लहान मुलांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच शारीरिक विकास होणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
बालकांमध्ये आढळणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाकडून १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते ६ वयोगटातील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. या उपक्रमात दोन कोटी ७५ लाख ४८ हजार बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९% (२४१ दशलक्ष) आढळले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' वर्षातून दोनदा राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. जंतनाशक मोहिमेमुळे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे होणार आहेत. त्यामध्ये बालकांमधील रक्तक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश आहे.
हत्तीरोग ग्रासित जिल्हे (गोंदिया, चंद्रपूर, नांदेड आणि चंद्रपुर व नांदेड महानगरपालिका) वगळता इतर जिल्हे व मनपा येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी शाळा व अंगणवाडी या संस्था विशेष भूमिका बजावणार आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका व सर्व खाजगी अनुदानित शाळा त्याचबरोबर सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे यांचा समावेश आहे.
अल्बेंडाझॉल ही कृमिनाशक गोळी घेण्याची पद्धत प्रत्येक वयोगटानुसार वेगळी आहे. तसेच आजारी बालकांना जंतनाशकाची गोळी देऊ नये. जंतनाशकाची गोळी तशीच गिळण्यास देखील सांगू नये व गोळी घरी खाण्यासाठी पालकांच्या हातात देऊ नये. या मोहिमेत बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून असे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
अल्बेंडाझॉलची ही लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी आहे. जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे आहेत त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंतसंसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. व ते तात्पुरते असून शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत. व असे काही निदर्शनास आल्यास ताबडतोब १०४ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. व तीव्र स्वरूपाचे दुष्परिणाम दिसून आल्यास तात्काळ मोहीम थांबवावी व लाभार्थ्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा ग्रामीण रुग्णालयात संदर्भीत करावे. या मोहिमेचा जास्तीत जास्त बालकांना फायदा व्हावा याकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
- अश्विनी कासार/आंतरवासिता
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/10/2020