অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणी अशुध्द कसे होते..

पाणी अशुध्द कसे होते..

पाण्यात रोगजंतु किंवा विषारी रसायने मिसळणे म्हणजे पाणी अशुध्द होणे. हे रोगजंतू मुख्यतः माणसाच्या व इतर प्राण्यांच्या विष्ठेमार्फत येतात. नदी, झरे, तलाव या पृष्ठभागावरच्या पाण्यात रोगजंतूंचे प्रमाण जास्त असते. कारण जमिनीवरच्या घाणीचा संबंध त्या पाण्याशी लवकर व सहज येतो. नद्यांमध्ये तर वरच्या गावाचे मैलापाणी सर्रास सोडले जाते. त्यामुळे रोगजंतूंबरोबर विषारी पदार्थही मिसळतात. तसेच तलाव-विहिरीत कपडे,भांडी धुणे, आंघोळ करणे, गुरे बसवणे यामुळे रोगजंतू मिसळतात. पाण्याचा मोठा साठा किंवा प्रवाह असेल तर थोडयाशा घाण पाण्याचा फारसा परिणाम होत नाही. पण घाण पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर मात्र दुष्परिणाम दिसतात. या सर्व कारणांमुळे पृष्ठभागावरचे पाणी (नदी, झरे, तलाव, इत्यादी) शुध्द केल्याशिवाय वापरणे धोक्याचे असते. उत्तर भारतातल्या गंगा-यमुनेसारख्या मोठया नद्यांचे पाणीही आता सरळ पिण्यास योग्य राहिलेले नाही.

महाराष्ट्रात सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. जमिनीखालचे आणि खडकाखालचे झरे (विहीर, बोअरवेल) मात्र सहसा दूषित होत नाहीत. खडकाच्या खालपासून पाणी उपसणा-या बोअरवेलचे पाणी सरळ पिण्याजोगे शुध्द असते. उघडया विहिरीमध्ये दूषित पाणी किंवा घाण मिसळून पाणी खराब होण्याची शक्यता असते. मात्र या विहिरी आतून बांधून, कट्टा करून झाकल्या व आत उतरायला बंदी केली तर पाणी शुध्द राहते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate