অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उष्माघातापासून रक्षण

उष्माघातापासून रक्षण

उन्हाच्या वाढत्या चटक्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढू लागल्यावर उन्हाची तीव्रतादेखील वाढीस लागेल. उन्हाची तीव्रता ही मानवास घातक असते. मानवाने उन्हापासून योग्य रीतीने बचाव न केल्यास उष्माघात होऊ शकतो, प्रसंगी उष्माघातामुळे जीवही गमवावा लागू शकतो. नागरिकांनी थोडी सावधगिरी बाळगल्यास उष्माघातापासून बचाव केला जाऊ शकतो.

उन्हाच्या दिवसात बाहेर फिरल्याने उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. उन्हात फिरल्याने किंवा काम केल्याने थकवा येणे, ताप येणे ही उष्माघाताची प्रारंभीक लक्षणे आहेत. याशिवाय त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, भोवळ येणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, मळमळ होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसल्यास आपण पुढील उपाय करणे आवश्यक आहे.

उष्माघाताची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तीस एका खोलीत ठेवावे, त्या ठिकाणी त्वरीत पंखे अथवा कुलरची व्यवस्था करावी, रुग्णाच्या शरीराचे तापमान वाढलेले असते ते खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. कपाळावर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात. आईसपॅक लावावे, उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीरात क्षारांचे प्रमाण कमी झालेले असते त्या व्यक्तीस सलाईन लावावी. उष्माघात झालेल्या व्यक्तीची सर्व प्रकारची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
उष्माघात झाल्यानंतरच्या उपाययोजना जाणून घेतानाच उष्माघात होऊ नये यासाठी उपाययोजना केल्यास त्या अधिक उपयुक्त ठरु शकतात.

वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे, उन्हाळ्यात दुपारी फिरणे टाळावे, शेतातील, रस्त्यांची कामे सकाळी लवकर करावी, उन्हात काम करणे किंवा बाहेर पडणे आवश्यक असेल तर डोक्यावर व कानावर पांढरे कापड किंवा टोपी घालून, डोळ्याला गॉगल लावूनच जावे, उन्हाळ्यात रंगीत कपडे अथवा विविध रंगाची वस्त्रे वापरू नये, पांढरी सैल वस्त्रे वापरावीत, उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामामुळे खूप थकवा जाणवतो हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, रसाळ फळांच्या सेवनाला प्राधान्य द्यावे, काकड्या, आंबे, चिकू, टरबूज, कलिंगडे या फळांचा जास्त वापर करावा. थंडपेय जास्त सेवन करावे.

बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुपाने अनेक लोकांना जीवही गमवावा लागतो. उन्हापासून बचावासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे अनुकरण करुन आपण उष्माघाताचा सामना करु शकतो. त्यासाठी सूचविलेल्या उपाययोजनांचे अनूकरण केल्यास आपण आपले आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याचे रक्षण करु शकतो.

 

जिल्हा माहिती कार्यालय,
रत्नागिरी.

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, २६ मार्च, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate