অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला शेतकरी आरोग्याला जपा

शेतीत काम करणाऱ्या महिला शेतकरी, मजूर महिलांच्या आरोग्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना दुखणी आली तरी त्या काम करतच असतात. त्यातून त्या दुखण्याकडे दुर्लक्ष होऊन आजार वाढत जातो; परंतु कामे तर नेहमीचीच आहेत, ती करावीच लागणार, मात्र आरोग्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्याला वेळीच जपायला हवे.

बळिराजाच्या सोबतीला शेतीतील अनेक कामे या महिलाच करत असतात. दिवसाचे १४ ते १८ तास त्या शेतावर आणि घरातही राबतात. जनावरांचे गोठे साफ करणे, दूध काढणे, जनावरांना चारा व पाणी देणे इत्यादी कामे तसेच शेतीतील पूर्व मशागतीपासून धान्य घरात येईपर्यंत, धान्य साठवणूक, वाळवणी आणि विविध हंगामांत गृहोपयोगी पदार्थ तयार करण्यासारखी कामे महिला वर्षानुवर्षे करतात. हे सर्व करत असताना शेतकरी महिलांचे स्वत-च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते व परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

शेती कामाच्या ताणामुळे होणारे आजार

शेतीची कामे महिला पारंपरिक खुरपी, विळे वापरून हाताच्या व पायाच्या साह्याने पूर्ण करतात. कामाच्या वेळी त्यांच्या शरीरास अनैसर्गिक स्थितीत बराच काळ राहावे लागते. जसे की, खुरपणी करताना बराच काळ पायावर ओणवे बसावे लागते. त्यामुळे पाठीचा मणका, पायांच्या स्नायूंवर व गुडघ्यावर ताण येतो. परिणामी कामाची गती मंद होऊन शारीरिक आजार होतात. यामध्ये मुख्यत- पाठीच्या मणक्‍याचे, मानदुखी, कंबरेचे व गुडघ्याचे आजार होतात. काही वेळेस महिला जी अवजारे वापरतात ती मुख्यत- पुरुष शेतकऱ्यांसाठी बनवलेली असतात, त्यामुळे महिलांची शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च होते व त्यांना शारीरिक कष्ट पडतात. याबाबत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झालेल्या अभ्यासक्रमानुसार महिलांना कमी-जास्त प्रमाणात होणारे शारीरिक विकार पुढीलप्रमाणे..
या त्रासांची तीव्रता इतकी असते की महिलांना एका जागेवरून हालचाल करणेदेखील अशक्‍य होते. मणक्‍यांना आजारामुळे जसे डिस्कस्लीप होणे, चक्कर किंवा अंधारी येणे, हातांची बोटे न वळणे, सांधे आकडणे, मान वळवण्यास त्रास होणे, उठ-बस करण्यास त्रास होणे इत्यादी आजार शेतकरी महिलांना होतात. हे त्रास कमी करण्यासाठी महिलांनी विद्यापीठाने तयार केलेल्या विविध सुधारित अवजारांचा वापर करायला हवा.

संरक्षक साहित्याच्या अभावामुळे होणारे आजार

शेतीतील कामे उघड्यावर करावी लागत असल्यामुळे शेतकरी महिलांना ऊन, पाऊस आणि थंडी या बदलत्या हवामानाला सतत तोंड द्यावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होऊन त्यांना अनेक आजार किंवा व्याधींना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळ्यांची जळजळ होते, डोके गरम होते, डोके दुखणे, प्रसंगी चक्कर येते व खूप घाम येऊन थकवा जाणवतो. शरीराची उघडी त्वचा जळून आग होऊन जखमा होतात. पिकावर फवारलेल्या कीडनाशकांमुळे, किडींमुळे (भेंडीवरील कोळी) त्वचेवर परिणाम होऊन त्वचा लाल होणे, खाजवणे, चट्टे पडणे असे विविध त्वचा रोग व श्‍वसनाचे आजार होण्याचा धोका संभवतो. लोखंडी औजाराच्या वापरामुळे पायांना, हातांना इजा होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास उसाचे पाचट लागून जखमा होतात. त्या जखमांवर धूळ व कीटकनाशकांचा, रसायनांचा प्रभाव होऊन त्या चिघळतात.
सकस आहाराचा अभाव व अस्वच्छतेमुळे आजार उद्‌भवतात. वारंवार शिळे अन्न खाणे, अपुरे, अपौष्टिक व अवेळी जेवण, वारंवार उपवास करणे, इत्यादींमुळे शेतकरी महिलांमध्ये कुपोषण होऊन अशक्तपणा, रक्तक्षय, गलगंड, पित्ताच्या तक्रारी, अल्सर, कंबरदुखी, पाठदुखी, हाडे सच्छिद्र व ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरॅसिस) इत्यादी आजार उद्‌भवतात. अपौष्टिक आहारामुळे गर्भावस्थेत व स्तनदा मातांमध्ये अशक्तपणा, रक्तक्षय, रांतांधळेपणा, गर्भपात तसेच प्रसूतीत बालमृत्यू व कुपोषित बालकांचा जन्म यासारख्या भीषण समस्या उद्‌भवतात.

काय काळजी घ्याल?

उन्हाळ्यात शेतात काम करताना सुती कपडे वापरावेत. डोक्‍याला सुती रुमाल बांधावा. आहारात भरपूर पाण्याचा व सरबताचा वापर करावा. पावसाळ्यात जास्त काळ पावसात काम केल्याने ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार, संधिवात यासारखे आजार उद्‌भवतात. त्यामुळे पाणी लवकर ठिबकून जाण्यासाठी पॉलिस्टरच्या कापडाचा वापर करावा. त्यामुळे ओले कपडे लवकर वाळतील. सततच्या ओलाव्यामुळे पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होतात त्यासाठी वेळीच योग्य उपचार करावा. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड किंवा लोकरी कपडे वापरावेत. फवारणी व बीजप्रक्रिया करताना बुरशीनाशक, कीडनाशक हाताला लागू नये, श्‍वसननलिका व डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून चष्मा, मास्क व हातमोजे असे संरक्षक साहित्य वापरावे.
कापूस वेचणी, भाजीपाला, फुले व फळभाज्या तोडणी, चाराकापणी यांसारख्या कामात पुढील किंवा मागील ओटीचा कापूस वेचणी कोट ऍपरॉन / कोट किंवा सनकोट व हातास नखळ्या आणि डोक्‍यास रुमाल बांधून स्वत-चे संरक्षण करावे.
करडई, सोयाबीन इत्यादी पिकांची कापणी करताना हातांना जखमा होऊ नयेत म्हणून जाड कापडाचे हातमोजे महिलांनी वापरावेत.
मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे व भाजीपाला याचा आहारात उपयोग करावा. आहारात प्रक्रियायुक्त सोयाबीन, लिंबू, दूध, दही, शक्‍य असल्यास मांस, मासे, अंडी तसेच मिश्रधान्य व कडधान्य यांचा वापर करून सकस आहार घ्यावा. आजारांची भीषणता व त्यांचा स्वत- महिलांवर, कुटुंबावर व समाजावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन स्वत- महिला शेतकऱ्यांनी जागरूक राहावे. कुटुंबातील इतर व्यक्तींनी काळजी घ्यावी, म्हणजे प्रत्येक कुटुंब सुदृढ, आनंदी व सुखी होईल.

- ०२४८२-२३५५८६
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate