देशातल्या शेवटच्या माणसाची उन्नती होणे हाच देशाच्या प्रगतीचा मापदंड आहे असे गांधीजींनी म्हटले होते.त्या काळी त्यांनी सांगितलेल्या आणि करून पाहिलेल्या साध्यासोप्या गोष्टी आपण अजूनही करू शकलो नाही. दारिद्रय आणि रोगराई हटवणे हे मुख्य काम. नवशिक्षणाची सुरुवात स्वच्छतेपासून होते असे गांधीजी म्हणत. संडासांची सोय ही अगदी प्राथमिक गोष्ट आहे, त्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले. आरोग्यरक्षणाच्या साध्या सोप्या, निसर्गाला जवळ अशा पध्दतींचा गांधीजींनी जन्मभर प्रसार केला. आधुनिक विज्ञानाला त्यांनी नाकारले नाही. पण आयुर्वेदाचेही अवडंबर केले नाही. निसर्गोपचार गांधीजींना जवळचे वाटत. स्वातंत्र्याच्या थोडया आधी त्यांनी एका वैद्यराजांच्या मदतीने वर्ध्यात एका आयुर्वेद अभ्यासक्रमाची तयारी चालवली होती. त्यातून तयार झालेले विद्यार्थी खेडोपाडी लहानमोठी वैद्यकीय सेवा देऊ शकतील अशी त्यांची अपेक्षा होती. महाराष्ट्रात 40-50% लोकसंख्या शहरातून व छोटया नगरातून राहते. झोपडपट्टया व गरीब वस्त्यांची संख्याही खूप आहे. प्राथमिक आरोग्यसेवेची इथेही खूप गरज असते.
गांधीजींची ही कल्पना भारतात फारशी फलद्रूप झाली नाही पण साठसत्तर सालानंतर अनेक देशांमध्ये खेडोपाडी प्राथमिक आरोग्यरक्षणाचे कार्यक्रम सुरू झाले. चीन,जमेका, फिलिपीन्स, येमेन, न्यू गिनी, कोलंबिया,सुदान, थायलंड, मेक्सिको इ. अनेक छोटयामोठया देशांत असे प्रयोग झाले. चीनने तर यात खूप यश मिळवले. अजूनही आपल्या देशात खेडोपाडी आरोग्यसेवा उपलब्ध करायची असल्यास याच मार्गाने आपल्याला जावे लागणार. भारतात दर वर्षी हजारो डॉक्टर्स शिकून बाहेर पडत असले तरी ते खेडयांच्या वाटयाला येण्याची शक्यता अगदी कमी. डेव्हिड वेर्नर या लेखकाने तर 'डॉक्टर नसेल तेथे' या नावाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. यात डॉक्टरशिवाय खेडयात काय काय करता येईल याची तपशीलवार मांडणी केलेली आहे. अशा पध्दतीने काम करणा-या कार्यकर्त्यास भारतात विविध ठिकाणी विविध नावे आहेत - आरोग्यरक्षक, आरोग्यमार्गदर्शक, आरोग्यदूत,भारतवैद्य. उपेक्षित भारतातल्या लाखो खेडयांमध्ये काम करण्यासाठी छोटा पण उपयुक्त अभ्यासक्रम या पुस्तकात आहे.
हे काम हाती घ्यायचे तर या पुस्तकाचा वाटाडया म्हणून उपयोग होईल. हे पहिले प्रकरण आपल्याला कोठल्या दिशेने जायचे आहे ते सांगण्यासाठी लिहिलेले आहे. प्रत्यक्ष काम करताना तुम्ही यापेक्षा कितीतरी अधिक शिकाल. हा केवळ नकाशा दाखविण्याचा प्रयत्न आहे.वाटचाल तर तुम्हांलाच करायची आहे. कोठलेही काम करायचे तर त्यासाठी साधने लागतात. तसेच तुमच्याकडे तीन गोष्टी असणे आवश्यक असते, त्या म्हणजे कामाची माहिती (ज्ञान), कौशल्ये आणि मुख्य म्हणजे मनोवृत्ती (भावना). पुस्तके वाचून, काम करून ज्ञान व कौशल्ये मिळवता येतात. या पुस्तकातली पुढची सर्व प्रकरणे आरोग्यवैद्यकीय ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. हे सुरुवातीचे प्रकरण मनोभूमिका तयार करण्यासाठी वाहिलेले आहे. आरोग्य समस्यांकडे कोणत्या नजरेने पाहायचे, काम करताना काय काय पथ्ये पाळायची याबद्द्ल मनोभूमिका कामातून घडत जाते. पण सुरुवातीस त्याची थोडी कल्पना यावी म्हणून काही सूचना या प्रकरणात आहेत. पुस्तक वापरताना आणि काम करताना वेळोवेळी त्या मदतीला येतील.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020