অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अतिरक्तदाब व हृदयविकार


अतिरक्तदाब

शरीरात रक्तवाहिन्यांच्या (रोहिण्यांच्या) जाळयामार्फत सर्वत्र रक्तपुरवठा होतो, हे आपण पाहिले आहे. रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे. सामान्यत: निरोगीपणात किती दाब असतो, हे आपण शरीरशास्त्रात पाहिले आहे.

रोगनिदान 140/90 पर्यंत रक्तदाब'ठीक' आहे असे म्हणता येईल. 140/90 यापेक्षा कोठलाही आकडा वर गेल्यास रक्तदाब जास्त आहे असे म्हणता येईल. सामान्यपणे 100 + वय(वर्षे)= सामान्यरक्तदाब असे साधारण सूत्र पूर्वी मान्य होते. पण आता हे सूत्र चुकीचे आहे असे ठरले आहे.120/90कमीअधिक 20 हे सूत्र वापरता येईल. म्हणजेच वरचा आकडा 100 ते 140 व खालचा आकडा 50ते 90 असा ठोकताळा धरावा.

अतिरक्तदाबाचा परिणाम खुद्द हृदय डोळा (नेत्रपटल), मूत्रपिंड, मेंदू, इत्यादी अनेक अवयवांवर होतो.

अतिरक्तदाब हा मांजराच्या पावलांनी येणारा धोकादायक आजार आहे.

अतिरक्तदाब असला तरी ब-याच जणांना त्याचा त्रास जाणवत नाही.

मात्र अचानक हृदयविकाराचा झटका, मेंदूत रक्तस्राव, इत्यादी घटना घडू शकतात.

काही जणांना याची लक्षणे जाणवतात यात डोकेदुखी, चक्कर, डोळयांपुढे अंधारी,छातीत धडधड ही प्रमुख लक्षणे आहेत.

विशीवरच्या लोकांचा रक्तदाब तपासला तर सर्वसाधारणपणे 5 -10 टक्के लोकांमध्ये'अतिरक्तदाब' आहे असे आढळते.

अतिरक्तदाबाच्या व्यक्ती शोधण्यासाठी सर्वांचाच रक्तदाब तपासण्याची मोहीम घ्यावी लागते.

रक्तदाबाची कारणे

रक्तदाब वाढण्यामागे अनेक कारणे असतात. आनुवंशिकता, स्थूलता, किडनीचे (मूत्रपिंडाचे) आजार, दारूचे व्यसन, काही संप्रेरक विकार (उदा. थायरॉइडचे आजार), काही औषधांचा दीर्घकाळ वापर (उदा. पाळणा लांबवण्याच्या गोळया, सांधेदुखीची औषधे,स्टेरॉइडची औषधे, इ.) विशेषतः रक्ताच्या नात्यात अतिरक्तदाब असला तर संबंधित व्यक्तीलाही अतिरक्तदाब असण्याची शक्यता असते.

अतिरक्तदाबाचे दुष्परिणाम

उपचार न केल्यास वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक आजार उद्भवू शकतात.

1. रक्तवाहिन्यांचे आजार - सर्वत्र रक्तवाहिन्या जाड, कडक व अरुंद होतात. याचा परिणाम म्हणून हृदय, मेंदू, डोळे, मूत्रपिंडे यांच्या रक्तवाहिन्या जाड, कडक व अरुंद होतात. मधुमेह, स्थूलता व धूम्रपान करणा-या व्यक्तींमध्ये हे परिणाम जास्त तीव्रतेने होतात.

2. हृदयाच्या रक्तवाहिन्या आक्रसल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच हृदयावर कार्यभार वाढल्यामुळे हळूहळू हृदयाचे काम कमकुवत होते. कारण वाढलेल्या रक्तदाबामुळे रक्ताभिसरणासाठी जास्त जोर लावावा लागतो.

3. मूत्रपिंडावर अतिरक्तदाबाचा परिणाम होऊन त्याचे काम सदोष होऊ शकते.

4. मेंदूच्या रक्तवाहिन्या आक्रसल्यामुळे मेंदूचा झटका जसे - अर्धांगवायू होऊ शकतो. मेंदूमध्ये रक्तस्त्रावाचाही धोका असतो.

5. अतिरक्तदाबामुळे नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होऊ शकते.

उपचार

याबद्दल सर्वसाधारण माहिती आवश्यक आहे.
अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी दरमहा एकदा तरी रक्तदाब तपासून घ्यावा.हलका व्यायाम व योगासने साधा आहार, जेवणात मीठ कमी किंवा बंद करणे. वजन जास्त असेल तर कमी करणे, रक्तदाब उतरवणारी औषधे घेत राहणे हे उपचाराचे मुख्य सूत्र असते. मधुमेह असल्यास त्याचे नियंत्रण करावे लागते. धूम्रपान असल्यास ते बंद करावे लागेल. रक्तदाब उतरवण्यासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध नियमितपणे घेणे महत्त्वाचे आहे. औषध मध्येच बंद केल्यास धोका संभवतो. यापैकी काही औषधे अगदी स्वस्त आहेत.

प्रथमोपचार

निफेडिपीन ही गोळी (कॅप्सूल) रक्तदाब खात्रीने कमी करायला अगदी उपयुक्त आहे. रक्तदाब 200/120 आकडयांवर गेला असेल तर तो लवकरात लवकर कमी करणे आवश्यक असते. अशा वेळी ही कॅप्सूल (5मि.ग्रॅ.) फोडून जिभेखाली धरली की काही सेकंदात रक्तदाब उतरायला सुरुवात होते. मात्र या गोळीच्या वापरात धोकेही आहेत. प्रथमोपचार म्हणून ही गोळी ठीक आहे. पुढचे उपचार होण्यासाठी डॉक्टरकडेच जावे लागते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate