षयरोग या लसींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच लसीकरणातून पाच रोगांपासून बालकाला सुरक्षितता लाभणार आहे. या उपक्रमात पेंटाव्हॅलंट, रोटाव्हॅक्सीन आणि इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन याचा समावेश आहे. आतापर्यंत आरोग्य विभागातर्फे नवजात अर्भकास प्रत्येकी दीड महिन्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासाठी (डीपीटी) इंजेक्शनचा डोस दिला जात होता.
आता याच डोसमध्ये कावीळ आणि ह्युमन इन्फ्ल्यूएन्झा-बी प्रतिबंधक घटकांचाही समावेश राहील. हा डोस पूर्वीप्रमाणेच (०.५ एमएल) देण्यात येणार आहे. पेंटाव्हॅलंट लस वापरास राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याचा वापर सहा महिन्यांच्या आत सुरू करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे किमान काम झालेले देशातील 201 जिल्हे यासाठी निवडण्यात आले आहेत. अपूर्ण लसीकरण, लसीकरणापासून वंचित बालके व गरोदर मातांचे प्रमाण जेथे किमान 50 टक्क्यांपर्यंत आहे, अशा ठिकाणांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांतील माता व बालकांना पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर लसीकरण करण्यात येणार आहे.
देशातील या 201 जिल्ह्यात महाराष्ट्रातील सात जिल्हे आणि 12 महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यात बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक, ठाणे यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मार्च 2015 पासून प्रत्येक महिन्यात सात दिवस या प्रमाणे चार महिने म्हणजे जून 2015 पर्यंत हे मिशन राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात या मिशनचा प्रारंभ 29 मार्च पासून होणार आहे.
- मिलिंद मधुकर दुसाने,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...