डोळा हा सर्वात महत्वाचा आणि नाजूक अवयव आहे. याची निगा राखणे जरूरीचे आहे. काचबिंदूमुळे कायमची दृष्टी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे काचबिंदूवर वेळीच उपचार करावा. अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत काचबिंदू या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काचबिंदूची माहिती सांगणारा हा लेख.
भारतात दीड कोटी लोकांना काचबिंदू आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांना ते या रोगाने पिडीत असल्याची कल्पनासुद्धा नाही. या रोगाची लक्षणे सुरूवातीच्या काळात दिसत नाहीत. सध्या जगात ६.६ कोटी लोक या रोगाने त्रस्त आहेत. भारतातील १३ टक्के अंध काचबिंदूमुळे आहेत. १२ ते १८ मार्च हा जागतिक काचबिंदू सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्य नागरिकांत या रोगाची माहिती देणे आणि त्याचे प्रारंभिक अवस्थेत निदान करणे हा उद्देश आहे. मधुमेही वयस्कर व कुटुंबात काचबिंदू असताना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी होणे गरजेचे आहे.
डोळ्यात असणारा ताण वाढला असता डोळा अचानक दुखू लागतो. तसेच डोळा लाल होतो आणि दृष्टी अचानक कमी होऊ लागते. नेत्र रोगातील काचबिंदू हा एकमेव असा रोग आहे की, ज्यावर तातडीने उपचार न केल्यास डोळा जाण्याची शक्यता आहे.
आपले वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल. आपल्या चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल. आपल्या घरात कोणाला आधीपासून काचबिंदू असेल, डायबेटीज, ब्लडप्रेशर असेल. दृष्टी संकुचित होत असेल. यापैकी कोणताही त्रास होत असेल तर काचबिंदू असण्याची शक्यता आहे. या आजाराबाबत वेळेवर तपासणी आणि औषधोपचार केला नसल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका संभवतो.
भारतातील अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी काचबिंदू हे एक प्रमुख कारण आहे. डोळ्याच्या आतील दबाव वाढणे व डोळ्याची मुख्य प्रकाश संवेदना वाहून नेणारी नस खराब होते. ही प्रक्रिया हळूवार होते. यामध्ये रोग्याला विशेष त्रास होत नाही. परंतु नजर कमी झाल्यावर काचबिंदूवरील उपचारांचा फायदा होत नाही.
मधुमेह, ४० वर्षांवरील व्यक्ती, कुटुंबात काचबिंदू असणाऱ्यांनी डोळ्याची तपासणी नियमित करून घ्यावी.
कोणत्याही आजारावरील उपचाराची सुरूवात ही जीवन शैलीमधील बदलाने होते. काचबिंदूही त्याला अपवाद नाही. परंतु जीवन शैलीतील बदलाने विशिष्ट आजार बरा होत नसेल तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. काचबिंदूच्या उपचारामध्ये यश व शाश्वती किती हा प्रश्न कायम विचारला जातो. निदान किती लवकर झाले, आजार कोणत्या टप्प्यात आहे, व्यक्तीची जीवनपद्धती व इतर धोकादायक आजार या सर्व गोष्टींवर हे अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यातील आजार थांबविता येतात. मध्यम टप्प्यातील आजारांची प्रगती थांबविता येते आणि तिसऱ्या टप्प्यातील आजारामुळे येणारे अंधत्व लांबविता येते. तरीही ५ टक्के रूग्णांमध्ये अपयश शक्य आहे. काचबिंदू होण्याचे नेमके एकच कारण नसते आणि त्यातील काही कारणांवर आपण पूर्ण उपचार करू शकत नाही.
जीवनपद्धती बदलविणे हे सर्वांगीण आरोग्याबरोबरच काचबिंदूसारख्या आजारात निश्चितच उपयुक्त आहे. हे शास्त्रीय पाहणीत सिद्ध झाले आहे. झोप, व्यायाम, फळे, पालेभाज्यायुक्त शाकाहारी आहार, नैसर्गिक जीवनसत्वांचा समावेश, धुम्रपान, दारू, तंबाखू आणि तत्सम व्यसनाधिनता डोळ्यांच्या शिरेचा नाश करते. त्यामुळे कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. मानसिक ताणतणावाचा डोळ्यांच्या शिरेच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांतील चरबीमुळे रक्तपुरवठा असुरक्षित होतो. हे लक्षात ठेवले पाहिजे.
ज्या रूग्णांचा अंतर्दाब नियमीत औषधाने आटोक्यात राहात नाही, जे रूग्ण औषध नियमीत टाकू शकत नाही किंवा ज्यांना तपासणीला नियमीत येणे अशक्य आहे आणि दृष्टी हळूहळू कमी होतेय, अशा रूग्णांवर शस्त्रक्रिया करणे जरूरीचे असते. शस्त्रक्रियेचा फायदा असा की, डोळ्यातील दाब कमी करण्याचा सूक्ष्म अंतर्गत मार्ग तयार केला जातो. त्यामुळे दाब कायम कमी राहू शकतो.
तर मग चला तर डोळ्याची निगा राखूया...
-डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/9/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...