पावसाळ्यात दूषित पाणी आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. यामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुन्या या आजारांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. या विशेष लेखात आपण जाणून घेऊया डेंग्यू व चिकुनगुन्या आजारांविषयी...
चिकुनगुन्या व डेंग्यू हे आजार विशिष्ट विषाणूमुळे होतात व एडीस एजिप्टाय नावाच्या डासामार्फत या रोगांचा प्रसार होतो. हा डास दिवसा व एकाचवेळी अनेक लोकांना चावतो. या डासाला पायावर पट्टे असल्याने "टायगर मॉस्किटो" म्हणतात. या डासांची उत्पत्ती स्वच्छ, साठविलेल्या पाण्यात उदा. रांजण, माठ, पाणी साठविण्याच्या टाक्या, पाण्याचे हौद, कुलरमधील पाणी, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, टायर्स इत्यादीमध्ये होते.
2 ते 7 दिवस तीव्र ताप डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोळ्याच्या खोबण्या दुखणे, अंत:त्वचा, नाक-तोंड इत्यादीतून रक्तस्त्राव, अंगावर पुरळ येणे, त्वचा थंड व निस्तेज होणे, रक्तदाब कमी होणे.
आजारामध्ये डेंग्यू फिव्हर, डेंग्यू हिमोरिजीक फिव्हर (रक्तस्त्रावित रूग्ण), डेंग्यू शॉक सिंड्रोम या 3 प्रकारचे रूग्ण आढळतात.
तीव्र ताप, तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. सर्व वयोगटात हा रोग आढळून येतो. दुषित एडीज एजिप्टाय हा डास चावल्यानंतर निरोगी व्यक्तीला हा रोग होवू शकतो.
डासाचे जीवनचक्र एका आठवड्यात पूर्ण होते. त्यामुळे पाण्याचे सर्व साठे दर आठवड्याला एकदा रिकामे करावेत. या साठ्याच्या आतील बाजू, तळ घासून व पुसून कोरडे करून पुन्हा वापरावेत. घराभोवती फुटके डबे, वापरलेले जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचून राहिल्यास तसेच घरातील पाणी साठविण्याचे रांजण, बॅरेल, हौद, फुलदाण्या, कुलर्स इत्यादी नियमितपणे स्वच्छ न केल्यास त्यात डासाची निर्मिती होते. वापरलेल्या वस्तुची विल्हेवाट लावणे तसेच घरातील पाण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ केल्यास डासांच्या निर्मितीवर नियंत्रण येईल. घराभोवतालचा परिसर स्वच्छ करून तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात. पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी. हा आजार विषाणूजन्य असल्याने खाजगी व्यावसायिकांनी लक्षणे व चिन्हावर आधारीत औषधोपचार करावा. स्टेरॉईड औषधाचा वापर करू नये. सलाईनचा जलशुष्कता असेल तरच वापर करावा. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या सभोवतालची डबकी, खड्डे बुजवून टाकावीत अथवा त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. कीटकनाशक फवारणीच्यावेळी सर्व घरांमध्ये फवारणी करून घ्यावी, त्यास नकार देऊ नये. तसेच फवारलेल्या भिंती सहा आठवडे सारवू नयेत.
दिवसेदिवस किटकनाशकांच्या किंमतीत होणारी वाढ व किटकनाशकांचा पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणाम यांचा अभ्यास केला असता जीवशास्त्रीय उपाययोजनेला पर्याय नसल्याचे दिसून येते. "जिवो जिवस्य जिवनम्" अर्थात "जगा आणि जगू द्या" या उक्तीप्रमाणे गप्पी मासे हे डासांच्या अळ्यांचा खाद्य म्हणून वापर करतात. हा सर्वात सुरक्षित व बिनखर्चाचा उपाय आहे. या दोन्ही आजारांवरील तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये व जिल्हा रूग्णालयामार्फत मोफत उपलब्ध आहेत. शासनाच्या कुठल्याही उपक्रमाचे व योजनेचे यशापयश हे जनतेच्या सहकार्यावरती अवलंबून असते. यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. डास आपणास चावणार नाहीत, याची दक्षता आपण घेणे गरजेचे आहे. डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर केला पाहिजे. डास प्रतिबंधक अगरबत्त्यांचा वापरही करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी चिकुनगुन्या / डेंग्यू तापाचा प्रसार थांबविण्यासाठी खबरदारी घेऊन प्रतिबंध करावा व त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. स्वयंसेवी संस्थांनीही यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती केल्यास समाजहिताचे ठरेल.
संकलन- शंकरराव पवार,
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...