অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वच्छ पाण्याचा पुरवठा

प्रस्तावना

नदया, विहिरी, ओढे, हातपंप इत्यादींपासून आपल्याला पाणी मिळते. परंतु हे पाणी पिण्यास योग्य असतेच असे नाही. नदीकाठी विहिरीजवळ जनावरे धुणे, कपडे धुणे, भांडी घासणे अशी कामे केली जातात. शिवाय त्यामध्ये पालापाचोळा, धूळ वगैरे पडतच असते. त्यामुळे पाणी वारंवार दूषित होत असते. अशा पाण्यामुळे अतिसार, पटकी, विषमज्वर, कावीळ यासारखे घातक आजार होऊ शकतात. अनेकांना माहिती नसते की वरवर स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा नुसत्या डोळ्यांना न दिसणारे अनेक जंतू असू शकतात. म्हणून पाणी वापरण्यापूर्वी पिण्यायोग्य म्हणजेच शुध्द करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पाणी जीवन आहे. माणसाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. माणसाला, जनावरांना, पक्षांना पिण्यासाठी पाणी लागते. जे सजीव आहेत त्यांना सर्वांना पाण्याची आवश्यकता आहे. आपल्या शरीराचा ७० % हून अधिक भाग हा पाण्यापासून बनलेला असतो. शरीराला निरनिराळ्या माध्यमातून पाण्याची गरज भासत असते आणि ही गरज या ना त्या प्रकाराने आपण भागवित असतो. पाचकरस आणि रक्त तयार होण्यापासून किंवा शहरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रकियेपर्यंत पाणी हाच घटक शरीरात काम करत असतो.

पिण्याच्या पाण्याची स्वच्छता कशी राखावी

  • पिण्याचे पाणी आणण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत, ते दररोज विसळावे, पाणी भरताना चारपदरी फडक्याने गाळून घ्यावे.
  • भांडी भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे.
  • भांड्यातले पाणी पिताना पाण्यामध्ये अस्वच्छ हात बुडवले तर पाण्यात जंतू मिसळतात व वाढतात. म्हणूनच भांड्यातून पाणी काढण्यासाठी दांड्याचे भांडे वापरावे. पाणी पिण्यासाठी स्वच्छ पेला, तांब्या वापरावा.
  • साथीच्या दिवसांत पाणी उकळून प्यावे. पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे त्यातील रोगजंतू मारतात.

शक्यतो हातपंपाचे पाणी, पायऱ्या नसलेल्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे किंवा सार्वजनिक विहिरीत टी.सी.एल. टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरावे. परंतु तिथे दररोज घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.

आपण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी जातो अशावेळी शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे. कारण लग्न, धार्मिक समारंभ, शाळा, कॉलेज, यात्रा, मेळावे अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. शक्य असेल तेव्हा पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनयुक्त गोळ्यांचा वापर करावा. दररोज उकळून पाणी पिणे शक्य होत नसेल तर किमान आजारी माणसाला उकळून गार केलेले पाणी पिण्यास दयावे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. अशावेळी मिळेल त्या ठिकाणावरून लोक पाणी पिण्यासाठी आणतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य असतेच असे नाही त्यामुळे त्याची खात्री करावी.

घरगुती पाणी पिण्यासाठी टाकीचा वापर करत असाल तर ती स्वच्छ धुतलेली पाहिजे. त्यावर झाकण ठेवलेले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणच्या टाकीची व्यवस्था ठेवण्यासाठी ग्रामपंचायत किनवा कर्मचारी वर्ग यांनी दक्षता घेतली पाहिजे. ती आठवडयातून एकदातरी साफ केलीच पाहिजे.

नळाद्वारे पाणी पुरवठा असेल तर पाईप लाईन कुठे फुटलेली आही किंवा नादुरुस्त झाली आहे ते पाहून लगेच दुरुस्त करून घेतली पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये घाण मिसळणार नाही.

 

स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 3/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate