भारतात डेंग्यू हे नाव नवीन वाटत असले तरी काही भागांमध्ये हा आजार पुष्कळ वर्षे टिकून आहे. 1963 साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर अनेक वेळा देशात ठिकठिकाणी साथी येऊन गेल्या आहेत. हा आजार आकस्मिक असून वेगाने वाढतो म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. राष्ट्रीय डास रोग प्रतिबंधक मोहिमेत म्हणूनच या आजाराचा समावेश केला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव पुढील पाच वर्षात निदान निम्म्याने कमी करावा असे आपले उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पुढीलप्रमाणे सहा घटक आहेत.
(अ) ताप सर्वेक्षण
काचपट्टीवर रक्तनमुने घेणे(हिवताप वेगळा करण्यासाठी), संशयित हिवताप उपचारासाठी क्लोरोक्वीन देणे, डेंग्यूसाठी द्रवरुप रक्ताचे नमुने घेणे, ईडस डासांचे नमुने गोळा करणे, इ. गोष्टी येतात.
(ब) पायरेथ्रम आणि यु.एल.व्ही कीटकनाशक फवारणी
यामध्ये घरे आणि परिसर यांची पायरेथ्रम औषधाने फवारणी केली जाते. फॉगिंग किंवा धुरळणी हा याचाच एक भाग आहे. धुरळणीमुळे डास तात्पुरते बेशुध्द होतात.
(क) घरगुती आणि परिसरातील ईडास जनक पाणीसाठे रिकामे करणे
डबे, टायर्स, कुलर्स, कुंडया, पाण्याची टाकी, इ. ठिकाणी साठलेले पाणी दर आठवडयाला फेकून देणे व तळ कोरडा करणे हा महत्त्वाचा उपाय आहे.
ड) डेंग्यूसाठी शीघ्रनिदान किट
डेंग्यूसंभव जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे ताबडतोब निदान करण्यासाठी किटस् उपलब्ध आहेत. यात रक्ताचा नमुना तिथल्या तिथे तपासता येतो. यामुळे नियंत्रणासाठी फार वेळ वाट पहावी लागत नाही.
इ) आरोग्यसंवाद
यामध्ये डेंग्यूआजाराचे महत्त्व, नियंत्रणाच्या पध्दती याबद्दल मुख्य संदेश असतो.
महाराष्ट्रातील डेंग्यूचा प्रादुर्भाव
महाराष्ट्रात 2001 पासून डेंग्यू तापाचे लहान मोठे उद्रेक झालेले आहेत. 2001 मध्ये23 उद्रेक झाले, त्यातून जवळजवळ 3000 व्यक्तींना लागण झाली आणि 5 जण मृत्यू पावले. यातील सुमारे25% रक्तनमुने डेंग्यू निषाणयुक्त आढळले. यानंतर हळूहळू दरवर्षी ही परिस्थिती वाढत जाऊन 2005 साली267 उद्रेक, 21000 लागण, 56 मृत्यू अशी परिस्थिती होती. त्यानंतर हळूहळू लागण कमी होत चालली आहे. डेंग्यू नियंत्रण योजनेतून केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळालेले दिसते. तरीही या साथींच्या आजाराबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात सर्व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
ताप आणि डेंग्यू ताप लागणीबद्दल स्वत:हून आरोग्यकेंद्रांना माहिती देणे. डास नियंत्रक फवारणी, धुरळणी आणि मच्छरदाण्यांचा वापर दर आठवडयास घरगुती आणि परिसरातील कृत्रिम पाणीसाठे उपसून साफ करणे आणि त्यांचे तळ कोरडे करणे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या