गेल्या शतकात पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचा विकास झाला. यातूनच रोगप्रतिबंध करणा-या अनेकस्तरीय उपायांचा अभ्यास व अंमलबजावणी झाली. जिथे जिथे ही उपाययोजना परिणामकारक झाली तिथे तिथे सार्वजनिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, आहार सुधारणे, स्वच्छ व मुबलक पाणी, लसटोचणी, प्रतिजैविके निर्जंतुकीकरणाच्या विविध पध्दती या त्यांतल्या प्रमुख बाबी आहेत. क्षयरोगाचे उदाहरण या दृष्टीने फार बोलके आहे. इंग्लंडमध्ये एकेकाळी प्रचंड प्रमाणात असणारा क्षयरोग सरासरी राहणीमान सुधारताच खूप कमी झाला. क्षयरोगावरची औषधे तर नंतर निघाली. उलट भारतासारख्या देशात औषधे असूनही अजूनही क्षयरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आहे.
आपल्या देशातील वैद्यकीय सेवांचा विकास फार विचित्र पध्दतीने झाला. एकतर पारंपरिक उपचार पध्दतींचा -हास झपाटयाने झाला. केवळ ब्रिटिश सैन्यतळांसाठी आणलेले पाश्चात्त्य वैद्यक एका शतकातच सर्व शहरामध्ये पसरले. या तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक आरोग्याच्या पूर्वअटी मात्र पूर्ण झाल्या नाहीत. उदा. बहुसंख्य लोकांना स्वच्छ पाणी, संडास, पुरेसे पोषण अजूनही मिळत नाही. म्हणूनच 'आजारांविरुध्द औषधे' अशी एकांगी व महागडी लढाई आपण ओढवून घेतली आहे. राहणीमान न सुधारता आणि प्रतिबंधक उपायांशिवाय नुसत्या औषधोपचारांनी आरोग्याचा दर्जा सुधारणे अशक्य आहे, हे सत्य सर्वांनीच लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/30/2019
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...