सकाळी उठल्याबरोबर गरम अथवा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. डोळे चांगले धुतले गेले पाहिजेत. डोळ्यातील घाण, पापण्यांची चिपडे व्यवस्थित काढली पाहिजेत. नुसते तोंडावरून पाणी फिरवले म्हणजे स्वच्छता नाही. तसेच शाळेत खेळताना किंवा मातीत खेळताना डोळ्यात काही जाणार नाही याची खूप काळजी घेतली पाहिजे.
डोळे येणे, डोळे चिकटणे यासारखे संसर्गजन्य रोग मोठया प्रमाणावर आढळतात. याचे प्रमाण खेडयात राहणाऱ्या लोकांत आणखीनच जास्त असते. रोगाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणाऱ्या अनेकांना या संसर्गजन्य रोगाच्या जंतूपासून रोग होऊ शकतो. रोग्याने वापरलेले काजळ, सुरमा आणि सुरमा लावायची सळई, टॉवेल इत्यादी वस्तू दुसऱ्या कोणी वापरल्या तरीसुद्धा त्यांना रोग होऊ शकतो. खेडयातील स्त्रिया आपल्या मुलांचे तोंड, डोळे पुसताना नेहमीच आपल्या पदराचा वापर करतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे पदराची घाण, जंतू मुलाच्या डोळ्यात सहजपणे जातात. या स्त्रियांना नेहमीच धूळ, धूर इत्यादी गोष्टींना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे डोळे निरोगी राहू शकत नाही आणि त्रास होत असूनही त्या डोळ्यांकडे दुर्लक्षच करतात, वेळीच उपचार करून घेत नाहीत. त्यामुळे पुढे त्यांच्यात दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. कधी अंधत्वही येते. केवळ वेळीच उपचार न केल्यामुळे नंतर कायमचे डोळे गमावल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात ती यामुळेच. आपल्यासाठी डोळे जाऊ नयेत म्हणून प्रत्येक स्त्रीने डोळ्यांचे आरोग्य सांभाळायला हवे. काही शंका आली तर ताबडतोब सल्ला घेऊन त्यावर उपचार करायला हवे. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांविषयी तिने खबरदारी घ्यायला हवी. त्याचबरोबर मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी ही जागरुकता असायला हवी.
स्त्रोत : वैयक्तिक स्वच्छता व त्वचा रोग, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/16/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...