कधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात. बहुतेकदा जन्मताना बाळ आतले पाणी गिळते. बाळाभोवतालचे पाणी आणि कित्येकदा बाळाने आत टाकलेले मलमूत्र पाण्याबरोबर पोटात गेल्याने या उलटया होतात. बाळाला अंगावर पाजणे सुरू केल्यावर या उलटया थांबतात. बाळ अंगावर पीत असताना हवा गिळते. पाजून झाल्यावर जर उभे धरून ढेकर काढून टाकली नाही तर ढेकरेबरोबरच थोडेसे दूधही बाहेर काढते. यासाठी प्रत्येक वेळी पाजून झाल्यावर बाळाला छातीवर उभे धरुन पाठीवर थापटया देऊन ढेकर काढावी.
जर या उलटया थांबल्या नाहीत किंवा मूल हिरवट रंगाच्या उलटया करू लागले किंवा पोट फुगले तर मात्र लगेच डॉक्टरकडे पाठवावे. कदाचित, आतडयांमध्ये अडथळा निर्माण होऊन आतडी बंद झाली असण्याची शक्यता आहे.
बाळांना कधीकधी जिभेवर पांढरा थर धरतो. हा एक प्रकारचा बुरशीदोष आहे. यामुळे फारसा काही त्रास नसतो. पण जीभ चरचरल्यामुळे कधीकधी बाळ दूध ओढत नाही. बुरशीदोष पसरू नये म्हणून 1% जेंशन औषध जिभेवर एक-दोन थेंब दिवसातून दोन वेळा लावावे. एक थेंब औषधही खूप पसरते. हे औषध गिळले तरी अपाय होत नाही.
जन्मल्यावर बहुधा पहिल्या 24 तासांत बाळ पहिली शी करते. जर 48 तासांतही शी केली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. अंगावर पिणारे मूल क्वचित तीन ते चार दिवसांत एकदा शी करते. यात धोका काही नसतो. वयाच्या चार-पाच महिन्यांनंतर बाळाला शी रोजच्या रोज होऊ लागते.
बाळ शी करत नाही म्हणून किंवा जन्मल्यावर सर्व पोट लवकर साफ व्हावे म्हणून एरंडेल तेल चाटवण्याची पध्दत घातक ठरू शकते. शिवाय त्याची काही गरजही नसते.
जन्मलेल्या प्रत्येक बाळामध्ये तिस-या ते पाचव्या दिवशी थोडे काविळीचे प्रमाण दिसते. डोळयात व त्वचेवर पिवळेपणा, लघवी जास्त पिवळी, यावरून कावीळ कळते. हे काविळीचे प्रमाण थोडे वाढून नंतर 7 ते 10 दिवसांत कावीळ नाहीशी होते.
बाळाच्या शरीरात जन्मत: तांबडया पेशी जास्त प्रमाणात असतात. या तांबडया पेशींचा प्रकारही थोडा वेगळा असतो. आईच्या पोटातून बाहेर पडल्यावर नवीन प्रकारच्या रक्तपेशी आवश्यक असतात. म्हणून पहिल्या तीन -चार दिवसांत जुन्या रक्तपेशी मोडून नवीन प्रकारच्या रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. जुन्या पेशी मोडीत काढल्यावर बिलिरुबीन नावाचे पिवळे द्रव्य जास्त प्रमाणात तयार होते. यांचा निचरा करायला दोन-तीन दिवस लागतात, म्हणून कावीळ दिसते. म्हणजेच पहिल्या आठवडयात कावीळ दिसणे अगदी नैसर्गिक आहे. ही कावीळ दिसते व आपोआप नाहीशी होते. अपु-या दिवसांच्या मुलांमध्ये कावीळ उशीरा दिसते (5 ते 7 दिवस) व उशिरा जाते (12 ते 15दिवस).
जन्मल्याजन्मल्या लगेच कावीळ दिसली किंवा ती जास्त दिवस टिकली किंवा जास्त प्रमाणात आहे असे वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एरवी या काविळीसाठी काहीही उपचार करण्याची गरज नसते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/12/2020
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काह...
पचनसंस्थेत जठरामधील क्रिया मंदावली किंवा जठराच्या ...
ओकारी : जठरातील पदार्थ परत तोंडावाटे जोराने फेकले ...
'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते....